Indranil Naik, Bhavana Gawali
Indranil Naik, Bhavana Gawali  Sarkarnama
विश्लेषण

Bhavana Gawali : इंद्रनील यांची ‘मणिकर्णिका’ जिंकेल का झाँशी…

सरकारनामा ब्यरो

- सचिन देशपांडे

Bhavana Gawali : पाच वेळा लोकसभा मतदारसंघावर पगडा असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या मतदारसंघात असे कोणते बंड झाले, की त्यांना महायुतीच्या मेळाव्यात थेट ‘मेरी झाँशी नही दूँगी’ अशी घोषणा करावी लागली. त्याचे कारणदेखील मोठे गंभीर होते.

महायुतीच्या या मेळाव्यात अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी बंडाचा झेंडा गाडला आणि मग मात्र महायुतीच्या मेळाव्यात मदन येरावार आणि पालकमंत्री संजय राठोड यांना चुप्पी साधावी लागली. इंद्रनील नाईक यांच्या बंडावर कुठलेही भाष्य या बड्या नेत्यांनी केले नाही आणि प्रतिक्रियादेखील दिली नाही.

खासदार भावना गवळी यांना विरोध करताना इंद्रनील नाईक यांनी सामाजिक संख्याबळाचा (बंजारा) आधार घेतला तो चुकीचा नव्हता, म्हणून त्यावर खासदार गवळी यांनीदेखील भाष्य केले नाही. यवतमाळ - वाशीम हा लोकसभा मतदारसंघ बंजाराबहुल मतदारसंघ आहे. मराठा, कुणबी समाजाचेदेखील तितकेच प्राबल्य या मतदारसंघात आहे.

अशा वेळी बंजारा महिलेला उमेदवारी देण्याची मागणी महायुतीच्या मेळाव्यात नाईक यांनी केल्यानंतर इंद्रनील नायकांच्या मनातील 'मणिकर्णिका' कोण, हा प्रश्न यवतमाळ - वाशीम या मतदारसंघातून राज्यभरात चर्चिला गेला आहे. त्यामुळे आता या 'मणिकर्णिके'चा शोध सर्वत्र घेतला जात आहे. त्याचबरोबर इंद्रनील नाईक यांची 'मणिकर्णिका' ही भावना गवळी यांच्या झाँशीवर ताबा घेईल काय ? अशी मुख्य विचारणा आता सुरू झाली आहे.

या मतदारसंघात तेलंगणात विजयश्री खेचून आणणारे काँग्रेसनेते, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल मानकर यांच्यापैकी कोणाला तरी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघावर शिवसेना (उबाठा) यांनीदेखील दावा करीत संजय देशमुख यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार भावना गवळी त्याचबरोबर पालकमंत्री संजय राठोड यांना कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना (उबाठा) संजय देशमुख यांना एक तर थेट लोकसभा लढविण्याचा आदेश देऊ शकते, अन्यथा संजय राठोड यांच्या दिग्रस मतदारसंघात थेट लढत देण्याचे सांगेल.

भावना गवळींनी मन केले मोठे, पण...

इंद्रनील नाईक यांनी मागणी केल्याप्रमाणे या सभेत खासदार भावना गवळी यांनी मन मोठे करीत झाँशी सोडण्याची तयारीदेखील दाखविली. पण, पालकमंत्री संजय राठोड यांच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघावर दावा सांगत त्यांना कोंडीत पकडले. मदन येरावार यांना भावनिक साद घालत लहान बहिणीचा लोकसभा मतदारसंघ कायम ठेवतील, अशी मागणी भावना गवळी यांनी येथे मांडली.

इंद्रनील यांच्या मनातील नेमकी 'मणिकर्णिका' कोण ?

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्ट्राँग आमदार इंद्रनील नाईक यांना हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडे घ्यावा लागेल. भावना गवळी यांनी 'कर्ण' म्हटलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा मतदारसंघ सहजासहजी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडतील, इतका साधा हा विषय नाही.

त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्यापासून सोबत असलेल्या आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधणाऱ्या भावना गवळी यांची झाँशीवरची पकड तशी घट्टच म्हणावी लागेल. पण, 400 खासदार जिंकणे हेच भाजपचा एकमेव निकष असल्याने इंद्रनील नाईक यांना तो निकष कसा पूर्ण करणार, याचे गणित सांगावे लागेल आणि सिद्धदेखील करावे लागेल.

बंजाराबहुल मतदारसंघात इंद्रनील नाईक यांनी पत्नी ॲड. मोहिनीताई नाईक यांचे तर नाव त्यांना सुचवायचे नव्हते ? असा प्रश्न उपस्थित होतो. कारण मागणी करताना नाईक यांनी महाराष्ट्रातून एक तरी बंजारा खासदार जावा, अशी इच्छा व्यक्त केली होती.

(Edited by Amol Sutar)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT