
Political News : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दक्षिणेतील एका खासदाराने उत्तरेतील काही राज्यांना गोमूत्र राज्ये म्हणत हिणवले अन् भाजपला आयतं कोलित मिळालं. सोशल मीडिया टीमसह भाजपच्या अनेक नेत्यांनी इंडिया आघाडी हिंदुत्व, सनातन, हिंदू संस्कृतीच्या विरोधात असल्याचे बाण सोडले, पण ‘गोमूत्र’ वादामुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड ही उत्तरेकडील राज्ये कथित गायपट्टा, गोबर बेल्ट आहे का, या चर्चेला तोंड फुटले आहे.
मध्य प्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड (Chhattisgarh) आणि राजस्थानमध्ये (Rajasthan) भाजपने सत्ता मिळवली आहे. त्यावर लोकसभेत बोलताना डीएमकेचे खासदार सेंथिल कुमार यांनी या राज्यांचा उल्लेख गोमूत्र राज्ये असा केला होता. त्यावर मोठा गदारोळ झाल्यानंतर त्यांनी लोकसभेतच माफी मागत शब्द मागे घेतले, पण केवळ सेंथिल कुमारच नव्हे तर यापूर्वीही अनेक राजकीय नेत्यांनी उत्तरेकडील हिंदी भाषिक राज्यांचा उल्लेख गायपट्टा, गोबर बेल्ट असा केला जातो.
केंद्रीय पशुसंवर्धन विभागाकडून देशातील गोवंश, म्हशी, शेळ्या यांसह सर्व पशूंची गणना केली जाते. या विभागाच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा अहवाल काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाला आहे, तर २०१९ मध्ये पशुगणना झाली होती. २०२२-२३ ची आकडेवारी पाहिली तर देशात सर्वाधिक गोवंश संख्या पश्चिम बंगालमध्ये १ कोटी ९० लाखांहून अधिक होती, तर अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश (१ कोटी ९० लाख १९ हजार ६४१) आणि मध्य प्रदेश (१ कोटी ८७ लाख ५० हजार ८२८) ही राज्ये आहेत. चौथ्या क्रमांकावर बिहार आणि पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आता कथित गायपट्टा (काऊ बेल्ट), गोबर बेल्ट, गोमूत्र राज्ये... याकडे वळूयात. तसे पाहिले तर देशात सर्वाधिक गोवंश पश्चिम बंगालमध्ये आहेत. २०१९ च्या जनगणनेतही बंगाल अव्वल होते. मग उत्तरेकडील राज्यांनाच गायपट्टा का म्हटले जाते? याचे उत्तर सोपे आहे. गायपट्टा हे केवळ एका राज्याला उद्देशून म्हटले जात नाही, तर उत्तरेतील पाच-सहा शेजारील राज्यांचा हा पट्टा आहे, जिथे गोवंश संख्या अधिक आहे. ताज्या आकडेवारीचा आधार घेऊन सांगायचे झाले तर गोवंश संख्येच्या बाबतीत पहिल्या दहा राज्यांमध्ये सहा राज्ये उत्तरेतील आहेत.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड ही ती सहा राज्ये आहेत. केवळ गोवंश संख्या जास्त असल्यामुळे या राज्यांना गायपट्टा म्हटले जाते असेही नाही. या राज्यांना गोबर बेल्ट म्हणून हिणवण्यात येणाऱ्यांकडून तेथील आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक विकासाचा दाखला दिला जातो. यातील काही राज्यांना ‘बिमारू राज्ये’ म्हणूनही काही नेत्यांकडून टीका करण्यात आली आहे. साक्षरतेचे कमी प्रमाण, बेरोजगारी, उद्योगधंद्यांची वाणवा ही कारणे त्यासाठी दिली जातात. अर्थात मागील काही वर्षांत हे चित्र बदलत चालले आहे.
देशातील गोवंश संख्येनुसार टॉप टेन राज्ये -
१. पश्चिम बंगाल (१ कोटी ९० लाख ७७ हजार ९१६)
२. उत्तर प्रदेश (१ कोटी ९० लाख १९ हजार ६४१)
३. मध्य प्रदेश (१ कोटी ८७ लाख ५० हजार ८२८)
४. बिहार (१ कोटी ५३ लाख ९७ हजार ९८०)
५. महाराष्ट्र (१ कोटी ३९ लाख ९२ हजार ३०४)
६. राजस्थान (१ कोटी ३९ लाख ३७ हजार ६३०)
७. झारखंड (१ कोटी १२ लाख २३ हजार ५२)
८. आसाम (१ कोटी ९ लाख ९ हजार २३९)
९. छत्तीसगड (९९ लाख ८३ हजार ९५४)
१०. ओडिशा (९९ लाख ३ हजार ९७०)
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.