Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणूकीपूर्वीच महायुतीमधील एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतेमंडळीने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. त्यामुळे राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून मित्रपक्षातील संघर्ष नेहमीच चव्हाट्यावर आला आहे. शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरवातीला निधी वाटपावरून मतभेद पाहावयास मिळाले तर त्यानंतर रायगडच्या पाल्कमंत्रीपदावरून या दोन पक्षात जोरदार संघर्ष पाहावयास मिळत आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरु आहे. दोन्ही पक्ष पालकमंत्री पदावर ठाम असल्याने त्यांच्यातील वादावर तोडगा निघालेला नाही. दोन्ही पैकी एकही पक्ष बॅकफूटवर येण्यास तयार नसल्याने गेल्या एकही दिवसापासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. रायगडच्या 'थ्री इडियट्स' मधल्या एका 'इडियट्स'ने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याविरुद्ध गरळ ओकली असल्याची टीका करीत त्यांचे आर्थिक घोटाळे सात दिवसात बाहेर काढणार, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला तर आनंद परांजपे यांनी एकही घोटाळा बाहेर काढून दाखवला तर मी आमदारकी सहित मंत्रिपदाचा राजीनामा देईल, असा पलटवार भरत गोगावले यांनी केला. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा निवडणुकीपूर्वीच शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय रणसंग्राम पेटण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजप (BJP), शिंदेंची शिवसेना व अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद दिसून येतात. त्यामुळे महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसत आहे. सरकार स्थापनेपासून तीनही मित्रपक्षात मंत्रिपदाची संख्या, मलईदार खाते, बंगले वाटप, पालकमंत्री पद, निधी वाटप यावरून संघर्ष पाहावयास मिळाला. हा संघर्ष सहा महिन्यापासून सुरूच आहे. यावर तोडगा काढला जात नसल्याने या तीन पक्षातील मतभेद कमी होण्याऐवजी वाढतच आहेत.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणुका लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणे महायुतीमधील तीन पक्ष एकत्रित लढणार की स्वबळावर लढणार यावर बरेच काही अवलंबुन असणार आहे. एकत्रित लढले तर या तीन पक्षातील मतभेद कमी होतील अन्यथा स्वबळावर लढायचे ठरवले तर तीन पक्षातील मतभेदामध्ये भरच पडणार आहे.
खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या भाची सुनेचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. त्या धक्क्यातून तटकरे यांचे कुटुंब अद्याप सावरलेले नाही. मात्र, दुसरीकडे भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावरून बेछूट आरोप केले आहेत. भरत गोगावले यांची गुन्हेगारी प्रवृत्ती, रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे, सार्वजनिक बांधकाम सभापती असताना जिल्हा परिषदमध्ये केलेले घोटाळे आम्ही पुढील सात दिवसामध्ये बाहेर काढणार आहोत, असा इशारा माजी खासदार आनंद परांजपे यांनी दिल्याने वादाची ठिणगी पडली आहे. त्यातच मंत्री भरत गोगावले, महेंद्र थोरवे व आमदार दळवी यांचा उल्लेख 'थ्री इडियट' असा परांजपे यांनी केला आहे. त्यामुळे ही टीका मंत्री गोगावले यांच्या जिव्हारी लागली आहे.
दुसरीकडे मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादी त्रस्त झाली आहे. जर त्यांनी घोटाळे बाहेर काढले तर मी मंत्रीपदाचा व आमदारकीचा राजीनामा देईल नसेल तर आनंद परांजपे हे त्यांच्या तोंडाला काळे फासून घेणार का? असा आव्हान त्यांनी दिले आहे. या सर्व प्रकरणावरून येत्या काळात या दोन पक्षातील वाद चिघळण्याची शक्यता अधिक आहे.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेमधील टीका टिपणीनंतर या दोन गटातील कार्यकर्त्यांमध्येही तणाव निर्माण झाला असून, दोन्ही गटांचे समर्थक सोशल मीडियावर आणि सार्वजनिक सभा-मेळाव्यांत एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. त्यामुळे या दोन गटात तणावाचे वातावरण आहे. महायुतीमधील या दोन पक्षात तणाव असला तरी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिंदे गट व अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्ताधारी युतीचा भाग असतानाही अशी वादाची ठिणगी उडणे भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. या वादावर भाजपकडून कसलंच तोडगा काढण्याचा पर्यटन केला जात नसल्याने दोन पक्षातील संघर्ष वाढतच चालला आहे
या वादामुळे येत्या काळात रायगड जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर महायुती टिकेल की नवी समीकरणं उभी राहतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या राजकीय रणसंग्रामामुळे रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. स्थानिक मतदारांनाही हे घडामोडी अधिक जागरूक आणि विचारपूर्वक निर्णय घेण्यास भाग पाडतील, असे चित्र दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.