कोल्हापूर : माझ्या अंगावर चिखल उडाला आहे. तर समोरच्याचा शर्ट चांगला का असावा, याच भावनेतून सध्या 'गोकुळ'मधील महायुतीतील अंतर्गत राजकारण सुरु आहे. आगामी निवडणुकीत महायुतीच्या पॅनेलमधून बाहेर ठेवणार याची कुणकुण लागल्यानेच गोकुळमधील काही संचालकांनी संस्थांच्या माध्यमातून निवेदन देऊन वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचा परिणाम म्हणून महायुतीतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
कारण सर्वांनाच गोकुळ दूध संघावर सत्ता हवी आहे. त्यासाठी सत्तेचे गणित जुळवणारा संचालक आपलाच असावा ही नेत्यांची भावना आहे. त्यामुळे एकमेकांवर तुटून पडण्याची भूमिका घेतली.त्यातून गोकुळ दूध संघाची बदनामी होत आहे. गोकुळमध्ये 'कर्मकांड' करणारे निराळेलच राहिलेत,पण त्याला नेत्यांना तोंड द्यावे लागत आहे. तर दुसरीकडे सर्वच नेते त्याच ठगांची पाठराखण करताना दिसत आहेत. निर्माण झालेल्या परिस्थितीला मोजकेच संचालक जबाबदार आहेत.
ज्या संस्था दहा दिवसांपासून गोकुळ दूध संघाच्या पायरी सोडत नाही. त्या संस्था कोणाच्या मर्जीतील आहेत हे वेगळे सांगायची गरज आहे. गोकुळ दूध संघातील वाहतूक ठेका, नोकरभरतीच्या आरोपाने खळबळ उडाली आहे.पण वस्तुस्थिती पहिली तर २०१६ ते २०२१ या काळात विश्वास पाटील हेच गोकुळ दूध संघावर अध्यक्ष होते. नोकरभरतीचे जे आरोप झाले ते पाटील यांच्या काळातील आहेत. यावेळी विश्वास पाटील सत्तेत होते. मग हे तुमच्या परवानगीने झाले का? असा सवाल उपस्थित होत आहे.
तर दुसरीकडे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे हे देखील महाडिक गटासोबत सत्तेत होते. ज्यांना पंचवीस वर्षातील वाहतूक ठेक्याची माहीती हवी आहे. त्यांची सत्ता मागील पाच वर्षात शक्य आहे. जर प्रकरण बाहेरच काढायचं होत ते मागील पाच वर्षात का नाही काढले. याचे उत्तर कोण देणार? गोकुळमधील संचाकलांना नेत्यांचे पाठबळ असले तर निर्णय घेण्याचे अधिकार हे अध्यक्ष आणि संचालक मंडळाला आहे. काही संचालक सोडले तर गेल्या वीस ते तीस वर्षात तेच संचालक आणि तेच अध्यक्ष गोकुळ दूध संघावर आहेत. जे आरोप आता सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. ते एकवेळचे सत्ताधारी आहेत. त्यामुळे स्वार्थासाठी गोकुळदूध संघाची बदनामी सुरु आहे. त्यामुळे नेत्यांनी याच संचालकांना आवर घालण्याची गरज आहे.
गेल्या दोन महिन्यापासून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून महायुतीतील नेत्यांमधील असलेला अंतर्गत वाद गोकुळ दूध संघाच्या मुळावर येऊन पोहचला आहे. संघातील अनेक कारनामे बाहेर काढण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधकांडून सुरु आहे. सध्या गोकुळ दूध संघावर प्रशासक आहे. त्यामुळे याला अधिकच बळ मिळाले आहे. सत्ताधारी मुश्रीफ गटाकडून मागील पंचवीस वर्षात काय काय केले? याची माहिती मागवली जात आहे.
तर सत्त्तांतर झाल्यानंतर पाच वर्षातील कर्मकांडाची माहिती विरोधक महाडिक गटाकडून मागवली जात आहे. रोज एक जण येऊन प्रशासकाला वेठीस धरण्याचा काम करत आहे. संस्था प्रतिनिधींची माहिती मागवण्याचा अधिकार असला तरी प्रमुख नेत्यांच्या इशाऱ्यावर संस्थाचालक गोकुळाची पायरी चढत आहे. हे जगजाहीर आहे. मग तो सत्ताधारी गटाचा असो व विरोधी गटाचा.
सुरवातीला गोकुळ दूध संघावर प्रशासक येऊ नये यासाठी धडपड सुरु झाली. त्यानंतर तो आपल्या मर्जीतला यावा यासाठी प्रयत्न झाले. पण गोकुळ दूध संघावर प्रशासक आल्यानंतर त्याला वेठीस धरण्याचे काम मंत्री हसन मुश्रीफ गट, आमदार सतेज पाटील गट आणि महाडिक गटाकडून सुरु आहे. नेत्यांच्या अंतर्गत राजकारणाचा फटका आता संघाला बसत आहे. प्रशासक नेमणूक झाल्यापासून एक दिवस असा नाही कि त्यांच्यापर्यत निवेदन पोहचले नाही. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांची फरफट सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून दिली जाणारी निवेदन पाहता खरंच यांना गोकुळ वाचवायचा आहे कि? गोकुळमधील भ्रष्टकारभार कारण्यांना समोर आणायचे आहे. कि बदनामी करायची आहे. अशी शंका निर्माण होत आहे.
ग्रामीण भागाचा डोलारा संपूर्ण गोकुळ दूध संघावर आहे. ३,१३ आणि २३ या सूत्राप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर दहा दिवसांनी दुधाचा आर्थिक मोबदला मिळतो. जिल्ह्यातील काही गावे वगळता सर्वच गावात गोकुळ पोहचले आहे. जवळपास १२०० गावातील दीड लाख कुटुंब संघाशी जोडली आहेत. गाय व म्हैस दुधावर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो.
त्यामुळे गोकुळ दूध संघाची हानी होऊ नये असे प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्याला वाटते. त्यामुळे प्रशासक यांच्या हातून देखील काही उलट सुलट होऊ नये याची काळजी नेत्यांनी देखील घेतली आहे. शिवाय त्यांच्यावर दबाव देखील आहे. मात्र या दहा दिवसात जवळपास १५ निवेदन संस्था प्रतिनिधीनी दिली आहे. या संस्था माजी अध्यक्ष विश्वास पाटील ,अरुण डोंगळे,मंत्री मुश्रीफ आणि महाडिक गटाच्या आहेत.
प्रशासकांनी गोकुळचा चार्ज घेतल्यापासून 50 ते 60 हजार लिटरने गोकुळचे दूध कमी झाले आहे. उष्णता हे कारण जरी असलं तरी संकलन कमी होणं ही धोक्याची घंटा आहे. प्रशासक मंडळाला काम करू दिलं पाहिजे. गोकुळच्या प्रशासक मंडळाने राजकारण न करता गोकुळचे कामकाज चांगले करावे.
गोकुळचे नाव गोकुळच्या ब्रँडची बदनामी होईल असं प्रशासकांनी काम करू नये. सर्व उत्पादकांनी आपलं दूध गोकुळकडे घाला. गोकुळला दुधाची गरज आहे. गोकुळला दुधाची चणचण आहे. असे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणाले. पण पाच वर्षात सत्ता असताना ऊन्हाची तीव्रता देखील होती. मात्र त्यावेळी मंत्री मुश्रीफ यांच्या मुखातून गोकुळला दुधाची चणचण आहे. असे वाटले नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
मात्र गोकुळ दूध संघात मागील पाच वर्षात अनेक संघटनांनी आरोप केले . महाडिक गटाकडून लेख परीक्षांची मागणी केली. महाविकास आघाडी सरकारच्या कारला कर्मकांड करणाऱ्या काही संचालकांना पाठीशी घातले. मंत्री हसन मुश्रीफ महायुतीत आल्यानंतर देखील सबुरीचा सल्ला घेतला. शेवटच्या वर्षात मुलगा नवीद मुश्रीफ यांना अध्यक्ष केले. मात्र चार वर्षात गैरव्यवहार करण्यात आल्याचे जे आरोप झाले. त्याला चिरंजीव नवीद मुश्रीफ यांना तोंड द्यावे लागले. त्याचवेळी कान टोचण्याचे धाडस दाखवले असते. तर आज हि वेळ आली नसती. अशी भावना दूध उत्पादक शेतकऱ्यांची आहे.
महायुती तुमची, सत्ता तुमची, प्रशासक तुमचा.. बंद करा ‘गोकुळ’ची बदनामी!’ अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी सोशल मीडियावरून केली आहे. ‘गोकुळ’मधील सत्तापालट करण्यात आमदार पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. ‘मल्टिस्टेट’ या एकाच मुद्द्यावर झालेल्या लढ्यात मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांनीही त्यांना साथ दिली. यामुळे ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर झाले. पुढे मंत्री मुश्रीफ आणि आमदार पाटील यांनीच संघ आपल्या ताब्यात ठेवला. मात्र, कालांतराने जिल्ह्याचे राजकारण बदलले. राज्यात, केंद्र शासनात सत्ता बदल झाला. त्याचा फटका मंत्री मुश्रीफ आणि आमदार पाटील यांच्या मैत्रीलाही बसला.
सध्या ‘गोकुळ’मध्ये महायुतीची सत्ता असल्याचे सांगण्यात येते. येथे सध्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती झाली आहे. मोर्चा, आंदोलने सुरूच आहेत. यातून ‘गोकुळ’ची बदनामी होत आहे. याबाबत वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या कात्रणांचा संदर्भ देऊन आमदार पाटील यांनी ‘गोकुळ’ची बदनामी बंद करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या पाच वर्षात आमदार सतेज पाटील यांचे गोकुळवर नियंत्रण होते. महाडिक गटाकडे सत्ता असताना गोकुळमध्ये जे गैरव्यवहार ती माहिती गोळा करून समोर आणता आली असती. मात्र महाडिक यांच्यासोबत जे पंचवीस वर्षे सत्तेत होते. तेच माजी अध्यक्ष विश्वास डोंगळे आणि अरुण डोंगळे सतेज पाटील यांच्यासोबत असल्याने त्यांना देखील मर्यादा आल्या.
दरम्यान गोकुळमधून महाडिक गटाची सत्ता खालसा करण्यासाठी माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे हेच जबाबदार होते. त्याची सल महाडिक गटाला आहे. या पाच वर्षात जे व्यवहार झाले. त्याची माहिती घेतली जात आहे. त्यांना ईडी लावण्याचा आधार देखील देण्यात आला. मात्र हेच पाटील आणि डोंगळे महाडिक गटासोबत पंचवीस वर्षे सत्तेत होते. हे विसरून चालणार नाही. शिवाय राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता होती.
त्यावेळी महाडिक गटाकडून सातत्याने लेखापरीक्षांची मागणी करण्यात आली. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात नेत्यांनी दबाव आणला. त्यानंतर महायुतीची सत्ता राज्यात आली. त्यावेळी महाडिक गटाकडे राज्यस्तरावरून दबाव आणून लेखापरीक्षण अहवाल बाहेर काढून माजी अध्यक्ष विश्वास पाटील व डोंगळे यांच्यावर कारवाई का केली नाही. महायुतीच्या काळात महाडिक गटाची तलवार म्यान का झाली? असा सवाल उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.