

Gen Z Politics: देशात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर राजकीय वातावरणच बदलू पाहत आहे. या आंदोलनाद्वारे जेनझींनी दाखवलेल्या आपल्या ताकदीची जाणीव आता भारतातील सर्वच राजकीय पक्षांना होऊ लागली आहे. त्यामुळंच आता या जेनझींसाठी या पक्षांकडून पायघड्या टाकल्या जात आहेत. त्यांच्या भाषेत संवाद साधला जात आहे, त्यांच्या स्टाईलनं वागण्या-बोलण्याचा प्रयत्न केला जात आहे. असाच एक परिणाम म्हणजे देशातील एका बड्या राजकीय पक्षानं आपल्या तरुण नेत्याचं याच जेनझींच्या मदतीनं रिलॉन्चिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
नीटच्या पेपरलीक विरोधात उत्तर प्रदेशातही तरुणांनी उत्स्फुर्तपणे आंदोलन केलं होतं. या आंदोलनावरुन संसदेत जोरदार वादविवाद पाहायला मिळाला. यापार्श्वभूमीवर तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातच बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) सर्वोसर्वा मायावती यांनी आपले भाचे आकाश आनंद यांना पुन्ह एकदा मैदानात उतरवण्यााच निर्णय घेतला आहे. बसपाकडून आकाश आनंद या ३० वर्षीय नेत्याला रिलॉन्च करणार असून त्यांच्या चेहऱ्याद्वारे आगामी विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना पक्षाकडं आकर्षून घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
त्यानुसार, आकाश आनंद हे १० ऑगस्ट रोजी पश्चिम उत्तर प्रदेशातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यानंतर अशा प्रकारच्या अनेक बैठका घेतल्या जाणार आहेत. याद्वारे २०२७ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या संभाव्य घोषणा देखील केल्या जाऊ शकतात. ३१ वर्षीय आकाश आनंद हे १० ऑगस्ट रोजी हाथरस जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. या ठिकाणाहून सादाबाद विधानसभा मतदारसंघातून अविन शर्मा नामक उमेदवाराची घोषणाही केली जाणार असल्याचं कळतंय. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत हेच अविन हे बसपाच्या तिकीटावर तिसऱ्या स्थानी राहिले होते. त्यानंतर आकाश आनंद यांची पुढची बैठक २२ ऑगस्ट रोजी जेवर इथं होणार आहे, या मतदारसंघातही बसपा पक्ष गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या स्थानी राहिला होता.
बसपा उत्तर प्रदेशचे अध्यक्ष विश्वनाथ पाल यांनी सांगितलंय की, उमेदवारांची याची मायावती यांच्याजवळ आहे. तसंच विधानसभा स्तरावर व्यक्तिगतरित्या नावांची घोषणा केली जात आहे. यासाठी समर्पित कार्यकर्ता, पक्ष संघटन आणि जिंकून येण्याची क्षमता हे तिकीट देतानाचे निकष असणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.
उत्तर प्रदेशात आकाश आनंद यांचं रिलॉन्चिंग राज्याच्या राजकारणात दुसऱ्या टर्मप्रमाणं पाहिलं जात आहे. राज्यात त्यांनी शेवटची सभा ९ ऑक्टोबर २०२५ रोजी मायावती यांच्यासोबत लखनऊच्या कांशीराम स्मारकावर केली होती. गेल्या दोन वर्षात मायावती यांच्यासोबत सुरु असलेल्या त्यांच्या नात्यातील चढउताराला ठीक करण्याच्या दिशेनं टाकलेलं हे एक पाऊल समजलं जात आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मायावती यांच्या राजकीय उत्तराधिकारी म्हणून आकाश आनंद यांच्यावर बसपाच्या निवडणूक मोहिमेचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं.
पण लोकसभा निवडणुकीदरम्यान आकाश आनंद यांनी सीतापूरमध्ये दिलेल्या एका निवडणूक प्रचाराच्या भाषणावरुन वाद झाल्यानं मायावती आणि आनंद यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर मायावती यांनी आनंद यांना पक्षाच्या राष्ट्रीय समन्वय पदावरुन हटवलं होतं. तसंच आपला राजकीय वारसदार म्हणून जाहीर केलेली घोषणाही त्यांनी मागे घेतली होती. त्यांना निवडणुकीत प्रचार करण्यापासूनही रोखण्यात आलं होतं. पण आता पुन्हा एकदा या दोघांमधील संबंध व्यवस्थित झाले असून आनंद यांची मुख्य राष्ट्रीय समन्वयक आणि त्यानंतर बसपाचा राष्ट्रीय संयोजक म्हणून नियुक्ती केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.