Manoj Jarange_Andolan 
विश्लेषण

Manoj Jarange Popularity: दोन वर्षात जरांगेंचं आंदोलन वारंवार स्थगित झालं! तरीही समर्थकांमध्ये इतका उत्साह कसा? जाणून घ्या 10 मुद्दे

Manoj Jarange Popularity: मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा आणि ओबीसींचं आरक्षण लागू करावं यासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दोन वर्षापासून आंदोलन टिकवून ठेवलं आहे.

Amit Ujagare

Manoj Jarange Popularity: मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा आणि ओबीसींचं आरक्षण लागू करावं यासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट २०२३ रोजी पहिल्यांदा प्रकाश झोतात आले. जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी या गावामध्ये त्यांचं शांततेत आंदोलन सुरु असताना याच दिवशी आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर राज्यभरात या आंदोलनाची चर्चा झाली, त्यानंतर मनोज जरांगे ही व्यक्ती सर्वांना व्यापक स्वरुपात माहिती झाली. पण त्यानंतर अनेकदा त्यांच्या सरकारसोबत आरक्षणाच्या मागणीसह कुणबी नोंदी शोधणं आणि मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य करण्याबाबत वाटाघाटी झाल्या. राज्यभरात त्यांनी लाखो लोकांच्या उपस्थितीत सभा घेतल्या.

सरकारनं दिलेल्या आश्वासनांनुसार त्यांनी आपलं आंदोलन अनेकदा थांबवलं. पण अपेक्षित मुख्य मागणी पूर्ण होत नसल्यानं पुन्हा पुन्हा ते पुनरुज्जीवित केलं. या काळात उपोषण हेच त्यांचं एकमेव हत्यार राहिलं. आजही मनोज जरांगे दुसऱ्यांदा मुंबईला आझाद मैदानाच्या दिशेनं आमरण उपोषणासाठी आंतरवलीतून रवाना झाले आहेत. यावेळी मात्र त्यांचा फारसा प्रभाव जाणवणार नाही. त्यांच्यामागे सुरुवातीला होते तितके लोक येणार नाहीत असं काही विश्लेषक आणि स्वतः सरकारमधील काही घटकांना वाटत असताना आजच त्यांच्यासोबत लाखोंचा जनसमुदाय मुंबईकडं कूच करताना दिसला. त्यामुळं दोन वर्षात वारंवार आंदोलन स्थगित करुनही त्यांच्या समर्थकांमध्ये इतका उत्साह कसा? हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. याचा आढावा घेताना पुढील १० मुद्दे समजून घेता येतील.

मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मिळणारं प्रचंड जनसमर्थन आणि त्यामागील उत्साह यांचं विश्लेषण करताना त्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि भावनिक घटकांचा विचार करावा लागेल.

ऐतिहासिक व सामाजिक पार्श्वभूमी

१. मराठा समाजाची ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी म्हणजे मराठा समाज हा कायमच महाराष्ट्रातील एक प्रमुख सामाजिक गट राहिला आहे. जो ऐतिहासिकदृष्ट्या शेतकरी, योद्धा आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावशाली समुदाय म्हणून ओळखला जातो. परंतु, गेल्या काही दशकांमध्ये शेतीतील संकट, जमिनींची विक्री, शैक्षणिक पिछेहाट त्यामुळं आलेली बेरोजगारी आणि आर्थिक मागासलेपण यामुळं मराठा समाजातील मोठा वर्ग उपेक्षित आणि असमाधानी आहे. नोकऱ्यांमधील संधींचा अभाव यामुळं मराठा तरुणांमध्ये असंतोष वाढला आहे. गावगाड्यात आपल्यासोबतच पाटीलकी मिरवणारे काही सामाजिक घटक हे ओबीसी आरक्षणांमुळं पुढे जात आहेत. त्यामुळं आपल्याही सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी एकमेव मार्ग शिल्लक आहे तो म्हणजे आरक्षण! अशी आशा त्यांना आहे. यामुळेच आधीच ओबीसी वर्गात असलेले कुणबी-मराठा हा धागा घेऊन लढा देत असलेल्या मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाला मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळतो आहे.

नेतृत्व आणि विश्वासार्हता

२. मनोज जरांगे यांचं नेतृत्व आणि विश्वासार्हता त्यांच्या समर्थकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची गोष्ट ठरली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सातत्यानं आणि आक्रमकपणे लढा दिला आहे. त्यांचं उपोषण, मोर्चे आणि सरकारविरोधातील ठाम भूमिका यामुळं त्यांच्याविषयी समाजात विश्वास निर्माण झाला आहे. त्यांचं साधं राहणीमान, स्पष्टवक्तेपणा आणि सामान्य मराठा तरुणांशी थेट संवाद साधण्याची पद्धत यामुळं ते मराठा समाजातील सर्वच घटकांचे नेते बनले आहेत. त्यांनी स्वतःला मराठा समाजाच्या हितासाठी समर्पित केले आहे, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी समाजासाठी लढत राहणार ही त्यांची भावना लोकांना बळ देत आहे. त्यामुळेच मराठा समाजाला त्यांच्यावर विश्वास वाटतो आणि ते त्यांच्या मागे मोठ्या संख्येने उभे राहताना दिसतात.

सामुहिक अस्मितेची भावना

३. सामूहिक अस्मितेची भावना मराठा आरक्षण आंदोलनामुळं प्रबळ झाली आहे. ती आता केवळ आरक्षणापुरती मर्यादित राहिली नसून, मराठा समाजाच्या एकजुटीचं आणि अस्मितेचं प्रतीक बनलं आहे. मराठा समाजाला आपली सामाजिक, आर्थिक आणि राजकीय ताकद दाखवण्याची संधी या आंदोलनातून मिळते आहे. जरांगेंनी 'मराठा-कुणबी एकच' अशी मागणी करून मराठा समाजाला एका व्यासपीठावर आणलं आहे. हा सामूहिक अस्मितेचा भाव आणि 'आम्ही एक आहोत' ही भावना मराठा समाजातील तरुणांना आणि कुटुंबांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रेरित करताना दिसते आहे.

आंदोलन हाच एकमेव मार्ग

४. मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरु होण्यापूर्वीच महाराष्ट्रात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणासाठी ५८ मोर्चे निघाले. त्यानंतर २०१८ मध्ये मराठा समाजाला १६ टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा कायदा राज्यात मंजूर झाला, पण तो सुप्रीम कोर्टात २०२१ मध्ये रद्द झाला. त्यानंतर सरकारनं ठोस पावले उचलली नाहीत, ज्यामुळं समाजात सरकारविरोधात रोष आहे. जरांगे यांनी या असंतोषाला वाचा फोडली. सरकारच्या आश्वासनांवर विश्वास नसल्यानं आणि सततच्या टाळाटाळीमुळं मराठा समाजाला आंदोलन हाच एकमेव मार्ग दिसतो. यामुळं प्रत्येकवेळी जरांगे यांच्या आवाहनाला लाखोंचा प्रतिसाद मिळतो.

सोशल मीडियाचा प्रभाव

५. सध्याच्या काळातील सोशल मीडियाचा प्रभाव आणि संघटनात्म पातळीवर याच सोशल मीडियानं मराठा आंदोलनाला व्यापक व्यासपीठ दिलं. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर माध्यमांद्वारे जरांगे यांचे संदेश आणि आवाहन झपाट्यानं मराठा समाजापर्यंत पोहोचतात. स्थानिक पातळीवर मराठा समाजाच्या संघटना, युवक मंडळं आणि गावागावांतील कार्यकर्ते यांनी आंदोलनाची तयारी आणि प्रसार यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जरांगे यांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गानं आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहं. ज्यामुळं सामान्य कुटुंबांना आणि तरुणांना सहभागी होण्यास भीती वाटत नाही. तसंच या भूमिकेमुळेच त्यांचं आंदोलन भरकटण्यापासून ते स्वतःचं वाचवत आहेत.

आंदोलनाची रणनीती

६. आंदोलनाची रणनीती आणि प्रतीकात्मकता जरांगेंनी अतिशय प्रभावीपणे आखली आहे. मुंबई सारख्या राजधानीत आंदोलन करणं, शिवनेरी किल्ल्यावरून प्रेरणा घेणं, भजन-कीर्तनाद्वारे शांततापूर्ण आंदोलन करणं यांसारख्या गोष्टींमुळं आंदोलनाला सांस्कृतिक आणि भावनिक आधार मिळाला आहे. शिवाजी महाराजांचा वारसा आणि मराठा समाजाची ऐतिहासिक परंपरा यांचा उल्लेख करून जरांगे यांनी आंदोलनाला प्रतीकात्मक स्वरूप दिलं आहे. यामुळं समाजातील प्रत्येक स्तरातील लोक, विशेषतः तरुण आणि ग्रामीण भागातील लोकांचाही त्यांना पाठिंबा मिळत असून ते उत्साहाने त्यांच्यासोबत येत आहेत.

स्थानिक पातळीवरील एकजूट आणि सहभाग

७. मराठा समाज गावागावांमध्ये संघटित आहे. स्थानिक पातळीवर मराठा सेवा संघ, मराठा क्रांती मोर्चा यांसारख्या संस्था आणि कार्यकर्ते यांनी आंदोलनाला गती दिली आहे. प्रत्येक गावातून, तालुक्यातून आणि शहरातून लोक स्वतःहून आंदोलनात सहभागी होतात. यामुळं आंदोलनाचा पाया मजबूत झाला आहे आणि लाखोंच्या संख्येने लोक एकत्र येतात. मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा सामाजिक अस्मिता, आर्थिक मागासलेपण, सरकारी धोरणांवरील असंतोष, प्रभावी नेतृत्व आणि सामूहिक एकजुटीचा परिणाम आहे, असं आपण म्हणू शकतो. त्यामुळेच वारंवार आंदोलन स्थगित होऊनही लोकांचा उत्साह कमी होताना दिसत नाही. हा लढा आपल्या भविष्यासाठी आणि सामाजिक न्यायासाठी असल्याचं त्यांना वाटतं आहे. जरांगेंनी मराठा समाजाला एकत्र आणून त्यांच्यातील असंतोषाला दिशा दिली आहे, त्यामुळं प्रत्येक आंदोलनात लाखोंचा समुदाय उत्साहानं सहभागी होतो.

बंडखोर भूमिका

८. आत्ताच्या आंदोलनात काल झालेल्या सुनावणीत मुंबई हायकोर्टानं आझाद मैदानावरील आंदोलनाला थेट विरोध केला नाही. उलट त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, फक्त तो नियम व अटींचं योग्य पालन करुन व्हावं अशी भूमिका कोर्टानं मांडली होती. तसंच जर प्रशासनानं कायदा व सुव्यवस्थेचा विचार करुन जो निर्णय घेतला असेल त्याला हायकोर्टानं योग्य ठरवलं होतं. कोर्टाच्या या भूमिकेमुळं आज पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी इतर काही अटींसह आझाद मैदानात त्यांना आंदोलनासाठी परवानगी दिली. यावेळीही जरांगेंनी कायदा आणि नियमांचं पालन करुन आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याची भूमिका घेतली. त्यामुळं सरकार आणि न्याय व्यवस्थेविरोधातील बंडखोर भावना मराठा समाजात निर्माण झाली आहे. ही भावना विशेषतः तरुणांना आकर्षित करते, कारण त्यांना वाटते की त्यांचा आवाज दाबला जात आहे. यामुळं प्रत्येकवेळी आंदोलनाला नवीन जोम आणि उत्साह मिळताना दिसतो आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT