Balasaheb Thorat News Sarkarnama
विश्लेषण

Balasaheb Thorat : सत्तासुंदरी समोर मुजरे घालणारे धोकादायक

Sachin Deshpande

Lonavala Congress :काँग्रेसच्या लोणावळा शिबिरात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातचे अनुभवाचे बोल व्हायरल झाले आहे. त्यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेत धंदेवाईक राजकीय नेत्यांचे वस्त्रहरण केले. सत्तासुंदरी समोर मुजरे घालणाऱ्या नेत्याचा धोका सत्तारुढ पक्षांबरोबर विरोधकांना कसा होतो याचे उदाहरण त्यांनी दिले. इतक्यावरच बाळासाहेब थोरात थांबले नाही तर दिल्लीस्थित काँग्रेस वरिष्ठ नेत्यांचे नाव न घेता त्यांच्या चुका स्पष्टपणे अधोरेखित केल्या. अशा सत्तासुंदरीच्या वारंवार प्रेमात असलेल्या कुंपणावरच्या नेत्यांमुळे निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेत्यांचे हाल होतात. त्यामुळे अशा कुंपणावरच्या नेत्यांना पुन्हा पक्षात स्थान न देण्याची त्यांची मागणी, सूचना निश्चित सर्वपक्षांना लागू होण्यासारखी आहे. त्याच बरोबर मतदारांनी अशा कुंपणावरील नेत्यांची निष्ठा तपासून त्यांना धडा शिकविण्याचा सल्ला बाळासाहेब थोरात यांनी दिला.

काँग्रेस मधुन अशोक चव्हाण यांनी भाजप मध्ये गेले. हे काँग्रेस नेत्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले. इतक्यावर हा विषय संपला नाही. काँग्रेसमध्ये अशा आयाराम गयारामांचा इतिहासच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी लोणावळा शिबिरात काढला. विखे पाटील यांनी वारंवार कसा पक्ष बदल केला याचे उदाहरण देत त्यांनी सत्तेसमोर हे आयाराम गयाराम कसे झुकतात आणि स्वतःच्या पदरात मंत्रीपद कसे मिळवितात याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला. त्यांनी या विषयी दिलेले उदाहरण देखील मार्मिक त्याच बरोबर वास्तविक होते. त्याच बरोबर अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये पुन्हा येतील अशी आरोळी देण्यास ही बाळासाहेब थोरातांनी मागेपुढे पाहिले नाही. पण, हे सांगताना त्यांनी काँग्रेसची सत्ता आल्यानंतर ते येतील हे ही सांगणे विसरले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाळासाहेब थोरात यांनी सत्ता आली की इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या कुंपणावरील नेत्यांवर टीका केली. जो पक्ष अशांना घेतो आणि ज्या पक्षातून असे नेते जातात त्यांना सजग करण्याचा प्रयत्न बाळासाहेब थोरात यांनी केला. अशा नेत्यांना ते पुन्हा पक्षाच्या दारात आले तर त्यांना न घेण्याचा अनुभवी राजकीय सल्ला थोरातांनी काँग्रेसला तर दिलाच त्याच बरोबर विरोधकांना देखील अप्रत्यक्षपणे दिला. अशा आयाराम गयाराम नेत्यांमुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची माती होत असल्याचे परखड मत बाळासाहेबांनी मांडले. अशोक चव्हाण आणि तत्पुर्वी विखे पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या नेत्यांना याचा अनुभव आल्याचे त्यांनी अप्रत्यक्ष सांगुन टाकेल.

कुंपणावरील नेत्यांमुळे पक्षातील मुळ नेत्यांना होणारी अडचण राजकीय दृष्ट्या घातक असल्याचे थोरातांचे बोल होते. त्यात त्यांनी चुकीचा कुठलाही मुद्दा मांडला नाही. काँग्रेसच्या शिबिरे कमी झाल्याने काँग्रेसची पिछेहाट होत असल्याची खंत थोरातांनी मांडली. या संपुर्ण भाषणात बाळासाहेब थोरात यांनी राजकारणाचा व्यवसाय करणाऱ्यांना जनतेने धडा शिकविण्याची गरज व्यक्त केली. राजकारणाचा व्यवसाय हा शब्द त्यांनी गाळत धंदेवाईक राजकारणी अशी जहरी टिका अशोक चव्हाण आणि विखे पाटील यांचे नाव न घेता केली. धंदेवाईक राजकारणी ही प्रवृत्ती असून त्यामुळे राजकारण गढुळ होत असल्याची खंत थोरात यांनी काँग्रेस च्या लोणावळा शिबिरात व्यक्त केली. दिल्लीतील बड्या नेत्यांनी अशा धंदेवाईक राजकारण्यांना दूर ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन थोरात यांनी केले. कठिण काळात संघर्ष करणारा नेता कार्यकर्ता यांना जपण्याची गरज सर्वच राजकीय पक्षांची आहे. व्यावसायिक राजकारणी, धंदेवाईक राजकारण्यांना स्थान देऊ नका. पैसा कमवायचा, उड्या मारायच्या अशा धंदेवाईक राजकारणांचा बंदोबस्त महाराष्ट्राच्या मतदारांनी करण्याची गरज व्यक्त केली आहे.

काँग्रेस (Congress),राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना (ShivSena) आणि भाजपा

(BJP) या पक्षांमध्ये नेत्यांचे वारंवार इनकमिंग आऊटगोईंग होत राहते. नेत्यांची विचारधारा ही एकाच दिवसात कशी काय बदलते असा प्रश्न आहे. अशा नेत्यांमुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी कष्ट करणाऱ्या मुळ कार्यकर्ता आणि राजकीय नेत्यांना तर याचा फटका बसतोच त्याच बरोबर संधीसाधु नेत्यांचे चांगभलं होते. राजकीय पक्षांमध्ये इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या नेत्यांवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी घेतलेली भुमिका ही निश्चितच सर्वच राजकीय पक्षांसाठी आदर्श अशीच आहे. अशा राजकीय नेत्यांना धडा शिकविण्यासाठी जो पर्यंत मतदार पुढाकार घेणार नाही तो पर्यंत राज्यातील राजकीय अस्थिरता कायमची थांबणार नाही. राज्यातील राजकीय अस्थिरता संपविण्यासाठी मतदारांना पुढाकार घ्यावा लागेल. तो पुढाकार घेताना पक्षनिष्ठांना बळ देण्याचे कार्य मतदारांनाच करावे लागेल हे मात्र नक्की. काँग्रेसच्या लोणावळा शिबिरात पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना धडा शिकविण्याचा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची शिकवण सर्वच राजकीय पक्षांनी आत्मसाद करण्यासारखी आहे.

Edited By - Sachin Deshpande

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT