Ajit Pawar-Sharad Pawar Sarkarnama
विश्लेषण

Ajitdada On Sharad Pawar : बारामतीचे मतदान संपताच 40 तासांतच अजित पवार म्हणाले, ‘पवारसाहेब आमचे दैवत....’

Vijaykumar Dudhale

Pune, 09 May : भारतीय जनता पक्षासोबत गेल्यापासून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टोकाची टीका करणारे, भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावरून पवारांना खोटे ठरविण्याचा प्रयत्न करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर तालुक्यातील सभेत बोलताना ‘पवारसाहेब आमचे दैवत आहेत,’ असे विधान केले. बारामती लोकसभेच्या रणांगणांत ज्यांच्याविरोधात टोकाचा संघर्ष केला, त्या पवारांविषयी अजितदादांनी बारामतीचे मतदान संपताच अवघ्या ४० तासांतच हे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची केंदूर येथे सभा झाला. त्या सभेत बोलताना अजितदादांनी ‘पवारसाहेब हे आमचे दैवत आहेत, यात कुठेही दुमत नाही’, असे असे म्हटले आहे. ते विधानामागची पार्श्वभूमी महत्वाची मानली जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार हे जुलैमध्ये महायुती सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी घेतलेल्या मुंबईतील मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वयावरून त्यांच्यावर टीका केली गेली. पवारसाहेब आता 84 वर्षांचे झाले आहेत, त्यांनी आता घरी बसून आम्हाला मार्गदर्शन करावे, असे त्यांनी म्हटले होते. पुढे अनेक सभांमध्ये त्यांनी हा मुद्दा लावून धरला. त्याचबरोबर 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा काँग्रेसपेक्षा अधिक येऊन मुख्यमंत्रिपदाबाबत घेतलेल्या निर्णयावरूनही अजितदादांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे.

अजित पवारांच्या टीकेला खरी धार बारामती मतदारसंघात आली. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात होत्या. बारामतीच्या प्रचारात अजित पवार यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांच्या विरोधात जोरदार टीकास्त्र सोडले. विशेष म्हणजे अजित पवारांवरही ‘मलिदा गॅंग’ म्हणत रोहित पवारांकडून टीका झाली. मात्र अजितदादांकडून शरद पवारांवर टोकदार टीका झाली. भाजपसोबत जाण्यापासून शरद पवार यांनी अनेकदा कशी माघार घेतली, याचा सविस्तर पाढा अजित पवार वाचत होते. तसेच, आता घरी बसून आम्हाला आशीर्वाद द्या, असे सांगून अजित पवार हे पक्षावर दावा करत होते.

मी पवारसाहेबांचा मुलगा असतो, तर मला संधी मिळाली असती की नाही. मी पवारसाहेबांचा मुलगा नसल्यामुळेच मला संधी नाकारण्यात आली. आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतला नाही, यात आमची काय चूक आहे, असे विधानही अजित पवार यांनी केले होते. तसेच, भाजपला अनेकदा शब्द देऊन त्यापासून पवारसाहेब माघारी फिरले, असे अजितदादांनी अनेक सभांमधून सांगितले आहे. मात्र, आपण शब्दाचे पक्के, मी शब्द पाळणारा, असे सांगून शब्द पाळण्यासाठीच 72 तासांच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री झालो, असे ते सांगत होते. त्यातून पवारांनी अनेकदा शब्द फिरवला, असे अप्रत्यक्ष अजित पवार यांनी अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला.

बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक संपताच अवघ्या 40 तासांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार हे आमचे नेते आहेत. या वयात त्यांना आता त्यांच्या जवळच्या लोकांनी त्रास देऊ नये, असे म्हटले आहे. तसेच, शिरूरमधील सभेत बोलताना पवारसाहेब हे आमचे दैवत आहेत, असे विधान केले आहे, त्यामुळे अजितदादांच्या विधानाची चर्चा रंगत आहे.

चंद्रकांतदादांच्या त्या विधानावरही नाराजी

दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात ‘शरद पवार यांना बारामतीतून संपवणार’ असं विधान केलं होतं. बारामती निवडणूक होईपर्यत अजित पवार त्याबाबत गप्प होते. निवडणूक संपल्यानंतर अजित पवार त्याबाबत जाहीपणे बोलले. चंद्रकांतदादांचं हे विधान चुकीचं होतं. जी व्यक्ती निवडणुकीला उभीच नाही, त्या व्यक्तीला पराभूत करायचं म्हणता, हे बरोबर नव्हतं, अशी नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT