Bhavana Gawali, Eknath Shinde, Sanjay Rathod Sarkarnama
विश्लेषण

Loksabha Election 2024 : महायुतीने उमेदवारी कापली, मातोश्रीचे दरवाजे बंद...; आता 'यांचे' काय होणार?

अय्यूब कादरी

Shivsena News : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली तशी महायुतीतील शिंदे गटातील काही खासदारांची त्रेधातिरपीट सुरू झाली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली त्यावेळी या खासदारांनी त्यांना खंबीर साथ दिली होती. आता त्यातील काही खासदारांना उमेदवारी मिळवण्यासाठी 'वर्षा'चे उंबरठे झिजवावे लागत आहेत. मात्र, खरे बॉस तर 'सागर'वर असल्याने 'वर्षा'वर हेलपाटे मारूनही अनेकांच्या पदरी निराशा आली आहे. हिंगोलीचे हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी शिंदे यांना कापावी लागली. त्यातच अशा खासदारांसाठी 'मातोश्री'चे दरवाजे सध्यातरी बंद केले गेले असल्याने अशा खासदारांचे आता काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.(Shivsena Loksabha Election News)

महायुतीतील तिन्ही पक्ष उपममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच चालवत आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे बंड केले, त्यावेळी त्यांच्यासोबत 13 खासदार आले होते. शिंदे यांनी आपल्या पक्षाचे आठ उमेदवार आतापर्यंत जाहीर केले आहेत. जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की शिंदे यांच्यावर ओढवली आहे.

काही विद्यमान खासदारांना उमेदवारी देऊ नये, असा शिंदे गटावर भाजपचा दबाव आहे. हे चित्र पाहून शिंदेंसोबत आलेल्या 40 आमदारांना नक्कीच धडकी भरली असणार. अशा वातावरणामुळे शिंदेंच्या पक्षात सध्या अस्वस्थता आहे. लोकसभा निडणुकीचे जागावाटप आणि तिकीटवाटपात शिंदे गटाची जी अवस्था झाली आहे, त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 8 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यात हिंगोली मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचे नाव होते. भाजपने हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला प्रखर विरोध सुरू केला. पाटील यांचे काम करणार नाही, अशी भूमिका हिंगोली मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरही दबाव वाढू लागला. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री शिंदे यांना हेमंत पाटील यांची उमेदवारी कापावी लागली. त्यांच्या जागी बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. हेमंत पाटील यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष असल्याचे आणि भाजपने केलेल्या सर्वेक्षणाचा कल त्यांच्याविरोधात असल्याचे चित्र शिंदे यांच्यासमोर मांडण्यात आले. उद्धव ठाकरे यांना सोडल्यानंतर भाजपने शिंदे यांना दिलेला हा सर्वात मोठा धक्का ठरला. खासदार पाटील यांच्या सौभाग्यवतींना यवतमाळ -वाशीममधून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यवतमाळ-वाशीम मतदारसंघातही असाच तिढा निर्माण झाला आहे. या मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी या पाच वेळा विजयी झाल्या आहेत. आता त्यांच्या उमेदवारीवरही गंडांतर आले आहे. त्यांचे तिकीट कापले गेले आहे. शिंदे गटात गेल्यानंतर भावना गवळी यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राखी बांधली होती. त्याचा उल्लेख त्या अधूनमधून करायच्या.

भावना गवळी यांचा पत्ता कट करतानाही त्यांच्या मतदारसंघातील सर्वेक्षणाचा हवाला देण्यात आला आहे. त्यामुळे भावना गवळी यांची कोंडी झाली आहे. बंडखोरी हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर आहे, मात्र, त्या बंडखोरी करतील याची शक्यताच नाही, कारण त्यांच्याविरोधात तपास यंत्रणांसमोर काही प्रकरणे सुरू आहेत.

नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि ठाणे मतदारसंघातही तिढा निर्माण झाला आहे. नाशिकचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे. नाशिक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गोडसे यांनी 'वर्षा'वर अनेक हेलपाटे मारले, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. कोंडीत सापडलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची भेटही टाळल्याचे समोर आले आहे.

ठाणे मतदारसंघ महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत, मात्र नारायण राणे यांच्यासाठी भाजपला तो मतदारसंघ हवा आहे. अशा पद्धतीने भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना खिंडीत गाठले आहे. भाजपच्या दबावामुळे शिंदे यांना आणखी काही ठिकाणचे उमेदवार बदलावे लागू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे

शिवसेना सोडून गेलेल्यांना पुन्हा प्रवेश दिला तर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अपमान होईल, असे शिवसेना ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटात नाराज असलेल्यांसाठी 'मातोश्री'चे दरवाचे तूर्तास तरी बंद आहेत. अशा परिस्थितीत शिंदे गटातील नाराज लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

भाजपने शिंदे यांची कोंडी केल्याचे पाहून ठाकरे गटही आता शिंदे यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे. भाजपने शिंदे आणि त्यांच्या साथीदारांची कशी कोंडी केली हा मुद्दा प्रचारातही गाजण्याचे संकेत मिळत आहेत. चहुबाजूंनी कोंडी झालेले शिंदेंचे शिलेदार यावर कशी मात करतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT