Indira gandhi.jpg Sarkarnama
विशेष

Indira Gandhi : इंदिरा गांधींच्या राजकारणाला धक्का देणारा लढा..!

Indian Politics : याच काळात आपल्या सांसदीय लोकशाहीवरील काळा डाग संबोधला गेलेली आणीबाणी लादण्यात आली. विरोधकांनी देशप्राप्तीपासून ते आणीबाणीच्या काळापर्यंत काँग्रेससारख्या भांडवली व वर्चस्ववादी पक्षाच्या विरोधात केलेल्या लढ्याचा हा परमोच्च असा बिंदू होता.

दयानंद माने

दयानंद माने-

भारतीय राजकारणातील महत्वाचे राजकीय नेते व अभ्यासक मधु लिमये यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांनी लिहिलेल्या निवडक अशा इंग्रजी ग्रंथांचा मराठी अनुवाद करण्याचा प्रकल्प केशव गोरे स्मारक ट्रस्ट व साधना प्रकाशनाने हाती घेतला आहे. यातील ‘बर्थ ऑफ नॉन काँग्रेसिझम’ या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद सतीश कामत यांनी ‘जन्म बिगर काँग्रेसवादाचा’ या नावाने दोन खंडात केला आहे. ‘साप्ताहिक सरकारनामा’च्या गेल्या अंकात (७ डिसेंबर) पहिल्या खंडाचे परीक्षण करण्यात आले होते. या अंकात दुसऱ्या खंडाचे परीक्षण करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या म्हणजे १९४७ ते १९६४ या कालखंडातील बिगर काँग्रेसवादी पक्षांचे राजकारण पहिल्या खंडात आहे तर त्यानंतरच्या म्हणजे १९६४ ते १९७४ या दशकभरातील राजकारणाचे चित्र दुसऱ्या खंडात घेण्यात आले आहे. केंद्रीय सत्तेतील बलाढ्य अशा काँग्रेसच्या व विशेषतः इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या राजकारणाला धक्का देणारा विरोधी पक्षांचा लढा देशातील ज्येष्ठ समाजवादी नेते जयप्रकाश नारायण व राममनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली लढला गेला.

याच काळात आपल्या सांसदीय लोकशाहीवरील काळा डाग संबोधला गेलेली आणीबाणी लादण्यात आली. विरोधकांनी देशप्राप्तीपासून ते आणीबाणीच्या काळापर्यंत काँग्रेससारख्या भांडवली व वर्चस्ववादी पक्षाच्या विरोधात केलेल्या लढ्याचा हा परमोच्च असा बिंदू होता. काँग्रेस (Congress) विरोधक अर्थात बिगर काँग्रेसवादी राजकारणातील समाजवादी, जनसंघ व कम्युनिस्ट तसेच काँग्रेसअंतर्गत असलेल्या गटबाजीचे तसेच त्याकाळात घडलेल्या घटना व प्रसंगांचे यथार्थ असे वर्णन व विश्लेषण लिमये यांनी त्यांच्या अभ्यासक नजरेतून केले आहे.

स्वतः समाजवादी पक्षात काम केल्याने लिमये यांनी या नेत्यांचे राजकारण जवळून पाहिलेले आहे. त्यामुळे राजकीय कार्यकर्ते तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक म्हणून ते ख्यातकीर्त असल्याने त्यांचे विचार अत्यंत मोलाचे असे आहेत.

१९६७ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नीलम संजीव रेड्डी यांचा पाठिंबा अलगदपणे काढून इंदिरा गांधी यांनी विरोधकांनी संयुक्तपणे उभ्या केलेल्या व्ही व्ही गिरी यांना निवडून आणले. नैतिक राजकारणाचे धिंडवडे उडवत आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करत इंदिरा गांधी यांनी त्यांच्या अनैतिक व हुकूमशाही वृत्तीचा परिचय देशाला करून दिला होता. या प्रकरणावरून गांधी यांनी विरोधी पक्षांना तसेच काँग्रेस अंतर्गतविरोधकांनाही धोबीपछाड दिला होता. पुढे १९६९ ला काँग्रेस संघटना (सिंडिकेट) व काँग्रेस आर (इंडिकेट) कॉँग्रेस अशा दोन गटांत फुटली.

जुन्या नेत्यांचा कामराज, निजलिंगप्पा, मोरारजी देसाई आदी नेत्यांचा पक्ष संघटनेवर वरचष्मा होता. ते सिंडिकेट काँग्रेसमध्ये गेले तर केंद्रात सत्तेवर असलेले नेते इंदिरा गांधीसोबत राहिले. बॅँकाचे राष्ट्रीयीकरणाचा निर्णय, सर्वसामान्य जनतेचा विश्वास कमावत व केंद्रातील सत्तेचा वापर इंदिरा गांधी यांनी आपल्या विरोधकांना संपविण्यासाठी केला, असे एक विस्तृत प्रकरण या खंडात आहे.

त्यानंतर बिगर काँग्रेसवादाच्या राजकारणात जनसंघानेही आपल्या हिंदुत्ववादी राजकारणाची ओळख निर्माण करण्याचा स्वतंत्रपणे प्रयत्न केला. सुरूवातीला या पक्षाची ताकद अगदी क्षीण होती. कारण धार्मिक अशा राजकारणाचा जनतेलाच तिटकारा होता तसेच सर्वधर्म समानतेचे तत्त्व लोकांत भिनलेले होते. त्यामुळे जनसंघाच्या राजकारणाला कधी चढती कमान तर कधी उतरती कळा लागलेली होती. त्यांच्या राजकारणाचे विश्लेषण लिमये यांनी एका प्रकरणात केले आहे.

देशात विरोधकांच्या राजकारणामुळे विरोधी संयुक्त विधायक दलाची सरकारे गुजरात, बिहार या राज्यात प्रामुख्याने अस्तित्वात आली. त्यानंतर उत्तर प्रदेशातून विरोधकांची चळवळ देशभरात फोफावली. जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, जनसंघ, भारतीय क्रांतीदल, डावे पक्ष, दक्षिणेतील काँग्रेस विरोधी प्रादेशिक पक्ष आदी बिगर काँग्रेसविरोधी पक्षांच्या राजकारणाचा व त्यांचा काँग्रेसविरोधातील संघर्षाचे विश्लेषण लिमये यांनी त्यांच्या नजरेतून केले आहे.

या खंडात ‘राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील कट-कारस्थान’, ‘काँग्रेस फुटीनंतर’, ‘राष्ट्रीय राजकारणात कम्युनिस्टांची भुमिका’, ‘जनसंघाच्या चढत्या उतरत्या यशाचा आलेख’, ‘स्वतंत्र पक्षाची नेत्रदीपक वाढ’, ‘संघटना काँग्रेस (सं) आणि ‘बडी आघाडी’, ‘समाजवादी ऐक्यः व्यापक ऐक्याची नांदी?’, ‘लाट ओसरू लागली..’, ‘कृपलानी यांचा पुढाकार’, ‘इंदिरा गांधींची अनैतिकता आणि जेपींचे नैतिक आवाहन’, ‘उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक’ आणि ‘भालोद’ची स्थापना’, ‘बिहार संघर्षाचा उद्रेक’, ‘जेपी आंदोलनाचे राष्ट्रीय पैलू,’ ‘जेपी आंदोलन आणि विरोधी पक्ष’, ‘डावा पर्याय ती सर्वसमावेशक ऐक्य?’, ‘पाऊलापाऊलाने ऐक्याकडे,’ ‘जेपी आंदोलन आणि कम्युनिस्ट पक्ष’, ‘फेडरल पक्षांचा (महासंघाचा) प्रस्ताव आणि गुजरात जनता मोर्चा’, ‘काळरात्र झाली...’ या प्रकरणांचा समावेश आहे. एकूण बिगर-काँग्रेसवादाच्या राजकारणातील मैलाचा दगड ठरू शकेल, असे हे पुस्तक राजकीय विचारवंत, अभ्यासकांसाठी महत्वाचे ठरेल असे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT