Padmsinh Patil -Jitendra Awhad Sarkarnama
विशेष

Maharashtra Politic's : ...तेव्हा पद्मसिंह पाटील मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा होती; पण दुसऱ्या दिवशी नाईकांचे नाव जाहीर झालं : आव्हाडांनी सांगितली ती घटना!

Jitendra Awhad Post : काँग्रेसच्या एका नेत्याचा हात डॉक्टरांनी पकडून फक्त दाबला, तर त्या नेत्याच्या डोळ्यांत अश्रू आले होते. म्हणजे कुठल्या ताकतीने तो हात दाबला असेल याचा नुसता विचारच करावा...

Vijaykumar Dudhale

Mumbai, 01 June : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठीशी आमदार जितेंद्र आव्हाड कायम उभे असतात. राज्यातील शरद पवारनिष्ठांमध्ये आव्हाडांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पण, माजी पाटबंधारे मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि माजी खासदार सुरेश कलमाडी हे दोघे आव्हाडांना पवारांकडे घेऊन गेले होते, हे आव्हाडांनीच पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगितले आहे. तसेच, शरद पवार संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री कोण, अशी स्पर्धा लागली होती. त्यावेळी डॉ. पद्मसिंह पाटील हे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा होती. आदल्या दिवशी त्यांनी मला तसं सांगितलंही होतं. पण, दुसऱ्या दिवशी सकाळी सुधाकरराव नाईक यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर झाले.

डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार आव्हाड यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहेत. त्यात त्यांनी नव्वदच्या दशकातील राजकारणांना उजाळा दिला आहे. यात आव्हाडांनी पाटलांच्या विविध आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच, मला खरं तर शरद पवार यांच्या दारात दोन माणसे घेऊन गेली होती, त्यांना मी कधीही विसरु शकत नाही. एक म्हणजे डॉ. पद्मसिंह पाटील आणि दुसरे म्हणजे सुरेश कलमाडी, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. पद्मसिंह पाटील (Padmasinh Patil ) यांच्याबाबत लिहिलेली पोस्ट... हा लेख प्रेमळ डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासाठी...सदैव वाहणारा एक नितळ खळखळणारा माणुसकीचा झरा. तो 1989-90 चा काळ होता. माझी डॉक्टरांशी ओळख कशी व कुठे झाली, हेच मला आठवत नाही. कारण त्यांनी मला इतकं जवळ केले की, जणू काही मी त्यांच्या घरातलाच. निष्ठा काय असते हे खरतंर मी त्यांच्याकडूनच शिकलो. आपला नेता जे सांगेल ती लक्ष्मणरेषा....

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात1991 मध्ये महाराष्ट्रात काही जणांनी बंड केले होते. त्या बंडाला सामोरे जाताना मी त्यांना बघितले...एखाद्या कार्यकर्त्याने जे करावं, ते डॉक्टर करत होते. आपल्या वयाचा विचार न करता त्यांचं वागण मी बघितलं आहे. काँग्रेसच्या एका नेत्याचा हात डॉक्टरांनी पकडून फक्त दाबला, तर त्या नेत्याच्या डोळ्यांत अश्रू आले होते. म्हणजे कुठल्या ताकतीने तो हात दाबला असेल याचा नुसता विचारच करावा...तेव्हाचे एक महासचिव जे या बंडात शरद पवारांच्या विरोधात होते, ते एका कॅबिनमध्ये बसले असता फोन खणखणला. फोनजवळ डॉ. पाटील बसले होते. दोघांचाही हात फोन उचलायला गेला. डॉक्टरांनी फोन तर उचललाच, पण उचलता उचलता तो फोन त्या नेत्याच्या तोंडावर बसला.. ते कसं झाले असेल, ते तुम्हीच समजून घ्या, असा किस्साही त्यांनी सांगितला.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, शरद पवार संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेले. जाताना इथे मुख्यमंत्री कोण, याची स्पर्धा सुरु झाली. पवारांच्या जवळच्यांना वाटत होते की, डॉ. पद्मसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री व्हावं. मला त्यावेळी हे गट तट काहीच माहिती नव्हते. पण, डॉक्टर मुख्यमंत्री व्हावेत, असं वाटत होतं... तसे त्यांनी संध्याकाळी मला सांगितलं होतं कि, सकाळी लवकर ये, आपले नाव होईल असं वाटतंय. पण, नंतर जे काही झाले, ते वेगळेच होते. सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री झाले. नाईक मुख्यमंत्री झाल्यानंतर बाबरी मस्जिद पडली, त्यानंतर राजकारणाला वेगळं वळण लागले. डॉ. पाटील हे शरद पवारांसाठी पुन्हा सक्रिय झाले.

डॉ. पाटील आणि सुधाकरराव नाईक यांच्यात दुरावा कायम होता. त्याकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख हे होते. प्रणव मुखर्जी, जी. के. मुपनार आणि जनार्दन पुजारी हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक म्हणून मुंबईत आले होते. त्यांना भेटायला हायमाऊंट या शासकीय विश्रामगृहात सुधाकरराव नाईक आले. नाईक यांच्या जमावाने पवारांच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली असता, तिथे आमची झटापट झाली. मी आणि मदन बाफना आम्ही दोघेच त्या ठिकाणी होतो. झटापटीत नाईक यांना धक्का लागला आणि ते खाली पडले. ही तक्रार सुधाकरराव नाईक यांनी प्रणव मुखर्जी व जी. के. मुपनार यांच्याकडे केली. तिथून काही अंतरावर राहत असलेल्या डॉक्टरांना लगेच बोलाविण्यात आले, असेही आव्हाड यांनी नमूद केले आहे.

आव्हाडांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, डॉक्टरांनी जाताना मला आणि मदन बाफनांना विचारले काय झाले? आम्ही सर्व सविस्तर सांगितले. ते वरुन खाली आले आणि आमच्याकडे बघून हसले. तेवढ्यात मुंबई पोलिसांची गाडी आली. त्या गाडीमधील एकाने उतरून मला बोलावले. माझे नशीब चांगले क, त्याचवेळी डॉ. पाटील खाली आले होते. मला पोलिस बोलावत आहेत, हे बघितल्यानंतर ते स्वत:च पुढे आले आणि विचारले काय झाले. पोलिसांनी सांगितले की, चौकशीसाठी न्यायचे आहे. तेव्हा त्यांनी त्यांच्याच स्टाईलमध्ये सांगितलं,‘ह्या घरातल्या भांडणात तुमचे काही काम नाही, चला जा,’ त्यांनी मला सांगितले गाडीत बस आणि मला स्वत:च्या निवासस्थानी घेऊन गेले..

आम्ही बरीच वर्षे डॉ. पाटील यांच्या सानिध्यात काम केलं आहे. ते जेव्हा पाटबंधारे विभागाचे मंत्री होते. तेव्हा ठाण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी मी त्यांच्याकडे हट्ट धरला. तेव्हा माझा बालहट्ट हो बालहट्टच होता. कारण मला वाटायचं की, आपल्या ठाण्याला आणि ठाणेकरांना स्वतःच्या हक्काचं धरण आणि पाणी मिळावं, यासाठी माझा हट्ट होता. तो पूर्ण करण्यासाठी म्हणून मुंबईला देण्यासाठी 1952 मध्ये चितळे आणि गोडबोले आयोगाने सुचविलेले धरण हे त्यांनी मुंबई महापालिकेच्या नावावरुन काढून ठाणे महापालिकेच्या नावावर केले होते, अशी आठवणही आव्हाड यांनी सांगितली.

आव्हाड म्हणाले, हे धरण झाल तर 2040 पर्यंत ठाण्याचा पाणीप्रश्न मिटेल अशी परिस्थिती त्यावेळी होती. त्यांनी आडेवेडे न घेता ते धरण ठाणे महापालिकेला देऊ केले. पण त्यानंतर शासन आणि महानगरपालिकेत समज गैरसमज होत गेले आणि महापालिकेने ते धरण करण्यास नकार दिला आणि इतकी मोठी मोठी पदं मिळूनही ठाण्याला आजही स्वतःचे हक्काचे पाणी नाही...

त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगता येतील. त्यांच्या सानिध्यातील दिवस हे कधीच विसरता येणार नाहीत. राष्ट्रपती उभे आहेत. बाजूला शरद पवार होते....दोघेही विमानतळावर आणि डॉ. पद्मसिंह पाटील त्यांच्या बाजूलाच उभे होते. मी बाहेर गर्दीत उभा असताना ते ओरडून म्हणाले ‘बंटी आतमध्ये ये.’ हे मी कधीच विसरणार नाही. मला आजही आठवते की, 9 मे 1991 रोजी मी औरंगाबाद येथे होतो. राजीव गांधी हे औरंगाबादला प्रचारासाठी आले होते. आतमध्ये राजीव गांधी, त्यांचे मित्र सुमन दुबे, शरद पवार, प्रदेशाध्यक्ष निलंगेकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील हे बसलेले होते. बाहेर एक पोलिस धावत आला आणि माझ्या कानात येऊन म्हणाला तुम्हाला आतमध्ये बोलावले आहे. आतमध्ये डॉक्टरांनी मला बोलावून घेतले आणि जवळ-जवळ 1 तास राजीव गांधी यांच्याबरोबर शरद पवार गप्पा मारत असताना मी शांतपणाने हे सगळं बघत होतो. हे सगळं केवळ डॉक्टरांमुळे माझ्या आयुष्यात घडलं, अशी भावनाही आव्हाडांनी बोलून दाखवली.

आव्हाड म्हणाले, हे सगळं असतानाही त्यांची मातृभक्ती ही वाखणण्याजोगी होती. एवढा मोठा कॅबिनेट मंत्री, त्यांचा संपूर्ण राजकीय वर्तुळातील दरारा हे सगळं असताना त्यांच्या आईला ते दररोज संध्याकाळी फिरायला घेऊन जायचे. त्यांच्या बिल्डिंगला लिफ्ट नव्हती. आई तिसऱ्या माळ्यावर भावाबरोबर राहायची. डॉक्टर तीला स्वतःच्या पाठीवर उचलून घेऊन खाली आणायचे आणि फिरायला घेऊन जायचे आणि परत उचलून घेऊन घरी आणून सोडायचे. हे सगळं एका माणसाच्या व्यक्तीचारित्र्यामध्ये असणं ह्याच मला आश्चर्य वाटतं.

त्यांच्या स्वभावामुळे राजकारणात त्यांची दहशत तर होतीच. पण, स्वकियांबरोबरच विरोधकांमध्येही आदरयुक्त भीती होती. आज डॉ. पद्मसिंह पाटील यांचा वाढदिवस आहे. थकलेल्या डॉक्टरांचा आवाज ऐकला की, मन अस्वस्थ होतं. आजही मुंबईत कुठलीही राजकीय हालचाल झाली की, सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान त्यांचा फोन येणार आणि परिस्थितीबद्दल विचारणा करणार. त्यांच्या मनातलं शरद पवार साहेबांविषयीचे प्रेम हे त्यांच्या प्रत्येक शब्दांत आजही दिसून येते. त्यांची प्रकृती ठणठणीत राहो आणि ते शतकवीर होवो ह्याच शुभेच्छा!

-आपला सदैव नम्र,

आपलाच बंटी

जितेंद्र आव्हाड

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT