Santosh Deshmukh Murder Case Sarkarnama
विश्लेषण

Santosh Deshmukh murder Case : राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची अधिवेशनाकडे पाठ; संतोष देशमुख प्रकरणावर सभागृहात चर्चा होणार का ?

Maharashtra Assembly Session News : धनंजय मुंडेनी राजीनामा का दिला ? त्याच्याविषयी संपूर्ण प्रकरणात सरकारची भूमिका काय? हे कळणे गरजेचे असताना ते विचारण्याचे धाडस विरोधी पक्षाने दाखवले नाही.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभर हे प्रकरण गाजले. सत्ताधारी व विरोधकांनी हे प्रकरण शांत होऊ दिले नाही. या प्रकरणी जागोजागी मोर्चे काढत आरोपीना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात सातत्याने केल्या जात असलेल्या आरोपापमुळे गेल्या चार महिन्यात आवाज उठवल्यामुळे पोलीस यंत्रणांने तत्परने आठ आरोपीला अटक केली. त्यातच या प्रकरणातील आरोपी हे माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय असल्याने राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होताच सोशल मीडियावर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो व व्हिडिओ व्हायरल झाल्याने धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता.

धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाला एकही दिवस उपस्थित राहिले नाहीत. दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यावरून सत्ताधारी पक्ष बिनधास्त दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी विधिमंडळात नाहीतर विधान भवनाच्या परिसरात प्रसार माध्यामासमोर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून आणि मी तो स्वीकारला असल्याचे सांगून टाकले. मात्र, सभागृहात त्यांनी माहितीच दिली नाही.

विरोधकाने या राजीनाम्यानंतर तीन दिवसांनी विधानसभेत आवाज उठवला पण त्यात कुठेच आक्रमकपणा दिसला नाही. धनंजय मुंडेनी राजीनामा का दिला ? त्याच्याविषयी संपूर्ण प्रकरणात सरकारची भूमिका काय? हे कळणे गरजेचे असताना ते विचारण्याचे धाडस विरोधी पक्षाने दाखवले नाही.

विरोधी पक्षाकडे कमी झालेल्या संख्याबळामुळे आक्रमकपणाच शिल्लक राहिलेला नाही. विरोधक बॅकफूटवर तर बिनधास्त सत्ताधारी असे अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातील विधानसभेतील चित्र होते. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात संतोष देशमुख हत्याकांडाची थरारक कहाणी सांगितल्याने सभागृह शांत झाले होते. त्यानंतर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच या हत्याकांडातील दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर मारहाणीच्या घटनेचे फोटो व्हायरल झाले.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हे फोटो व्हायरल झाल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून मागणी होत असलेल्या धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर, संतोष देशमुख प्रकरणावर या अधिवेशनात गेल्या दोन आठवड्यात व्यापक चर्चा व्हायला हवी होती. मात्र, त्यावर सभागृहात आतापर्यंत चर्चा झाली झाली नाही. विशेष म्हणजे अधिवेशन सुरु झाल्यांनतर दुसऱ्याच दिवशीच मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. त्यानंतरही या विषयवर चर्चा झाली नाही.

वास्तविक पाहता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर संतोष देशमुख प्रकरण सभागृहात चर्चेला आले नाही. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर संतोष देशमुख प्रकरणावर सभागृहात विरोधकही शांत शांत दिसत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरण नागपूर हिवाळी अधिवेशनात गाजले होते. यावेळी विरोधकांनी आक्रमकपणे हा मुद्दा लावून धरला होता.

नागपूर अधिवेशनात संतोष देशमुख हत्या प्रकरणावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलाच धारेवर धरले होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार सुरेश धस यांसारख्या नेत्यानी या हत्याकांडाच्या घटनेनं सभागृहात दणाणून सोडले होते. दुसरीकडे मात्र या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी फारसा आवाज उचलला नाही.

आठ ते दहा दिवसापूर्वीच संतोष देशमुख हत्याप्रकरणात दोषारोपपत्रही दाखल झाले आहे. त्यामुळे, यापुढे पोलीस कारवाईपेक्षा न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. या प्रकरणाची सुनावणी बुधवारपासून केज कोर्टात सुरु झाली आहे. अद्यापही संतोष देशमुख हत्याप्रकरणातील एक आरोपी संतोष आंधळे हा फरार आहे. पोलिसांकडून संतोष आंधळेचा शोध घेतला जात आहे.

मुंबईत 3 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिले तीन दिवस संतोष देशमुख प्रकरण आणि याच प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी सभागृहात आणि सभागृहाबाहेर झाली. 4 मार्चला धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर सभागृहात संतोष देशमुख प्रकरणाचा मुद्दा उचलला गेला नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याची माहिती सभागृहात न देता ती माहिती सभागृहाबाहेर दिली, त्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले. मात्र, त्यानंतर संपूर्ण प्रकरण विरोधकांकडूनही आणि सत्ताधाऱ्यांकडूनही शांत झाल्याचंच पाहायला मिळाले.

मात्र, या प्रकरणात सखोल चौकशी झाल्यानंतर एक आरोपी सोडून इतर सर्व आरोपींना अटक झाल्यानंतरही अधिवेशनात यावर सखोल चर्चा झाली नाही. उर्वरित सात दिवसात या प्रकरणावर सखोल चर्चा होण्याची शक्यताही तशी कमीच दिसून येते. त्यामुळे या अधिवेशन काळात तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सभागृहात चर्चा होणार का ? असा प्रश्न सतावत आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT