Sharad Pawar- Arvind Kejriwal
Sharad Pawar- Arvind Kejriwal Sarkarnama
पुणे

Pawar on Kejriwal Arrest : केजरीवाल यांच्या अटकेची सरकारला किंमत मोजावी लागेल; पवारांचा कडक इशारा

मिलिंद संगई

Baramati, 22 March : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी ईडीने गुरुवारी रात्री अटक केली, त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. आपकडून राज्यभरात निषेध आंदोलन करण्यात येत आहे. इंडिया आघाडीतील पक्षही केजरीवाल यांच्या समर्थनार्थ पुढे येताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारला अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल. केजरीवाल यांच्या पक्षाच्या आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, इंडिया आघाडीतील एक सहकारी पक्ष म्हणू मी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभा राहणार आहे, असेही शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीतील गोविंद बाग येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

केजरीवाल हे दिल्लीचे तीन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना जवळपास नव्वद टक्के मतं मिळालेली आहेत, त्यामुळे जनतेने केजरीवाल यांचे नेतृत्व मान्य केल्याचे दिसून येते. अशा लोकनेत्याला जेलमध्ये टाकून त्यांना लोकशाहीचा अधिकार बजावू न देणे, हे जनता कदापि सहन करणार नाही. लोकशाहीवर प्रेम असलेल्या सर्वांनी एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला केला पाहिजे. ज्या पद्धतीने आणीबाणीच्या काळात लोकांनी सामुदायिक शक्ती दाखवली, त्याच पद्धतीने आताही लोक शक्ती दाखवतील, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पवार म्हणाले, निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याची भूमिका केजरीवाल घेतात. त्यामुळेच त्यांना अरविंद केजरीवाल सहन होत नाहीत.

न्यायालयाने सांगूनही तामिळनाडूमध्ये राज्यपाल मंत्र्यांना पुन्हा शपथ देत नाहीत. हे दिल्लीतून सांगितल्याशिवाय होऊच शकत नाही. राज्यघटनेने राज्यांना दिलेले अधिकार सर्रासपणे पायदळी तुडवले जात आहेत. याअगोदर झारखंड, दिल्ली यानंतर इतर राज्यातही दहशत निर्माण करून आपल्या हाती सत्तेची सूत्रे ठेवण्याचा आटापिटा भाजपकडून सुरू आहे, अशी टीका पवार यांनी केली.

देशात सध्या लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम केले जात आहे. यापूर्वीही देशात असे कधीही झाले नव्हते. लोकशाहीने दिलेला अधिकार बजावू दिला जात नाही. असे प्रकार स्थानिक पातळीपर्यंत होत आहेत. स्थानिक स्तरावर दुकाने सील करण्यापासून अटकेपर्यंत सर्व पर्याय वापरले जात आहेत, यापूर्वी देशात असं कधीही झालं नव्हतं, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले, आतापर्यंतच्या बहुतांश निवडणूका या काही अपवाद वगळता मोकळ्या वातावरणात झालेल्या आहेत. पण, मोदी सरकारच्या काळातील लोकसभेची आगामी निवडणूक किती मोकळेपणाने होणार, याची शंका आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. बॅंक खाती गोठवून काँग्रेसचा प्रचारच अडचणीत आणला आहे. प्रचाराची साधनसामग्री एका पक्षाला वापरू द्यायची नाही, अशी भूमिका यापूर्वी कधी घेतली गेली नाही. केजरीवाल यांना राज्याचे धोरण ठरविले म्हणून अटक करणे चुकीचे आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यापर्यंत सत्तेचा गैरवापर वाढला आहे.

राज ठाकरे हे एक दोन जागा लढवणार असतील ती त्याचा फारसा परिणाम होणार नाही. मात्र, ते किती जागा लढवतील, हेही बघावे लागेल. समारेच्या जागा जाहीर झाल्या की आमच्या पक्षात आणखी इन्कमिंग वाढेल. त्यानंतर कोणाकडे किती लोक आहेत, हे समजेल. तसेच, आमच्याकडे किती लोक येतात, हेही दिसेल, असेही पवार यांनी नमूद केले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT