Maharashtra Vidhansabha Election  sarkarnama
विश्लेषण

Maharashtra bypoll trends : कुठे माणुसकी जिंकली, तर कुठे राजकीय ईर्षा! महाराष्ट्रातील 12 वर्षांतील पोटनिवडणुकांचा 'ग्राफ' नेमका काय सांगतो?

Political News : राज्यात गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत जवळपास 8 ठिकाणी विधानसभा तर पाच ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. यामधील निवडणुकीचे निकाल पाहता 12 पैकी जवळपास 10 ठिकाणी थेट लढती झालेल्या पाहवयास मिळाल्या.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राज्यात गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत जवळपास 8 ठिकाणी विधानसभा तर पाच ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. यामधील निवडणुकीचे निकाल पाहता 12 पैकी जवळपास 10 ठिकाणी थेट लढती झालेल्या पाहवयास मिळाल्या. त्यामध्ये राज्यातील मतदार मरण पावलेल्या आमदारांच्या वारसाशी प्रामाणिक राहिल्याचे चित्र पाहवयास मिळते. तर त्या उलट दोन ठिकाणच्या निवडणुकीत वारसदाराला जनतेने नाकारल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे त्याठिकाणच्या निवडणुकीत नवा चेहरा प्रथमच निवडून आल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील १२ वर्षांतील पोटनिवडणुकांचा 'ग्राफ' नेमका काय सांगतो? हे पाहू यात.

पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीला धक्का

पंढरपूरचे तीन टर्म आमदार भारत भालके यांचे कोरानामुळे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर २०२१ साली झालेल्या पोटावडणुकीत त्यांच्या विरोधात भाजपने उमेदवार दिला होता. त्यामुळे ही लढत चुरशीची झाली होती. या ठिकाणी महाविकास आघाडीने भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपने समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली होती. याठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे अवताडे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भालके यांचा पराभव केला होता. विशेष म्हणजे राज्यात याकाळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्याचवेळी आघाडीला पराभव स्वीकारावा लागला होता. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील ही पोटनिवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत महत्त्वाची आणि 'टर्निंग पॉईंट' ठरणारी लढत मानली जाते. भारत भालके यांच्या निधनानंतर २८ नोव्हेंबर २०२० झालेल्या या निवडणुकीने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला होता.

देगलूरमध्ये काँग्रेसने असा घेतला पंढरपूरचा बदला

त्यासोबतच 2021 मध्ये देगलूर-बिलोली मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले. याठिकाणी त्यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांनी राजकारणात एन्ट्री केली. काँग्रेसने त्यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षाने ताकद लावल्याने जितेश यांना सुरुवातीपासूनच मोठी आघाडी मिळाली. याठिकाणी भाजपची रणनीती अपयशी ठरली. भाजपने (BJP) शिवसेनेतून आलेले माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी देऊन ही लढत चुरशीची करण्याचा प्रयत्न केला. मात्र, साबणे यांना मतदारांनी नाकारले.

भाजपच्या 'ऑपरेशन कमळ'ला महाविकास आघाडीचे चोख उत्तर!

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची २०२२ मधील पोटनिवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय चुरशीची आणि 'हाय-व्होल्टेज' ठरली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या विजयामुळे जयश्री चंद्रकांत जाधव या कोल्हापूर शहराच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या. त्यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित (नाना) कदम यांचा १८ हजार ९०१ मतांनी पराभव केला. भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा बालेकिल्ला असल्याने भाजपने येथे आपली संपूर्ण ताकद लावली होती. दुसरीकडे, काँग्रेसचे सतेज पाटील, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येत ही निवडणूक लढवली होती.

ऋतुजा लटकेंचा विधानसभेत प्रवेश, पण 'नोटा'चीही जोरदार चर्चा

अंधेरी पूर्वमधील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे ११ मे २०२२ रोजी नैधान झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वच पक्षांनी घेतलेली भूमिका ऐतिहासिक ठरली. भाजपने सुरुवातीला मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी दिवंगत आमदाराच्या पत्नी विरोधात निवडणूक लढवू नये,असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांना केले. अखेर महाराष्ट्राची राजकीय परंपरा जपत भाजपने शेवटच्या दिवशी आपला उमेदवार मागे घेतला.

ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेत (BMC) लिपिक होत्या. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यावरून मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला होता. अखेर उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर त्यांचा राजीनामा मंजूर झाला आणि त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकल्या.जरी ही निवडणूक प्रमुख पक्षांनी लढवली नसली, तरी १२,८४२ मतदारांनी 'नोटा' (None of the Above) चा पर्याय निवडला होता. हे प्रमाण एकूण मतदानाच्या सुमारे १५ टक्के होते, ज्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. विशेष म्हणजे शिवसेनेत उभी फूट पडल्यांनंतर ही पहिलीच निवडणूक होती.

कसब्यात राजकारणातील सर्वात मोठा 'उलटफेर'

पुण्याच्या राजकारणातील भाजपचा ३० वर्षांचा अभेद्य गड मानला जाणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची २०२३ ची पोटनिवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा 'उलटफेर' ठरली. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर २२ डिसेंबर २०२२ ही जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीने राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले होते. यठिकाणी टिळकांच्या घरातील उमेदवार नसल्याचा फायदा काँग्रेसला झाला.

१९९५ पासून या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व होते. गिरीश बापट यांनी सलग पाच वेळा या जागेचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हे हेमंत रासणे यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव करून नवा इतिहास रचला.मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी न देता भाजपने हेमंत रासणे यांना संधी दिली. यामुळे ब्राह्मण समाजात आणि टिळक समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती, ज्याचा फटका भाजपला बसला. रवींद्र धंगेकर हे मुळचे मनसेचे आणि नंतर काँग्रेसमध्ये आलेले नेते आहेत. त्यांची 'लोकांमधला माणूस' ही प्रतिमा आणि पाच वेळा नगरसेवक म्हणून केलेले काम त्यांच्या विजयात मोलाचे ठरले.

भाजपने चिंचवडचा गड राखला

चिंचवड विधानसभा मतदारसंघाची २०२३ मधील पोटनिवडणूक ही पुण्याच्या पश्चिम पट्ट्यातील 'हाय-व्होल्टेज' लढत ठरली. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर (३ जानेवारी २०२३) ही जागा रिक्त झाली होती. कसब्यात भाजपचा पराभव झाला असला, तरी चिंचवडमध्ये मात्र भाजपने आपला गड राखण्यात यश मिळवले. लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनानंतर भाजपने त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली. 'भाऊंच्या' कामाची पावती आणि घरातील उमेदवाराबद्दल असलेली सहानुभूती अश्विनी जगतापांच्या पथ्यावर पडली.

महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल उर्फ नाना काटे यांना मैदानात उतरवले होते. मात्र, शिवसेनेचे (उबाठा) बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी अपक्ष निवडणूक लढवल्याने मतांचे विभाजन झाले. कलाटे यांनी घेतलेल्या ४४,११२ मतांमुळे नाना काटेंचा विजय कठीण झाला.

आबांच्या निधनानंतर तासगावची निवडणूक ठरली आदर्श!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांच्याबद्दल राजकारणात सर्वच पक्षांना मोठा आदर होता. त्यामुळे त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या, तेव्हा भाजप, शिवसेना आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांनी त्यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. ही महाराष्ट्राच्या राजकीय प्रगल्भतेची मोठी साक्ष होती. जरी प्रमुख पक्षांनी माघार घेतली असली, तरी काही अपक्ष उमेदवारांनी आणि छोट्या पक्षांनी अर्ज मागे न घेतल्याने मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, मुख्य लढत नसल्याने ती एकतर्फीच झाली.

पलूस-कडेगावमध्ये विश्वजित कदमांची एन्ट्री

सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाची २०१८ मधील पोटनिवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी आणखी एक महत्त्वाची घटना ठरली. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर (९ मार्च २०१८) ही जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीत भाजपने घेतलेल्या एका निर्णयामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे वेधले गेले होते.

डॉ. पतंगराव कदम हे महाराष्ट्राच्या राजकारणातील 'अजातशत्रू' व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांनी उमेदवारी अर्ज भरला. महाराष्ट्राची राजकीय परंपरा जपत, भाजपने त्यांचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे ही निवडणूक 'बिनविरोध' झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कदम कुटुंबाशी असलेले स्नेहसंबंध आणि पतंगरावजींचे योगदान लक्षात घेऊन हा निर्णय घेतला होता. शिवसेनेनेही या निर्णयाचे स्वागत करत आपला पाठिंबा जाहीर केला होता.

लोकसभा निवडणुका :

बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या लेकीचा 'रेकॉर्डब्रेक' विजय!

2014 साली भाजपचे केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे बीड मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत प्रितम मुंडे यांनी या पोटनिवडणुकीत तब्बल ९,२२,४१६ मते मिळवली. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अशोक पाटील (काँग्रेस पुरस्कृत अपक्ष) यांचा ७,०९,२६० मतांच्या अवाढव्य फरकाने पराभव केला. हा त्यावेळचा देशातील सर्वाधिक मताधिक्याचा नवा विक्रम ठरला होता. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे राज्यावर शोककळा पसरली होती. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मुंडे साहेबांप्रती आदर व्यक्त करत या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसनेही उमेदवार दिला नव्हता, मात्र एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता.

2018 मध्ये राजेंद्र गावितांची 'एन्ट्री' आणि युतीची 'एक्झिट'!"

खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर भाजपने त्यांच्या कुटुंबाला डावलल्याचा आरोप करत, त्यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी देऊन भाजपला मोठे आव्हान दिले होते. शिवसेनेच्या या खेळीला उत्तर देण्यासाठी भाजपने काँग्रेसचे दिग्गज नेते राजेंद्र गावित यांना पक्षात घेतले आणि त्यांना उमेदवारी दिली. एका अर्थाने ही निवडणूक 'मूळ भाजप (वनगा) विरुद्ध आयात भाजप (गावित)' अशी झाली होती. या निवडणुकीत केवळ भाजप आणि शिवसेनाच नव्हे, तर बहुजन विकास आघाडी (बळीराम जाधव) आणि माकप यांनीही मोठी ताकद लावली होती. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने घेतलेल्या १ लाख ८८ हजार मतांमुळे ही लढत अतिशय गुंतागुंतीची झाली होती. राजेंद्र गावित यांनी २९,५७२ मतांच्या फरकाने विजय मिळवला. या विजयामुळे भाजपचा गड राखला गेला असला तरी, शिवसेना-भाजपमधील दरी अधिक रुंदावली होती.

भंडारा-गोंदिया लोकसभेत नाना पटोलेंनी भाजपला दिलेला तो 'धक्का' आजही चर्चेत!

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आणि मोदी सरकारच्या धोरणांवरून त्यांनी २०१७ मध्ये भाजपचा त्याग केला. त्यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये परतले. पोटनिवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आणि मधुकर कुकडे यांना उमेदवारी देण्यात आली. ही जागा राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची होती, कारण २०१४ मध्ये प्रफुल्ल पटेल यांचा येथे पराभव झाला होता. भाजपने हेमंत पटले यांना मैदानात उतरवले होते. मात्र, नाना पटोलेंनी केलेल्या भाजपविरोधी प्रचारामुळे आणि स्थानिक कुणबी-पोवार समीकरणांमुळे भाजपला फटका बसला.

2019 पावसातल्या 'त्या' सभेने साताऱ्याचं मैदान मारले

2019 ची सातारा लोकसभा पोटनिवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठ्या 'उलटफेर' पैकी एक मानली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. या निर्णयामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक लागली, जी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई ठरली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आल्यावर अवघ्या ३ महिन्यांत उदयनराजेंनी राजीनामा दिला. त्यांनी "देशाच्या विकासासाठी आणि मोदींच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी" भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. १८ ऑक्टोबर २०१९ रोजी साताऱ्यात मुसळधार पावसात शरद पवारांनी सभा घेतली. "माझ्याकडून उमेदवार निवडीत चूक झाली, ती आता सुधारा," असे भावनिक आवाहन त्यांनी केले. या सभेने संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण फिरवले आणि साताऱ्यात परिवर्तनाची लाट आली. शरद पवारांनी त्यांचे जुने मित्र आणि माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना उदयनराजेंच्या विरोधात मैदानात उतरवले. साताऱ्यातील जनतेने 'पाटील' यांच्या साधेपणाला आणि पवारांच्या निष्ठेला कौल दिला.

अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा 'हात' मजबूत

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही वसंतरावांनी काँग्रेसचा गड राखला होता, ज्यामुळे त्यांचे राजकीय वजन वाढले होते. वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांचे सुपुत्र रवींद्र वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देऊन 'सहानुभूती' आणि 'वारसा' या दोन्ही मुद्द्यांवर भर दिला आहे. भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून आणून नांदेडमधील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. मात्र, या पोटनिवडणुकीत वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांनी विजय मिळवला त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT