Sharad Pawar, Ajit Pawar, Nashik District Sarkarnama
विश्लेषण

Sharad Pawar Politics : दादांच्या 'या' सहा आमदारांचा थोरल्या पवारांनी केला असा बंदोबस्त!

Sampat Devgire

Nashik NCP Politics :

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर नाशिक जिह्यातील राष्ट्रवादीचे सहा आमदार अजित पवारांसोबत गेले. या आमदारांच्या राजकीय बंदोबस्तासाठी शरद पवारांनी मोठी खेळी खेळली आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह हातचे गेले तरी अजित पवारांच्या नाशिकमधील आमदारांना निवडणुकीत पुन्हा विजय मिळवण्यासाठी कठोर परीश्रम करावे लागलीत, एवढे खरे.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या त्या आमदारांविरोधात प्रतिस्पर्धी उभे करून त्यांच्या मतदारसंघातच बंदोबस्त केला आहे. शरद पवारांच्या या प्रयोगामुळे दादांच्या आमदारांची वाटचाल अवघड होऊ शकते. NCP Crisis in Maharashtra

केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि त्याचे चिन्ह अजित पवारांना (Ajit Pawar) दिले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवारांचा पक्ष आहे. राष्ट्रीय नेते शरद पवारांसाठी मोठा धक्का असला तरी यांना मोठा धक्का मानला जातो. त्यामुळे अजित पवार समर्थक जल्लोष करत आहेत. तरीही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे भवितव्य भाजपच्या कृपेवर अवलंबून असेल, असे नाशिकचे चित्र आहे. शरद पवार यांनी राज्यात 1985 मध्ये 'पुलोद'चा प्रयोग (Pulod Government Experiment) केला होता त्याची पुनरावृत्ती नाशिकमध्ये होऊ शकते.

नाशिक जिल्ह्यातील आमदार सरोज अहिरे (देवळाली) वगळता उर्वरित पाच आमदार राजकीय दृष्ट्या अत्यंत मातब्बर आहेत. मात्र सरळ लढतीत मतांचे गणित त्यांच्या हातातून निसटण्याची भीती आहे. मागील सहा महिन्यांत शरद पवार यांनी बसवलेल्या महाविकास आघाडीच्या घडीमुळे राष्ट्रवादीच्या आमदारांवर मतदारसंघ असुरक्षिततेची भीती निर्माण झाली आहे.

मूळ शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवत झाली असली तरी, जिल्ह्यात शरद पवार यांच्या भोवतीचे राजकीय वलय मतदारांमध्ये कायम आहे. गेल्या काही दिवसांतील आंदोलने आणि भूमिकांमधून ते दिसून आले आहे. आगामी निवडणुकींमध्ये पवार काही ठिकाणी स्वतः ऐवजी समविचारी पक्ष आणि नेत्यांना ताकद देतील हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मातब्बर नेत्यांना देखील मतदारसंघातच अस्तित्वासाठी झुंजावे लागेल असे दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भुजबळांना झुंजवणार

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) येवला विधानसभा मतदारसंघातून चार वेळा विजयी झाले आहेत. मुंबईत पराभूत झाल्यावर पवारांनी त्यांचे येवल्यात पुनर्वसन केले होते. भुजबळांना सुरवातीपासून मराठा समाजाच्या एका गटाचा विरोध राहिलेला आहे. या गटाला थोपवण्याचे काम पवारांकडून होत होते. पण सध्या कांदा निर्यात बंदी आणि मराठा आरक्षणावरून भुजबळांविरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.

येथे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) भुजबळांची पारंपरिक विरोधक आहे. त्यामुळे शरद पवार आणि ठाकरे मिळून जो उमेदवार देतील त्यात भुजबळांची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यात शरद पवारांची भूमिका निर्णायक ठरू शकते. कदाचित जागा शरद पवार यांची आणि उमेदवार ठाकरे यांचा किंवा उमेदवाराला शरद पवारांचे पाठबळ असे चित्र असेल. येथे मुस्लीम समाजाची मते लक्षणीय आहेत. हा समाज काय निर्णय घेतो, हे सुद्धा महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे राज्याचे नेते असलेले भुजबळ मतदारसंघात अडकू शकतात. (Shivsena)

नितीन पवार विरुद्ध गावित

आमदार नितीन पवार (Nitin Pawar) यांच्यासाठी कळवण सुरगाणा हा मतदारसंघ सुरक्षित असतो. मात्र त्यात आता सुरगाणा हा डाव्यांचा बालेकिल्ला जोडला गेला आहे. येथून सात वेळा 'माकप'चे जे. पी. गावित (J.P. Gavit) आमदार झाले. गेल्या निवडणुकीत नितीन पवार त्यांच्या बालेकिल्ल्यात फक्त 12 हजार मतांनी तिहेरी लढतीत विजयी झाले होते.

यंदा शरद पवारांनी येथे गावितांना बळ दिले आहे. त्यात शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांचे गेल्या निवडणुकीतील मते एकत्र केल्यास आमदार पवार यांची वाट खडतर होणार, हे स्पष्ट आहे. त्यात राष्ट्रवादीचा रवींद्र देवरे हा मोठा गट नितीन पवारांच्या विरोधात आहे. ही सर्व घडी शरद पवार यांनी बसवली आहे. त्यामुळे हक्काच्या मतदारसंघात आमदार पवार यांना निवडणूक सोपी राहिलेली नाही.

बनकर विरुद्ध अनिल कदम

निफाड हा द्राक्ष आणि कांदा उत्पादकांचा मतदारसंघ आहे. निफाडच्या राजकारणावर आणि मतदारांवर शरद पवारांचा अनेक वर्षे प्रभाव आहे. गेल्या निवडणुकीत दिलीप बनकर (Dilip Bankar) हे शिवसेनेचे अनिल कदम यांच्या भाऊबंदकीच्या राजकारणात यतीन कदम या अपक्ष उमेदवाराने घेतलेल्या लक्षणीय मतांमुळे निवडून आले होते.

आता काही दिवसांपासून शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांना शरद पवारांनी जवळ केले आहे. पवार आणि कदम यांच्या सख्याची सर्वत्र चर्चा आहे. याउलट मराठा आरक्षणासह कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) यावर आमदार बनकर यांचे मौन त्यांना अडचणीचे ठरणार आहे. यामध्ये शरद पवार यांनी अनिल कदम यांना बळ दिल्याने दिलीप बनकर यांचे अस्तित्व पूर्णतः सध्या भाजपमध्ये असलेले यतीन कदम काय भूमिका घेतात, यावर ठरेल. यतीन कदम यांनी उमेदवारी दिल्यास त्याचा फटका अनिल कदम यांच्याऐवजी दिलीप बनकरांना जास्त बसेल. त्यात बनकरांच्या अडचणी वाढतील.

कोकाटे यांचे भवितव्य लोकसभेवर

सिन्नर मतदारसंघात माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) चार वेळा आमदार होते. कोकाटे जवळपास सर्वच पक्षांचे उंबरठे ओलांडून आले आहेत. यंदाही त्यांनी शरद पवारांना सोडून अजित पवारांचा हात धरला आहे. या मतदारसंघात पक्ष गौण आणि गट महत्त्वाचा असतो.

सध्या आमदार कोकाटे विरुद्ध माजी आमदार राजाभाऊ वाजे असे दोनच गट येथे आहेत. त्यात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून वाजे सक्रिय आहेत. तुलनेत आमदार कोकाटे यांचे भाऊच त्यांच्या विरोधात गेलेले आहेत. सिन्नरच्या विविध स्थानिक निवडणुकांमधील निकाल लक्षात घेता कोकाटे यांना वाजे यांचे मोठे आव्हान आहे. कोकाटे आणि वाजे या दोन्ही उमेदवारांची नावे लोकसभचे इच्छूक म्हणून घेतली जातात. त्यात कोकाटे लोकसभेसाठी काय भूमिका घेतात त्यावर पुढील राजकारण ठरणार आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विषयीची सहानुभूती वाजे यांना अनुकूल करू शकते. कोकाटे उमेदवार झाले तरी अजित पवार प्रचाराला येऊनही सिन्नरमध्ये फारसा फरक पडणार नाही. परंतु सिन्नरमधील सामाजिक विभागणी पाहता जितेंद्र आव्हाड कोकाटेंची बरीच मते वाजेंकडे वळवतील हे कोणीही नाकारू शकत नाही.

शेटेंच्या हाती झिरवाळांचे भविष्य

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचा दिंडोरी-पेठ मतदारसंघात होल्ड पूर्णतः श्रीराम शेटे या स्थानिक नेत्याच्या भूमिकेवर अवलंबून आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी परंपरागत लढत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागणीमुळे एक नवे नेतृत्व निर्माण होण्याची संधी आहे.

यामध्ये कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे (Shriram Shete) अद्याप कुंपणावर आहेत. त्यांनी जर शरद पवार गटाच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला तर झिरवाळांची वाट बिकट होईल. त्यात माकप पवारांच्या मदतीला येईल. त्यात शिवसेनेने (ठाकरे गट) उमेदवाराची चांगली निवड केल्यास झिरवाळांना निवडणुकीत मोठे आव्हान असेल.

सरोज अहिरे भाजपच्या कृपेवर

देवळाली विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) माजी मंत्री बबन घोलप यांचा परंपरागत मतदारसंघ आहे. त्यांच्याविषयीची नाराजी आणि अँटीइन्कमबन्सी यातून गेल्या निवडणुकीत सरोज अहिरेंना (Saroj Ahire) मतदारांनी निधी जमा करून निवडून आणले होते. त्यांना भाजप-शिवसेना युतीतील वादामुळे भाजप व संघाच्या लोकांची मदत झाली होती. मात्र अहिरे यांनी बंडखोरी करून

अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे त्यांची प्रतिमा फारशी प्रभावी राहिलेली नाही. गेल्या निवडणुकीत वर्गणीवर विजयी झालेल्या अहिरे, सध्या आर्थिकदृष्ट्या सर्वात सक्षम उमेदवार मानल्या जातात.

येथे शिवसेना, काँग्रेस, शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी हे समीकरण आणि उमेदवार परफेक्ट बसल्यास सरोज आहिरे यांचे मतदार कोण? हा गंभीर प्रश्न असेल. कारण आमदार अहिरे या भाजप पुरस्कृत आघाडीत आहेत. भाजपने येथे तीन प्रबळ उमेदवार तयार ठेवले आहेत. या उमेदवारांनी केलेली तयारी, खर्च विचारात घेता ते निवडणुकीत थांबतील असे अजिबात वाटत नाही.

त्यामुळे सरोज अहिरे पूर्णतः भाजपच्या दयेवर अवलंबून असतील. या मतदारसंघातील बहुतांश संस्था शिवसेनेच्या ताब्यात आहेत. त्यामुळे निवडणुकीत काय होईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT