एकेकाळी लहान भाऊ असलेला भाजप आज किती मोठा झाला याचे आत्मचिंतन दोन्ही शिवसेनेवाले करतीलही. एकनाथ शिंदे यांना पक्ष प्रमुख म्हणून भाजपाच्या मागे फरफटत जावे लागेल का? स्वत:च्या पक्षाचा झंझावात ते टिकवून ठेवतील का? प्रत्येक गावात शाखांची बांधणी करतील का? राज्यात पक्ष खरंच विस्तारेल का? हे प्रश्न आहेत. सत्ता मिळाली असली तरी पक्षाबाबत एकनाथ शिंदे यांनाही गाफील राहून चालणार नाही.
हो ना करत म्हणत शेवटी एकनाथ शिंदेंना ‘उप’वर समाधान मानावे लागले. ते मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री बनले. साहेबांच्या नावापुढे ‘उप’ आणि ‘मुख्यमंत्री’ही लागले याचे समाधान त्यांच्या समर्थकांना झाले असेलच. मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री किंवा मंत्री झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. शिवाजीराव निलंगेकर पाटील असतील किंवा नारायण राणे असतील. तेही मुख्यमंत्री होते. पुढे ते महसूलमंत्री बनलेच होते. काहीही असले तरी खुर्ची महत्त्वाची असतेच. साहेब मंत्रिमंडळात आहेत याचा आधार पाठीराख्यांना असतोच. शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखही आहेत. ही दोन्ही पदेही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.
शिंदे मंत्री बनले आहेत. पक्ष सत्तेत असणे त्याचा फायदा असतो आणि ज्याच्याकडे गृहमंत्रीपद असते. त्या पक्षाची वाढही होते असे मानले जाते. काही असले तरी आज भाजप राज्यात सर्वात प्रबळ पक्ष बनला आहे. पुन्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री बनले आहेत. आज या पक्षाचे १३२ आमदार असले तरी पुढील पाच वर्षांचे नियोजन लगेच सुरू होते. त्या तुलनेत इतर पक्षांत तशी तयारी होत असल्याचे चित्र दिसत नाही. महायुतीत तीन पक्ष आहेत. त्यामध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी कॉँग्रेसही आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही चांगले यश खेचून आणले असले तरी भाजपच्या पाठिंब्याशिवाय ते शक्यही नव्हते. तिघांची ताकद, लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना फायदा झाला. विरोधक ते मानण्यास तयार नाही. त्यांना ‘इव्हीएम’वर संशय आहे. आजचा विचार केला तर महायुतीने बाजी मारली आहे. ते जिंकले आहेत.
आता प्रश्न उरतो तो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा. मुंबईत महापालिका निवडणुका आहेत. भाजपच्या साथीने ते मुंबईत किती यश खेचून आणतात हे महत्त्वाचे आहे. तसे पाहले किंवा तुलना करायची तर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेची ताकद मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा अधिक आहे. काही मंडळी शिवसेनेबरोबर आहेत. मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षांमध्ये संघर्ष आहे.
मराठी माणसाच्या मतांचे उद्या समजा विभाजन झाले तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फटका बसू शकतो. शिंदे हे काहीही करून मुंबईत आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करतील. एकेकाळचा ठाण्याचा गड असो किंवा कोकण, मराठवाडा तेथे शिंदेंच्या शिवसेनेने यश खेचून आणले आहे. ठाण्याच्या गडावर आज तरी त्यांच्याच पक्षाचे वर्चस्व आहे. ठाण्याबरोबरच मुंबईत पक्षाचे अधिक नगरसेवक आणण्यासाठी शिंदे कंबर कसतील. पण, ठाण्यासारखी परिस्थिती तेथे नाही. कारण मुंबईत उद्धव शिवसेना जोरात आहे.
ठाणे, कोकण, मराठवाडा आणि मुंबईतील आपल्या खास शिलेदारांना पुन्हा मंत्री करावे लागणार आहे. निवडणुकीत जो विजय मिळविला आहे तो टिकवावा लागणार आहे. शेवटी पक्षाला विजयी केले आहे त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेकडून (Shivsena) पदाधिकाऱ्यांबरोबर लोकांच्याही अपेक्षा वाढणार आहेत. १९९५ मध्ये राज्यात युतीची सत्ता होती. पाच वर्षे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. तरीही राज्यातील जनता भाजपपेक्षा शिवसेनेवर नाराज होती.
पक्षाची एकून कार्यपद्धती त्यावेळी लोकांना पचली नाही. समोर विरोधात खुद्द शरद पवार यांच्यासारखा नेता होता हे ही लक्षात आले नाही. सत्ता मिळते. पुन्हा ती मिळविण्यासाठी पुढील पाच वर्षे कामाला लागावे लागते. सरकारी योजना लोकांपर्यंत पोचवाव्या लागतात. तसे झाले तर यश मिळू शकते. येथे विरोधक खिळखिळे बनले आहेत. राज्य ढवळून काढेल, असा नेता आज तरी विरोधी बाकांवर दिसत नाही. हे झाले विरोधकांचे.
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुरब्बी राजकारणी आहेत. ते मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाशी महायुतीची गरजच पडणार नाही अशी ताकद पुढील पाच वर्षांत निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न राहतील. भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. पण, बहुमतात एकट्याचे सरकार भाजप आणण्यासाठी एक एक पाऊल टाकत राहील. विरोधकांबरोबरच महायुतीतही भाजपचेच (BJP) आव्हान एकनाथ शिंदे यांच्यासमोर असेल असे वाटते. विरोधकांना आज फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने आसमान दाखविले आहे.
एकेकाळी लहान भाऊ असलेला भाजप आज किती मोठा झाला याचे आत्मचिंतन दोन्ही शिवसेनेवाले करतीलही. एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख म्हणून भाजपच्या मागे फरफटत जावे लागेल का? स्वत:च्या पक्षाच्या झंझावात ते टिकवून ठेवतील का? प्रत्येक गावात शाखांची बांधणी करतील का? राज्यात पक्ष खरंच विस्तारेल का? हे प्रश्न आहेत. सत्ता मिळाली असली तरी पक्षाबाबत एकनाथ शिंदे यांनाही गाफील राहून चालणार नाही. प्रत्येक नेत्यांवर पक्षांची कोणती जबाबदारी देतात हे ही पहावे लागेल. काही असले तरी खरे आव्हान आता मोठ्या भावाचेही असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.