Ajit Pawar Shard Pawar Sarkarnama
विश्लेषण

NCP merger news : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता ठरली पेल्यातील वादळ; असा फुटला चर्चेचा फुगा !

NCP unity talks News : दोन्ही पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकत्रीकरणाबाबत कोणीच चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा केवळ पेल्यातील वादळच ठरल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे विधान करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या केवळ चर्चाच सुरु राहिल्या. या प्रकारच्या सर्व चर्चा या फक्त वरवरच्याच असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये कोणतेच तथ्य दिसत नाही अथवा कोणी उघडपणे काहीच बोलत नाही.

दोन दिवसापूर्वी दोन्ही पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकाही पार पडल्या. मात्र, या दोन्ही पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकत्रीकरणाबाबत कोणीच चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा केवळ पेल्यातील वादळच ठरल्या आहेत.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्र येण्याच्या या चर्चांच आहेत. हे दोन्ही पक्ष प्रत्यक्षात एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे दोन्ही गट वेगवेगळ्या आघाड्यांवर कार्यरत आहेत. शरद पवार यांचा गट हा विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीसोबत आहे, तर दुसरा अजितदादांचा गट सत्ताधारी महायुतीसोबत आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी विचारसरणीत, पक्षनिष्ठेत आणि रणनीतीत मोठे मतभेद आहेत. त्यामुळे एकत्र येण्याची चर्चा असली तरी भविष्यात हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असे वाटत नाही. त्यामुळे अशा चर्चांना बहुतांश राजकीय विश्लेषक "गॉसिप"चाच भाग समजत आहेत.

दोन्ही पक्षाची वेगवेगळी पार्श्वभूमी

जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यावेळी अजित पवार (AJit Pawar) यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन तत्कालीन महायुती सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले होते. त्यावेळेसपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन गटात मतभेद आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला आठ जागा मिळाल्या होत्या. त्यांना मोठे यश मिळाले होते तर अजितदादांच्या पक्षाला केवळ एक जागा मिळाली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले होते.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष :

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पारंपरिक राष्ट्रवादी विचारसरणी आहे. विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चांगले यश मिळवले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे यांचे मोठे पाठबळ कायम आहे. या पक्षाची विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात पायाभूत ताकद आहे. त्याचा नेहमीच फायदा पक्षाला झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट :

वेगळी चूल मांडल्यानंतर जुलै 2023 मध्ये भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. पण जनतेमध्ये काही प्रमाणात 'भाजपकडील वळण' म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. लोकसभा निवडणुकीत या पक्षाला मोठा धक्का सहन करावा लागला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मोठे परिश्रम घेतल्यानंतर पूर्वीप्रमाणे जागा निवडून आणल्या होत्या. राज्यात सत्तेत आल्यानंतर गेल्या काही दिवसापासून इतर पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणाऱ्यांचा ओढा वाढला आहे.

एकत्र येण्याची केवळ चर्चाच

दोन्ही गटांचा मूळ पक्ष समान असूनही, त्यांच्यातील वैचारिक व नेतृत्वात्मक दरी अजूनही मोठी आहे. शरद पवार यांच्या गटातील नेते अजित पवार यांच्या भूमिकेवर संशयाने पाहतात. महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असल्याने अजित पवार सध्या सत्तेत सहभागी आहेत. त्याशिवाय मंत्रिमंडळात त्यांचे मंत्री असल्याने पक्षाला त्याचा मोठा फायदा होत आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्याकडे भावनिक व संघटनात्मक पाठबळ आहे. त्यामुळे भविष्य काळात एकत्र येणे शक्य असले, तरी ते राजकीय गरजांवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे सध्य परिस्थितीत तरी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाही.

ही चर्चा ठरली केवळ 'पेल्यातील वादळ' ?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे दोन्ही पक्ष एकत्र येणार याची चर्चा केवळ प्रसार माध्यमातून जोरात सुरु आहे. एकत्र येण्यासाठी दोन्ही गटांमध्ये प्रत्यक्षात कुठलाही ठोस संवाद किंवा बैठका झाल्याची माहिती नाही. केवळ प्रसार माध्यमांमध्ये ही चर्चा जास्त रंगली आहे. कधी 'सूत्रां'च्या हवाली, तर कधी 'गुप्त बैठकांची' अफवा पसरवली जात आहे. अशा चर्चांचा उद्देश केवळ जनतेची चाचपणी करण्यासाठी अथवा इतर पक्षांवरील दबाव वाढविण्यासाठी केला जात आहे. त्याशिवाय दोन्ही पक्षातील अंतर्गत गटबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. एकत्र येण्याच्या चर्चेवर फारसे तथ्य वाटत नाही.

संभाव्य परिणाम काय असणार ?

भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे दोन्ही पक्ष जर एकत्र आले, तर काँग्रेस व शिवसेनेत अस्वस्थता निर्माण होऊ शकते. शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष आहे. विशेषतः शरद पवार यांनी शिवसेनेला भाजपपासून वेगळे करीत राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारची सत्ता आणली होती. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.

दुसरीकडे भाजप अजित पवार गटाच्या उपयुक्ततेबाबत पुनर्विचार करू शकतो. त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. परंतु, हे दोन्ही पक्ष एकत्र येणे खूप अटी व शर्थीवर अवलंबून असणार आहे. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे पक्षाचे नेतृत्व कोण करणार ? चिन्ह कोणाचे वापरणार, सत्तेत असल्यास सत्ता वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार आणि याशिवाय दोन्ही पक्षातील नेते मंडळींचे खासगी ईगो, व्यक्तिगत हेवेदावे यावर बरेच काही अवलंबुन असणार आहे.

दोन्ही गटाचा किंमत वाढवण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांमुळे दोन्ही गट आपली किंमत वाढवत आहेत. शरद पवार गट आपले राजकीय वजन सिद्ध करत आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांच्या पक्षातून महायुतीकडे मोठ्या प्रमाणात आउटगोइंग होत आहे. हे आउटगोइंग रोखण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचा मुद्दा चर्चेत ठेवण्यात आला असल्याचा दावा राजकीय विश्लेषकांनी केला आहे.

दुसरीकडे अजित पवार गटाला भाजपकडून अधिक महत्त्व मिळावे किंवा राज्य सरकारमधील महायुतीमध्ये भविष्यात अधिकार मिळवण्यासाठी राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष भविष्यात एकत्र येण्याची सुतारामही शक्यता दिसत नाही. त्यामुळे आतापर्यंत सुरु असलेल्या चर्चा या केवळ केवळ पेल्यातील वादळच ठरले आहे.

दोन्ही गटांनी अफवा असल्याचे केले स्पष्ट

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षांच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत अशी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा स्पष्ट शब्दांत आमदारांना सांगितले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनीही अशा प्रकारच्या चर्चा सुरु नसल्याचे स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा केवळ माध्यमांमध्येच होत असून, त्या निराधार असल्याचे सांगितले. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची ही चर्चा म्हणजे अफवाच ठरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT