Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad Pawar Sarkarnama
विशेष

Sharad Pawar Vs Ajit Pawar: जागावाटपाच्या वाटाघाटीत 'दादां'पेक्षा 'साहेबां'चाच दरारा!

सरकारनामा ब्यूरो

संदीप चव्हाण-

Loksabha Election News : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन बलाढ्य पक्षांच्या फुटीनंतर ही पहिलीच लोकसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरांसह केंद्रातील मोदी सरकारला उलथवण्याचा विडाच उचलला आहे, तर बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदेंसह अजित पवारांसाठीही ही निवडणूक अग्निपरीक्षाच असणार आहे. दोन्ही बाजूने एकमेकांना शिकस्त देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्यात पहिल्या टप्प्यातल्या जागावाटपाच्या वाटाघाटीत काका पुतण्यापेक्षा चांगलेच वरचढ ठरले आहेत.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवार Sharad Pawar आपल्या पक्षासाठी 10 जागा मिळवण्यात यशस्वी ठरले तर महायुतीच्या जागावाटपात अजित पवारांना आपल्या पक्षासाठी केवळ 05 जागा मिळवता आल्याशिवाय वाट्याला आलेल्या 05 जागांपैकी एक जागा रासपसाठी सोडावी लागली आहे. त्यामुळे सध्यातरी जागावाटपाच्या वाटाघाटीत शरद पवार हे अजित पवारांपेक्षा सरस ठरले असल्याचे दिसून येत आहे.

एक पक्षाचा, एक घरचा...

राष्ट्रवादी अजित पवार Ajit Pawar गटाच्या वाट्याला लोकसभेच्या अवघ्या पाच जागा आल्या आहेत. बारामती, शिरूर, रायगड, धाराशिव आणि परभणी. यातली परभणीची जागा तर रासपसाठी सोडावी लागली आहे. म्हणजे घड्याळावर लढल्या जाणाऱ्या जागा किती तर अवघ्या चार! बारामतीतून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढत आहेत तर पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे रायगडमधून लढत आहेत.

शिरूरमध्ये शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले शिवाजीराव आढळराव आणि धाराशिवमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या अर्चना राणाजगजितसिंह पाटील हे दोन्ही आयात उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

परभणीमध्ये पक्षाच्या बाहेरचे पण पक्षाच्या कोट्यातून उमेदवारी देण्यात आलेले रासपचे अध्यक्ष महादेव जानकर निवडणूक लढवत आहेत. एकूणच काय तर एक पक्षाचा, एक घरचा, दोन आयात आणि एक बाहेरचा अशी काहीशी राष्ट्रवादी अजित पवार गटाची परिस्थिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मविआचं 02 तर महायुतीचं 08 जागांवर अडलं घोडं !

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे तीन घटक पक्ष मैदानात उतरले आहेत तर तिकडं महायुतीच्या माध्यमातून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तीन घटक पक्ष एकत्र लढत आहेत. जागावाटपाच्या वाटाघाटीत युती-आघाडीत अजूनही रस्सीखेच सुरू असली तरी महाविकास आघाडीनं मात्र 21-17-10 हा फॉर्म्युला ठरवत आपापल्या जागा पदरात पडून घेतल्या आहेत.

शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला सर्वाधिक म्हणजे 21 जागा, त्या खालोखाल कॉँग्रेसच्या वाट्याला 17 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला 10 जागा आल्या आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आपापल्या जागांवरील सर्वच्या सर्व उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

मात्र, कॉँग्रेसकडून (Congress) मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर मध्य या 02 जागांवरील उमेदवारांची अधिकृत घोषणा होणं अजून बाकी आहे. तिकडं महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अजूनही निश्चित झालेला नाही. महायुतीकडून नाशिक, कल्याण, ठाणे, पालघर, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिम या 08 जागांवरील उमेदवारांची अधिकृत घोषणा होणं अद्याप बाकी आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT