Congress, BJP Sarkarnama
विश्लेषण

Ashok Chavan : काँग्रेस फोडणाऱ्या भाजपला हरण्याची भीती ?

Sachin Deshpande

Maharashtra Political News : नैतिकतेच्या मुद्द्यांअडून राजकारणा करणाऱ्या भाजपला महाराष्ट्रात लोकसभा हरण्याची भीती तर वाटत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. काँग्रेसचे अनेक नेते भाजप गळाला लावण्याच्या तयारीत आहेत. आदर्श घोटाळ्यात अडकलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजप घेणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

चव्हाण यांच्यासोबत इतरही आमदारांनी काँग्रेस सोडण्याची तयारी सुरू केली आहे, पण हे सर्व भाजपसोबत जाणार की महायुतीच्या इतर घटक पक्षांमध्ये विभागले जाणार, असा प्रश्न चर्चिला जात आहे. भाजपमध्ये आल्यावर वॉशिंग मशिनमधून धुतल्यासारखेच स्वच्छ होतात हा समज समोर येत आहे. आदर्श घोटाळ्यात नाव असलेले अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये जाण्याचे वृत्त हे खरे ठरल्यास भाजपने उपस्थित केलेल्या आदर्श घोटाळ्याचे काय, असा प्रश्न आता अनुत्तरित आहे.

लोकांसोबत कनेक्ट असलेले नेते भाजपमध्ये घेणार, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. भाजपमध्ये लोकांसोबत कनेक्ट असलेले नेते शिल्लक राहिले की नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एक प्रकारे भाजपमधील विद्यमान नेत्यांवर फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे अविश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे आता भाजपमध्ये लोकांशी कनेक्ट असलेले विरोधकच येतील काय, असा प्रश्न उपस्थित होतो. इतकेच नाही तर नांदेडमध्ये स्थानिक भाजप नेत्यांना याविषयी विचारण्यात आले नसल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यसभेसाठी उमेदवार नाहीत काय, असा प्रश्न आता भाजपमध्ये विचारला जात आहे. भाजपमध्ये राज्यसभेसाठी दमदार नेते असताना त्यांनी केवळ सतरंज्याच उचलायच्या काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे. केवळ संघटनात्मक बांधणी, प्रचार आणि प्रसारात भाजप नेत्यांना गुंतवायचे आणि काँग्रेस नेत्यांच्या गळ्यात थेट राज्यसभेची माळ घालण्याचा उद्योग नेमका महाराष्ट्रात सुरू कसा झाला, असा प्रश्न भाजप वरिष्ठ नेत्यांना पडला आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाताना अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना लाभाचे पद भाजपाने देण्याचे आश्वासन दिले, असा प्रश्न विचारला जात आहे.

भाजपमध्ये इनकमिंग होत असताना काँग्रेस त्यांच्या नेत्यांना वाचविण्यासाठी काय करत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. काँग्रेसचे मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसने आउटगोइंग थांबविण्यासाठी कुठले डिझास्टर मॅनेजमेंट केले, असा प्रश्न अनुत्तरित आहे. काँग्रेसचे अतिशय जवळचे नेते काँग्रेस सोडून जात असताना 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू असताना पक्षातील नेत्यांना जोडण्यात भाजप नेते अग्रेसर ठरले, तर काँग्रेस नेते अपयशी ठरले आहेत. अशा वेळी काँग्रेस आत्मचिंतन करत असताना भाजपलादेखील आत्मचिंतन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यामुळे तर काँग्रेसमध्ये खिंडार पडले नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. पटोले यांनी तत्काळ याविषयी वरिष्ठांना अवगत करत अशा प्रकारे पक्षफुटीचा बचाव करण्याची गरज आहे, पण अशी पावले उचलली गेली नाही तर काँग्रेसला मोठा फटका लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा निश्चितच फायदा भाजपला मिळेल, पण असे करत असताना भाजपच्या परंपरागत मतदारांना तर यामुळे धक्का बसणार नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हेकेखोरपणामुळे तर काँग्रेसमधील वरिष्ठ नेते मंडळींची गच्छंती सुरू नाही ना, असा प्रश्न आता विचारला जात आहे, पण नाना पटोले यांच्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसने किमान सोशल मीडियात, एक ठसा उमटविला. नानांमुळे तर काँग्रेसचे नेते हे सोडून चालले नाहीत ना, असा मुद्दा काँग्रेसअंतर्गत चर्चिला जात आहे. हे जर सत्य असेल तर काँग्रेस हायकमांड या विषयावर गंभीरतेने नक्कीच चर्चा केल्याशिवाय राहणार नाही.

भाजप काँग्रेस नेत्यांना जवळ करत असताना नेमके कुठली भीती भाजपला आहे, असा प्रश्न अनुत्तरित असून, याचा फायदा आणि तोटा भाजपला सहन करावा लागणार आहे. काँग्रेसचे इतर आमदार हे भाजपमध्ये जातील की, महायुतीत विखुरले जातील हे आज उद्याकडे स्पष्ट होईल. पण ही फूट फायदेशीर ठरणार की तोट्याची, हे मतदाराच ठरवतील.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT