

Rahul Gandhi : काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा एकदा भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. राष्ट्रपती भवनातील स्वागत समारंभात आसामी गमछा 'गमोसा' न घातल्याने भाजपने गांधी यांच्यावर टीका केली आहे. हा आसामच्या लोकभावनांचा अपमान आहे, असा आरोप करत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी राहुल गांधी यांच्या माफीनाम्याची मागणी केली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा 'गमोसा' न घातल्याचा फोटो शेअर केला आहे.
प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवनात 'अॅट होम' कार्यक्रम आयोजित केला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या या स्वागत समारंभात युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राहुल गांधी उपस्थित होते. ईशान्येकडील राज्यांच्या कला, संस्कृती आणि पाककृती हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते.
या कार्यक्रमात उपस्थितांनी ईशान्येकडील पाककृतींचा आस्वाद घेतला. राष्ट्रपती मुर्मू यांनी एरी सिल्कपासून बनवलेल्या आणि खास डिझाइन केलेल्या गमछाने पाहुण्यांचे स्वागत केले. एरी सिल्कलाच पीस सिल्क असेही म्हणतात. हे सिल्क हे ईशान्येकडील अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग मानला जाते. येत्या 2 ते 3 महिन्यात आसाममध्ये निवडणूक होत असल्याने या थीमला एक राजकीय महत्वही प्राप्त झाले होते. याच गमछाला परिधान करण्यास राहुल गांधी यांनी नकार दिल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा म्हणाले, काळ बदलू शकतो, परंतु काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांचा अविर्भाव बदलत नाही. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी गमछा न घालता ईशान्येकडील राज्यांचा अपमान केला आहे, हा ईशान्येकडील लोकांचा अपमान आहे. राहुल गांधींनी पारंपारिक गमछा न घातल्याबद्दल माफी मागावी. अशा वर्तनावरून त्यांच्या पक्षाने या प्रदेशाचा आणि देशाच्या बऱ्याच भागाचा विश्वास का गमावला आहे हे स्पष्ट होते, असेही ते म्हणाले.
भाजप नेते अमित मालवीय म्हणाले, "राष्ट्रपती भवनात झालेल्या 'अॅट-होम रिसेप्शन'मध्ये सर्वांनी अभिमानाने ईशान्येचा उत्सव साजरा केला. पंतप्रधानांपासून युरोपियन युनियनचे नेते आणि परदेशी राजदूतांपर्यंतच्या सर्व पाहुण्यांनी आदरचे आणि सर्वसमावेशाचे प्रतीक म्हणून पारंपारिक गमछा (स्कार्फ) परिधान केला. केवळ राहुल गांधींनी तो परिधान केला नाही. राष्ट्रपतींनी त्यांना दोनदा आठवण करून दिली, त्यानंतरही त्यांनी गमछा घातला नाही, असा आरोपही त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.