raosaheb danve, pruthviraj chavan, uddhav thackeray, kirit somyya, raj thackeray  Sarkarnama
विश्लेषण

Shivsena News : शिवसेना संपणार! 2012 ची पृथ्वीराज चव्हाणांची 'ती'भविष्यवाणी कशी उलटली? सोमय्या,दानवेंचं विधानही येऊ शकते भाजपच्या अंगलट!

Political News : येत्या काळात किरीट सोमय्या, रावसाहेब दानवेंचे विधान भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता काही राजकीय धुरणीनी व्यक्त केली आहे. हे विधान भाजप नेत्यासाठी येत्या काळात धोक्याची घंटा ठरणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मुंबई महानगरपालिकेची 2012 साली झालेली निवडणूक राज्यभर गाजली होती. या निवडणुकीवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खालावलेली होती. त्या निवडणुकीच्या प्रचारावेळी व्हिडीओच्या माध्यमातून शिवसैनिकांना आणि मुंबईकरांना "उद्धव आणि आदित्यला सांभाळून घ्या," असे भावनिक आवाहन केले होते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. बाळासाहेब ठाकरे प्रचारासाठी न येता झालेल्या या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची कामगिरी कशी राहणार? याविषयी उत्सुकता लागली असतानाच 'शिवसेनेचे अस्तित्व संपणार', असे विधान तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. 'ती' भविष्यवाणी त्यांच्यावरच उलटली होती.

त्याचप्रमाणे राज्याच्या राजकारणात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 16 जानेवारीला ठाकरे बंधूंचे राजकीय अस्तित्व संपेल, असे विधान करून या चर्चेला धार आणली आहे. तर भाजपचे आणखी एक नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही “शेवटची निवडणूक” असेल, असे भाकीत केले आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' भविष्यवाणीप्रमाणे येत्या काळात किरीट सोमय्या, रावसाहेब दानवेंचे विधान भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता काही राजकीय धुरणीनी व्यक्त केली आहे. हे विधान भाजप नेत्यासाठी येत्या काळात धोक्याची घंटा ठरणार आहे.

मुंबई महानगरपालिकेची 2012 साली झालेली निवडणूक सत्ताधारी व विरोधाकामुळे चांगलीच गाजली होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेच्या अस्तित्वाबाबत जे विधान केले होते, ते शिवसेनेसाठी अक्षरशः 'बूस्टर डोस' ठरले होते. 2012 साली राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार होते. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. मुंबई महापालिकेवर अनेक वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. ही सत्ता उलथवून लावण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली होती. त्यामुळे शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांनी एका भाषणात म्हटले होते की "या निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेतून शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात येईल. ही निवडणूक शिवसेनेसाठी शेवटची ठरेल." त्यांनी असाही दावा केला होता की, शिवसेनेची मते मनसेकडे वळतील आणि शिवसेना तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फेकली जाईल.

त्यावेळी प्रचार करताना उद्धव ठाकरेंनी 'बाजी' पलटावली होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानाचा उद्धव ठाकरे यांनी खुबीने वापर केला होता. त्यांनी हे विधान 'मराठी माणसाचा आणि मुंबईचा अपमान' म्हणून जनतेसमोर त्यांनी मांडला. 'आमचे अस्तित्व संपवण्याची भाषा करणाऱ्यांना मुंबईकरच धडा शिकवतील,' असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरेंनी यांनी केले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती त्यावेळी खालावलेली होती, अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी "अस्तित्व संपवण्याची" भाषा करणे शिवसैनिकांच्या जिव्हारी लागले होते.

या महापालिका निवडणुकीचा जेव्हा निकाल लागला, तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा पूर्णपणे फसला होता. शिवसेना-भाजप युतीने बहुमत मिळवले होते. शिवसेनेने 75 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे काँग्रेसची पीछेहाट झाली. सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला केवळ 52 जागांवर समाधान मानावे लागले होते. राजकीय विश्लेषकांच्या मते, त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या त्या विधानामुळे शिवसेनेची विखुरलेली मते एकवटली आणि मरगळ आलेल्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. त्याचा फायदा शिवसेनेला झाला होता.

त्याच प्रमाणे नऊ वर्षानंतर होत असलेली मुंबई महापालिका निवडणूक आता तोंडावर असताना ठाकरे बंधूंच्या राजकीय भवितव्यावरून जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यातच भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी 16 जानेवारीला ठाकरे बंधूंचे राजकीय अस्तित्व संपेल, असे विधान करून या चर्चेला तोंड फोडले आहे. सोमय्या यांनी “दोन्ही ठाकरे बंधूंना आता कळले आहे की, 16 जानेवारीला त्यांच्या दोन्ही गटांचे अस्तित्व समाप्त होणार आहे,” असे म्हटले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे गटावर कोविड काळात मुंबईकरांना 2 हजार कोटी रुपये लुटल्याचा आणि माफिया कॉन्ट्रॅक्टरने लुटलेल्या रकमेतून कमिशन मिळाल्याचा गंभीर आरोपही केला आहे.

दरम्यान, भाजपचे आणखी एक नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही “शेवटची निवडणूक” असेल, असे भाकीत केले आहे. त्यांच्या मते, या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्यकर्ते शिल्लक राहणार नाहीत आणि ते आपल्या सोयीने दुसऱ्या पक्षांमध्ये जातील. दानवे यांनी भाजपची संगत सोडून हिंदुत्वाला रामराम ठोकल्यानंतर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केल्यापासूनच ठाकरे गटाचा पक्ष संपुष्टात येत असल्याचे म्हटले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत याचा परिणाम दिसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

दानवे, सोमय्या यांची ही विधाने येत्या काळात भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकसंध राहिली नाही. एकनाथ शिंदे यांच्या जाण्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, प्रचार काळात उद्धव ठाकरे ऐनवेळी भावनिक मुद्दा पुढे करून प्रचारासाठी मैदानात उतरल्यानंतर मतदारांची सहानभूती मिळवत प्रचार सभेच्या माध्यमातून राज व उद्धव ठाकरे हे बंधू चित्र पलटावू शकतात. त्यामुळे दानवे, सोमय्या या दोघांनी अशाप्रकारचे विधान करून ठाकरे बंधूंच्या हाती आयते कोलीत दिले आहे.

येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू कशाप्रकारे महायुतीला टार्गेट करणार यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. सोमय्या, दानवेंचे हे विधान भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या काळात भाजप नेते कशा प्रकारे हे विधान खोडून काढणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT