Prakash Solanke-Ajit Pawar Sarkarnama
विशेष

NCP Karjat Shibir : प्रकाश सोळंकेंना राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाचा शब्द दिला होता; अजित पवारांचा गौप्यस्फोट

Vijaykumar Dudhale

Raigad News : माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांना २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री व्हायचं होतं, पण मंत्रिपद न मिळाल्याने ते प्रचंड नाराज होते. त्यातून त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मी आणि जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढली. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष करण्याचा मी आणि जयंत पाटलांनी शब्द दिला होता. त्यावेळी सोळंके यांनी ऐकले. पण, त्यांना दिलेला शब्द पाळला नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. (Prakash Solanke was promised to give post of NCP state working president : Ajit Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे रायगडमधील कर्जतमध्ये दोन दिवसांचे शिबिर सुरू आहे. त्याच्या समारोपाच्या भाषणात अजितदादांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाबाबत भाष्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कर्जतच्या शिबिरात बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रकाश सोळंके यांना मंत्री व्हायचं होते. मात्र, मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. अशोक डक, मी, प्रकाश सोळके, जयंत पाटील आणि काही वेळेला धनंजय मुंडे अशा आमच्या बैठका होत होत्या. आताच सरकार आलं आहे, त्यामुळे एवढ्या टोकाची भूमिका घेऊ नका, अशी आम्ही त्यांची समजूत काढत होतो.

प्रकाश सोळंके यांचं एकच म्हणणं होतं, की पक्षासाठी मी काय कमी केलं आहे. शेवटच्या टर्ममध्येही मला तुम्ही दीड वर्ष आधीच मंत्रिमंडळातून काढून टाकलं. त्याचं कारण काय आहे. पक्षाने ही भूमिका का घेतली, हे मला कळलं पाहिजे. आता पक्ष सत्तेवर आला आहे, त्यामुळे मला मंत्रिपद मिळालंच पाहिजे. अशी त्यांची रास्त मागणी होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अजितदादा म्हणाले की, शेवटी मी आणि जयंत पाटील यांनी प्रकाश सोळंके यांना खूप समजावून सांगितलं, असं करू नका. सुरुवातीला मिठाचा खडा लागणं बरोबर नाही. त्यानंतर जयंत पाटील आणि मी राष्ट्रवादी भवनमध्ये प्रकाश सोळंके यांना कार्याध्यक्षपदाचा शब्द दिला. जयंत पाटील यांनी त्यावेळी सांगितलं की, मी एक वर्ष प्रदेशाध्यक्ष राहतो. एक वर्षानंतर तुम्ही कार्याध्यक्षाचे प्रदेशाध्यक्ष व्हा. संघटनेची जबाबदारी तुम्ही पार पाडा. त्यावेळी त्यांनी ऐकलं.

आम्ही शब्द देऊन एक वर्ष झालं. त्याची आठवण मी जयंत पाटील यांना करून दिली होती. त्यावेळी त्यांनी वरिष्ठ म्हणत आहेत की, तुम्हीच काम करा. त्यावर मी जयंत पाटील यांना सुचविले की, तुम्ही वरिष्ठांना सांगा की माझ्याकडे मंत्रिपद आहे, त्यालाच मला वेळ देता येत नाही. जलसंपदा विभागाची मोठी जबाबदारी हेाती. पण, सोळुंके यांना कार्याध्यक्ष काही केलं नाही. शब्द दिल्यानंतर एखादा महिना मागे पुढे होऊ शकतो. पण तो पाळला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT