Vanchit Bahujan Aghadi
Vanchit Bahujan Aghadi Sarkarnama
विशेष

Vanchit Bahujan Aghadi News : 'वंचित'ची फळी होतेय खिळखिळी? 6 जागांवर बदलले उमेदवार

Roshan More

संदीप चव्हाण

Loksabha Election : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 41 लाखांहून अधिक मत वंचित बहुजन पक्षाच्या उमेदवाराने घेतले. वंचिने विविध पक्षांच्या 13 उमेदवारांना घरी बसवण्यात हातभार लावला. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला झालंय काय? असा प्रश्न निर्माण होतो आहे. कारण वंचिने उमेदवारी दिलेल्या उमेदवारांमधील तब्बल 06 जागांवर दिलेले उमेदवार बदलण्याची किंवा उमेदवारांनी ऐनवेळी माघार घ्यावी लागली. त्यामुळेच 2019 मध्ये बनलेली वंचितची मजबूत फळी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत खिळखिळी होत चाललीये का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आतापर्यंत वंचितकडून तब्बल 06 जागांवर आधीचे उमेदवार बदलून नवे उमेदवार देण्यात आले आहेत. आपल्या उमेदवारांनी अचानक माघार घेतल्यानं या निवडणुकीत तब्बल 04 जागांवर अपक्ष अथवा इतर पक्षीय उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागण्याची वेळही या वेळी वंचितवर आलीये. पुण्यातून अभिजित वैद्य यांना उमेदवारी द्यावी, असे प्रकाश आंबेडकरांनी Prakash Ambedkar सर्वांत आधी म्हटले होते. पण शेवटी उमेदवारी मनसेतून बाहेर पडल्यानंतर आयात केले गेलेले नेते वसंत मोरे यांना देण्यात आली.

शिरुरमध्ये सर्वात आधी मंगलदास बांदल यांना तिकीट जाहीर केले होते. मात्र, बारामतीमधून Baramati Loksabha पक्षाने उमेदवार दिला पाहिजे, अशी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत वंचितने बांदल यांची उमेदवारी रद्द केली. नंतर ती भीमा-कोरेगाव जय स्तंभचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांना दिली गेली, पण त्यानंतर फायनल उमेदवारी कुणाला मिळाली तर आफताब शेख यांना. जळगावमध्ये प्रफुल्लकुमार लोढा यांना आधी उमेदवारी दिली गेली मात्र त्यांनी मैदानातूनच माघार घेतली. 'जळगाव लोकसभेतून मी निवडून येऊ शकत नसल्यानं मी स्वतः कोणताही दबाव नसताना माघार घेत आहे,' असं लोढा यांनी जाहीर केल्यानंतर जळगावमध्ये युवराज जाधव यांना उमेदवारी देण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिंडोरीत सुरुवातीला गुलाब बर्डे यांना उमेदवारी देण्यात आली होती, पण त्यांनी माघार घेतल्यानं त्यांच्या जागी मालती थविल यांना उमेदवारी देण्यात आली. साताऱ्यातही तेच घडलं. आधी घोषित करण्यात आलेले उमेदवार मारुती जानकर यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या जागी प्रशांत कदम यांना उमेदवारी देण्यात आली. अमरावतीत सर्वांत आधी प्राजक्ता पिल्लेवान यांचं नाव घोषित केलं गेलं. मात्र त्यांना ऐनवेळी उमेदवारी अर्ज न भरण्यास सांगण्यात येऊन अमरावतीतून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या आनंदराज आंबेडकरांना वंचितनं पाठिंबा दिला.

रामटेकमधूनदेखील शंकर चहांदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, किशोर गजभिये यांना ऐनवेळी पाठिंबा देऊन वंचितनं तिथंही आपला उमेदवार माघारी घेतला. परभणीत सर्वांत आधी बाबासाहेब उगले यांना उमेदवारी दिली गेली, पण त्यानंतर अचानक त्यांच्याकडून उमेदवारी काढून घेत ती पंजाबराव डख यांना दिली गेली. यवतमाळमधून तब्येतीच्या कारणास्तव सुभाष खेमसिंग पवार यांनी माघार घेतल्यानंतर अभिजित राठोड यांनी वंचितकडून अर्ज दाखल केला. मात्र, राठोड यांचा अर्जच बाद झाल्यानं त्या ठिकाणी समनक जनता पक्षाचे उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या अनिल राठोड यांना वंचितकडून पाठिंबा देण्यात आला.

सोलापूरमध्ये उमेदवाराची माघार

'पक्षानं मला बंदूक तर दिली मात्र गोळ्या दिल्या नाहीत,' असं म्हणत सोलापुरातील वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. आता सोलापुरात वंचितनं अपक्ष उमेदवार आतिश बनसोडे यांना पाठिंबा देऊ केलाय. मुंबईत अबुल खान यांना आधी उत्तर मध्यमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांना दक्षिण मध्यमधून उमेदवारी देण्यात आली.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT