Sharad Pawar-NCP Leader Sarkarnama
विशेष

Sharad Pawar's Interview : भाजपबरोबर गेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोबत घेण्याचा विचारसुद्धा करत नाही; पवारांनी ठणकावले

सरकारनामा ब्यूरो

विजय चोरमारे

Mumbai, 4 May : आमच्या अनेकांच्या मनात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाचा विचार आहे. पण, जे आम्हाला सोडून भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत, त्यांनी परत येण्याची तयारी दाखवली तरी त्यांचा विचार करणे मला शक्य होणार नाही. त्यातील काही लोकांबाबत तर हा विचारसुद्धा करू शकत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांना ज्येष्ठ नेते शरद पवारांनी खणखणीत इशारा दिला.

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’ला मुलाखत दिली. त्यात केंद्रात काही बदल झाले आणि बाजूला गेलेल्या काही सहकाऱ्यांनी परत येण्याची इच्छा व्यक्त केली, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) एकत्रीकरण होऊ शकेल? या प्रश्नावर पवार यांनी आपली भूमिका मांडली. लोकसभा मतदानाच्या दोन टप्प्यानंतर राज्यातील मतदारांची भूमिका काय जाणवते, यावरही पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले, ज्येष्ठ आणि तरुणपिढी काही मुद्यांवर एकत्र येत आहे. विरोधकांना म्हणजे आम्हा लोकांना प्रोत्सहित करेल, अशी पावले ते टाकत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल (Narendra Modi) लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. लोक हे त्या मनःस्थितीत आहेत, ते राज्यात फिरताना, प्रचार करताना आम्हाला जाणवत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेच्या निवडणुकीचे (Loksabha election) सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर देश पातळीवरील चित्र स्पष्ट होईल. त्यावेळी सर्व नेते एकत्र येतील आणि पर्यायी शक्ती निर्माण करतील. पर्याय निर्माण केला तर देशाचा चेहरा बदलेल. सध्याच्या निवडणुकीत दक्षिण भारत एका बाजूला असल्याचे दिसून येते. त्यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरियाना, दिल्ली, पंजाब ही राज्य भर घालतील, अशी परिस्थिती आहे. ही सामूहीक शक्ती देशाचे नेतृत्व बदलायला आणि देशात परिवर्तन घडवायला उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वास देशपातळीवर इंडिया आघाडीला किती यश मिळेल, या प्रश्नावर शरद पवार यांनी व्यक्त केला.

जागा वाटपावर भांडणारे नेते निवडणुकीनंतर एकत्र येतील. कारण जागा वाटपावर मतभिन्नता असते. ती मतभिन्नता म्हणजे अंहकार असे वाटू शकतो. पण ते तसे नसते. मतदारसंघात आपण काम केल्याने, त्या मतदारसंघातून निवडून येण्याचा आत्मविश्वास असतो, त्यामुळे जागा वाटपावर मतभिन्नता दिसून येते, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

सांगलीचा विषय मला स्वतःला आवडला नव्हता

महाविकास आघाडीचे ९५ टक्के प्रश्न सुटले होते. पण सांगलीचा विषय होता. सांगलीचा विषय ज्या पद्धतीने पुढे मांडला गेला, तो मला स्वतःला आवडला नव्हता, त्यामुळे त्याच्यात मी लक्ष घातलं नाही. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या सहकाऱ्यांना हा रस्ता योग्य नाही, हे आम्ही सूचवत होतो. मात्र, त्यांनी जाहीरपणे एक भूमिका घेतली, त्यामुळे जाहीरपणे एखादी भूमिका मांडल्यानंतर मार्ग निघणे अवघड बनते, असेही शरद पवार यांनी सांगलीच्या जागेबाबत सांगितले.

पहाटेच्या शपथविधीला समर्थन नव्हते

अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीला माझे समर्थन नव्हते, तसेच त्याची कल्पनाही मला नव्हती. भाजपसोबत सत्तेत गेले पाहिजे. विकासासाठी सत्ता पाहिजे, सत्तेशिवाय राहणे योग्य नाही, असे काही सहकारी सांगत होते. हे केले नाही तर आम्हाला तुरुंगात जावं लागेल, असं काही घटक सांगत होते. आम्हाला ईडी, सीबीआय यांसारख्या यंत्रणा छळत आहेत. आमची घरे जप्त होतील, असे काही जण सांगत होते. आम्हाला रस्त्यात गोळ्या घाला; पण आमचा हा छळ थांबवा, असे एकाच्या कुटुंबाने सांगितले होते. आमच्या सहकाऱ्यांचा सत्तेत जाण्याचा आग्रह होता. पण मला स्वतःला ते पटत नव्हते. महाराष्ट्रात यापूर्वी विरोधी पक्षाला असा त्रास कोणीच दिला नव्हता. पण, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकाऱ्यांनी राजकारणाची एक नवी पद्धत दाखवली आहे, त्याचा परिणाम आमच्या काही सहकाऱ्यांवर झाला, असेही पवार यांनी नमूद केले.

युतीमध्ये अंतर निर्माण करण्यासाठी भाजपला पाठिंबा

तुमच्या १९७८ च्या मंत्रिमंडळात जनसंघाचे लोक हेाते. त्यानंतर तुम्ही २०१४ मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा दिला, त्यावेळी तुमची भूमिका काय होती, यावर पवार म्हणाले की, २०१४ मध्ये ही जाणीवपूर्वक पाठिंब्याचा निर्णय घेतला होता. भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ नये, अशी त्यामागची भूमिका हेाती. शिवसेनेला आमच्यासोबत आम्हाला घ्यायचे होते. ते दोघे एकत्र राहिले असते ते शक्य नव्हते, त्यामुळे त्यांच्यात अंतर निर्माण होईल, असे पाऊल टाकणे गरजेचे होते. आम्ही सांगेल ते शिवसेनेने ऐकले पाहिजे, असा एक वर्ग भाजपत होता, तर शिवसेनेशिवाय शक्य नाही, असा सांगणाराही एक वर्ग होता. हे हेरूनच आम्ही भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. भाजप आणि शिवसेनेने एकत्र येऊ नये, यासाठी तो निर्णय विचारपूर्वक घेतला होता. तो पुढे न्यायचा नव्हता. दोघांत एकवाक्यता राहू नये, अशीच त्यामागची भूमिका होती. त्यानुसार अगोदर सुरू असलेली चर्चा २०१९ ला स्पष्ट झाली.

मोदी आणि मनमोहनसिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आता पूर्वीसारखा आत्मविश्वास दिसत नाही. ते बोलतात, ते खरे नाही. बोलतात ते करत नाहीत, असे आता लोकच बोलू लागले आहेत. महागाईवरून त्यांनी मनमोहनसिंग यांच्यावर कठोर टीका केली होती. मला पन्नास दिवस द्या, मी महागाई कमी करतो, असे ते म्हणाले होते. मात्र, तसं काही घडलं नाही. उलट मनमोहनसिंग यांच्या काळात पेट्रोल ७१ रुपये होते, तर आता ते १०६ रुपयांवर पोचले आहे. घरगुती गॅस सिलिंडरही दुप्पट झाला आहे. पूर्वी मनमोहनसिंग पंतप्रधान होते, त्यावेळी सरकारला एक वर्ष झाले की पत्रकार परिषद घेऊन सरकारचा लेखाजोखा मांडला जायाचा. पण नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही. राज्यसभेचे अधिवेशन २५ दिवस चालले, त्यातील तेवीस दिवस ते सभागृहात फिरकलेसुद्धा नाहीत. संसदीय कामकाज पद्धतीवर त्यांचा विश्वास नाही, हे यातून दिसून येते.

हेगडेंचे ते विधान इंडिकेशन

मोदींना घटनादुरुस्ती करायची असल्याने आम्हाला चारशे जागा पाहिजेत, असे कर्नाटकातील अनंत हेगडे नावाच्या खासदारने सांगितले होते. एक खासदार असे बोलत असेल तर ते एक इंडिकेशन आहे, असे आम्हाला वाटते. घटनेची चिरफाड मोदींच्या काळात होण्याची शक्यता आहे, असा संशय लोकांच्या मनात आहे, असेही शरद पवार यांनी २०१४, २०१९ आणि सद्यस्थितीत फरक असल्याचे स्पष्ट केले.

बारामतीत अजूनपर्यंत वेगळा निकाल लागलेला नाही

बारामतीत आमचे अनेक वर्षांपासूनचे काम आहे. मला आणि आमच्या विचारधारेला बारामतीच्या लोकांनी अनेक वर्षांपासून पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे बारामतीत अजूनपर्यंत कधी वेगळा निकाल लागलेला नाही, असेही शरद पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT