Rajesh Kshirsagar-Satej Patil
Rajesh Kshirsagar-Satej Patil Sarkarnama
विशेष

शिवसेनेचे राजेश क्षीरसागर ‘नॉट रिचेबल’ : सतेज पाटील म्हणतात ‘आमचं ठरलंय...’

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला सोडल्याने शिवसैनिकांमधून उघडपणे नाराजी दर्शविण्यात येत आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) हे शुक्रवारपासून ‘नॉट रिचेबल’ असल्याने महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांची प्रतिक्रिया आली आहे. माझी क्षीरसागर यांच्यासोबत बैठक झाली आहे, त्यात मुख्यमंत्री देतील तो आदेश पाळण्याचं आमचं ठरलं आहे, त्यामुळे महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवावी लागेल, असे पाटील यांनी या वेळी सांगितले. (Satej Patil says on Shiv Sena's Rajesh Kshirsagar's Not Reachable)

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची एकत्रित पत्रकार परिषद झाली. त्यात पाटील यांनी वरील गोष्ट सांगितली. क्षीरसागर यांच्या नाराजीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, कोल्हापूर उत्तर मतदारसंघ कॉंग्रेसला सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शब्दासाठी महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या नेत्यांना काम करावे लागणार आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, राजेश क्षीरसागर आणि मी अशी आमची एक बैठक झाली आहे. त्यावेळी मुख्यमंत्री देतील तो आदेश पाळण्याचे आमचं ठरलेले आहे. भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.

महाविकास आघाडी अस्तित्वात येत असताना ज्या पक्षाचा आमदार, त्याच पक्षाचा उमेदवार असे ठरले होते. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस पक्षाचा आमदार होता. त्यामुळे ही जागाही कॉंग्रेसकडे राहिली आहे. असे असले तरीही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविली जाईल. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्‍नीला उमेदवारी देऊन निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती मी केली होती, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आयात केलेला उमेदवार दिल्याने त्यांच्या कार्याकर्त्यांमध्ये खदखद आहे. देशात कोणतीही लाट असली तरी कोल्हापूरकरांच्या मनात वेगळचं असतं. मागील निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन या पोटनिवडणुकीत महाआघाडीच्या जयश्री जाधव यांचा विजय निश्चित आहे, असा दावाही गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला. तसेच, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जयश्री जाधव यांचे नाव पक्षश्रेष्ठीकडे दिल्लीला पाठविले आहे. देशातील पाच ठिकाणी पोटनिवडणूक होत असून दोन दिवसांत या पोटनिवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारांची नावे एकत्रितपणे दिल्लीतून जाहीर होतील, असेही त्यांनी सांगितले.

‘एमआयएमचा दावा तपासून पहावा लागेल’

अर्थसंकल्पीय अधिवेशनावर २५ आमदार बहिष्कार घालणार होते. पण, त्यांनी तो घातला नाही. तोच धागा पकडून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आमच्या संपर्कात आमदार असल्याचा दावा केला असावा. पण आमदारांनी बहिष्कार घातला नाही. त्यामुळे दानवे म्हणतात, तसे काही होणार नाही. आणि एमआयएमला आत्ताच चारचाकासाठीचा सक्षात्कार कसा झाला, हे तपासून बघावे लागेल, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.

राजू शेट्टींची नाराजी दूर होईल

शेतकऱ्यांच्या दोन मागण्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडल्या आहेत. त्यावर सरकारकडून तोडगा काढण्याचे काम केले जात आहे. त्यांची नाराजी लवकरच दूर करण्यात येईल, असे सतेज पाटील यांनी सांगितले. याबाबत हसन मुश्रीफ म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजू शेट्टी हे नेहमी आंदोलन करत असतात. महायुतीमध्ये असतानाही त्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले होते. त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT