MVA- Mahayuti
MVA - Mahayuti Sarkarnama
विशेष

MVA Vs Mahayuti News : कॉन्फिडन्स वाढलेल्या विरोधकांना आता अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संधी !

Sachin Waghmare

Mumbai News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीचे सरकार बॅकफूटला गेले आहे. त्यातच आता आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यामुळे महाविकास आघाडीचा (MVA) कॉन्फिडन्स वाढला आहे. त्यामुळे 27 जूनपासून सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संधी चालून आली असल्याने सत्ताधारी मंडळींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (MVA Vs Mahayuti News)

विधिमंडळाचे अधिवेशन 27 जूनपासून सुरू होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी होणारे अधिवेशन हे सत्ताधारी व विरोधकांच्या दृष्टीने महत्वाचे असणार आहे. या अधिवेशनात आपलेच वर्चस्व असावे, यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष बॅकफूटवर पडला आहे. त्यामुळे वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar)आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नव्या योजनांची घोषणा करून साखर पेरणी करण्याचा प्रयत्न करतील, पण तेवढ्याने भागणार नाही, असे दिसते.

लोकसभा निवडणुकीत संधी असतानाही अजित पवार यांच्या पक्षाला दमदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्यांच्या हातून बरेच काही निघून गेले आहे. त्यातच महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा जिंकल्या असल्याने सध्या महाविकास आघाडीचे मनोबल खूप वाढलेले आहे. अधिवेशनात ते अधिक आक्रमक असण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे सध्या राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा व ओबीसी समाजाचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे या आरक्षणाच्या प्रश्नावरून सरकारला घेरण्याचे आयते कोलीत विरोधी पक्षाच्या हाताला लागले आहे.

अडचणीत भर पडण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्य सरकारच्या अडचणीत भर पडत आहे. सत्ताधारी पक्षाकडे विरोधात गेलेले जातीय समीकरण दुरुस्त करण्यासाठी चार महिन्याचा अवधी हातात असल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकाभिमुख योजना आणि निर्णयाचा धडाका लावला तरच संधीचे सोने कदाचित करता येईल. अन्यथा लोकसभेप्रमाणे येत्या काळात काही मुद्दे व समीकरणे यामुळे अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी नाराज झालेले लहान लहान घटक जोडून घेण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.

रणनीती आखायला हवी

त्यातच ऐन अधिवेशन काळात विरोधकांच्या हातात ऐनवेळी नवा मुद्दा आला तर सरकारच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स वाढलेल्या विरोधी पक्षाला बॅकफूटवर ठेवण्यासाठी महायुतीमधील तीन घटक पक्षाला एकत्रित येउन रणनीती आखायला हवी आहे.

सत्वपरीक्षा पाहणारा काळ

त्यातच ऐन अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतर्गत नाराजीचा फटका महायुतीमधील घटक पक्षांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार व विधानपरिषद निवडणूक महायुतीमधील भाजप (Bjp), शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्वपरीक्षाच पाहणार, असे दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT