Dr. Shrikant Shinde Sarkarnama
विश्लेषण

Shivsena Kolhapur Maha Adhiveshan: ...अन् ढाण्या वाघाचं काळीज असलेल्या शिवसैनिकांचे डोळेही पाणावले!

अय्यूब कादरी

Mahayuti Political News : भाजपच्या पक्षनेतृत्वाने आगामी लोकसभा निवडणुकीत 'अबकी बार 400 पार'च्या महाविजयाचा नारा दिला आहे. याचवेळी राज्यातील महायुतीलाही 'मिशन 45' चं टार्गेट ठरवून दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता युतीतील भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही कार्यकर्त्यांमध्ये हुंकार भरण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून शिवसेनेनं कोल्हापूरमध्ये गाजावाजा करत महाअधिवेशनातून वातावरण निर्मिती केली आहे. मात्र, याच अधिवेशनात राजकारणापलीकडच्या अनोख्या क्षणाने मुख्यमंत्र्यांसह ढाण्या वाघाचं काळीज असलेल्या शिवसैनिकांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या.

मुख्यमंत्री, खासदार असलो म्हणून काय झाले... शेवटी आम्ही माणूस आहोत... शिवसेनेच्या उभारणीसाठी वडिलांनी मोठा त्याग केलायं, त्यासाठी आय़ुष्य खपवलं आहे...! वडिलांचा तो त्याग आठवला आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले! कोल्हापूर येथे शिवसेनेच्या (शिंदे गट) अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत यांच्यातली ही अनोखी बाँडिंग दिसून आली.

राजकारणातल्या नव्या पिढीबाबत लोकांना अनेक आक्षेप आहेत. त्यातला पहिला आक्षेप म्हणजे या पिढीला आपल्या वडिलांनी किंवा पूर्वीपासून राजकारणात असलेल्या कुटुंबीयांनी केलेल्या त्यागाची जाणीव नाही, त्याचे महत्त्वही वाटत नाही. हा आक्षेप मोठ्या प्रमाणात खराही आहे. कॉर्पोरेटप्रमाणे वागणाऱ्या या नव्या पिढीचे बहुतांश तरुण राजकारण्यांमध्ये भावनेचा, मागच्या पिढीच्या त्यागाबद्दलच्या जाणिवेचा अभाव दिसून येतो. त्यामुळे लोकांशी, कार्यकर्त्यांशी वागताना ते अवघडल्यासारखे होतात. याला आपण अपवाद असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दाखवून दिले आहे. वडिलांनी केलेल्या त्यागाची आठवण त्यांनी मनाशी जपली आहे.

एक रिक्षाचालक ते मुख्यमंत्री या वडिलांच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या प्रवासाची, त्या प्रवासादरम्यान वडिलांनी केलेल्या त्यागाची आठवण येऊन अधिवेशनात भाषण करताना त्यांचे डोळे पाणावले. मुलगा आपला प्रवास मांडतोय, त्याग सांगतोय हे पाहून, ऐकून मुख्यमंत्री शिंदे यांनाही अश्रू अनावर झाले.(Shivsena Political News)

शिवसेनेत फूट पडली आणि त्यावेळेसपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. कोण खरं, कोण खोटं हा भाग वेगळा, तो येथे अप्रस्तुत आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या उभारणीसाठी, संघटना बळकट करण्यासाठी अत्यंत बिकट परिस्थितीत मोठा त्याग केला आहे, हे नाकारता येत नाही. एकनाथ शिंदे हे ठाणे येथे ऑटोरिक्षा चालक होते. कुटुंबाच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडून एकनाथ शिंदे यांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली होती. त्यावेळी ते कंपनीतही काम करत असत. याचदरम्यान त्यांचा शिवसेनेशी संबंध आला. ते शिवसेनेत दाखल झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची जडणघडण झाली. शिंदे आपल्या कुटुंबीयांसह दहा बाय दहाच्या खोलीत राहायचे. शिवसेनेचा तो काळ भारावलेला होता. अनेक तरुण कोणतीही अपेक्षा न करता शिवसेनेसाठी काम करायला तयार होते. समाजात दबलेल्या लोकांना शिवसेनेच्या रूपाने राजकीय स्पेस मिळत होती, ओळख मिळू लागली होती. एकनाथ शिंदेही या तरुणांपैकीच एक. त्यांनी झोकून देऊन शिवसेनेसाठी काम केलं. शिवसेनेत नेता कुणी नसतो, नेता असला तरी तो शिवसैनिकच असतो. काँग्रेसचे काही नेते सरंजामदारांप्रमाणे वागत असल्याची त्या काळात ती फार मोठी गोष्ट होती. त्यामुळेच अनेक तरुण शिवसेनेकडे आकृष्ट झाले होते.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतील कार्यकर्ते होते. त्यामुळे ते सतत पक्ष संघटनेच्या कामात असायचे. त्यामुळे कुटुंबीयांकडे साहजिकच त्यांचं दुर्लक्ष झालं. आनंद दिघे हे शिंदे यांचे गुरू. दिघे हे शिवसेनेच्या कार्यालयातच राहायचे. त्यांच्या जेवणाचा डबाही तेथेच यायचा. एकनाथ शिंदे यांनीही शिवसेना कार्यालयाला आपलं दुसरं घरच मानलं होतं. त्यांनी झोकून देऊन पक्षासाठी काम केलं. पक्ष मजबूत केला. नंतर त्यांनाही शिवसेनेने अनेकवेळा संधी दिली.

आनंद दिघे यांच्या निधनानंतर शिंदे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख झाले. एकेक पायरी वर चढत ते मंत्री झाले. बाळासाहेब ठाकरे, नंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचेही निकटवर्तीय बनले. दरम्यानच्या काळात शिंदे यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. त्यांच्या दोन मुलांचा अपघातात मृत्यू झाला होता. पत्नी लताताई यांची खंबीर साथ मिळाल्यामुळे शिंदे या दुःखातून सावरले. त्यांच्या आयुष्याला एकप्रकारे कलाटणी मिळाली. त्यानंतर त्यांनी समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं. या त्यागाची, दुःखद प्रसंगाची श्रीकांत शिंदे यांना नक्कीच आठवण आली असणार.

शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे हे 40 आमदारांना घेऊन भाजपच्या छावणीत दाखल झाले. त्यावेळेसपासून शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. प्रसंगी जिव्हारी लागतील असे आरोप दोन्ही गटांकडून एकमेकांवर केले जाऊ लागले. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्यांना गद्दार अशी उपमा दिली जाते. ती शिंदे यांच्यासाठीही वापरण्यात आली.

शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून देण्यात आलेल्या कारणांची चिकित्सा केली जाऊ शकते, तशी ती झालीही आहे. मात्र, शिवसेनेच्या वाढीत शिंदे यांचे योगदान मान्यच करावे लागणार आहे. त्यांनी शिवसेनेच्या उभारणीसाठी आय़ुष्य खपवलं आहे, हेही उघड आहे. असे असले तरी राजकारणात आरोप-प्रत्यारोप अटळ असतात. ठाकरे गटाकडून केल्या जाणाऱ्या आरोपांमुळेही शिंदे पिता-पुत्र व्यथित झाले असणार.

एकनाथ शिंदे एकाही सणाला कुटुंबीयांसोबत राहत नसायचे. वडिलांनी एकही सण माझ्यासोबत साजरा केला नाही, एकही दिवस माझ्यासोबत व्यतित केला नाही... अशी आठवण सांगताना श्रीकांत शिंदे यांच्या डोळ्यांत पाणी आलं. राजकारण्याची पुढची पिढी संवेदनशील नाही, या पिढीला आपल्या कुटुंबीयांच्या त्यागाची जाणीव नाही, हा आक्षेप खासदार शिंदे यांनी खोडून काढला आहे. खासदार असलो तरी मी माणूस आहे, मलाही सर्वसामान्य माणसाप्रमाणे भावना आहेत, त्यामुळे डोळ्यांत अश्रू येतात... हे त्यांनी यानिमित्ताने दाखवून दिलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT