
New Delhi, 02 June : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना दिल्लीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला बोलावले होते. पण, ते का आले नाहीत, मला माहिती नाही. (हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधींचा प्रतिनिधी म्हणून आलो असल्याचे स्टेजवरून सांगितले) पण, आगामी काळात दोस्ती होऊ शकते. मी अजूनही आशावादी आहे. ‘इंतजार का फल मिठा होता है...जो होता है वो अच्छा होता है,’ असे सांगून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी नव्या राजकीय मैत्रीसाठी थांबायला तयार असल्याचे स्पष्ट केले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमासाठी महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव यांना निमंत्रण दिले होते. मात्र, हे तीनही नेते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, काँग्रेसकडून महाराष्ट्राचे प्रदेशध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार मोहन जोशी हे आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP SP) सक्षणा सलगर, सुशीला मोराळे, लोकजनशक्ती पार्टीचे चौरासिया आदींनी हजेरी लावली हेाती. मात्र, प्रमुख नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये काहींशी नाराजीची भावना होती. मात्र, पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कोणतीही नाराज न दाखवता मी अजूनही आशावादी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जानकर म्हणाले, राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव आले नाहीत. पण, ‘इंतजार का फल मिठा होता है...जो होता है, वो अच्छा होता है.’ ज्या समाजाची संघटना आहे, त्याच समाजाची ताकद असते. पण, धनगर समाजाचा पक्ष नसल्यामुळे तो देशात बेदखल होता. पण, सध्या आमची दखल घेण्याची वेळ प्रस्थापित पक्षांवर आलेली आहे.
मी नाराज नाही
व्यस्त कार्यक्रमामुळे राहुल गांधी, अखिलेश यादव आणि शरद पवार कार्यक्रमाला आले नाहीत. पण ते न आल्यामुळे मी नाराज नाही. ही तर सुरुवात आहे, आम्हाला आणखी पुढे जायचे आहे आणि देशावर राज्य करायचे आहे. अहिल्यादेवी होळकर जयंती तो बहाना है, दिल्लीमें शासन लाना हमारा अखिरी निशाणा है. लाल किल्ल्यावरून भाषण करणे हेच आमचे ध्येय असणार आहे.
रासपला चार राज्यांत निवडणूक आयोगाची मान्यता
मी गेली तीस वर्षांपासून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करत आहे. निवडणूक आयोगाकडून आम्हाला चार राज्यांत मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्रात चार आमदार निवडून आले. गुजरातमध्ये रासपचे २८ नगरसेवक निवडून आले आहेत. एक उमेदवार १२०० मतांनी हरला आहे. कर्नाटक, उत्तरप्रदेशमध्ये आम्ही चांगली मते मिळाली आहेत.
...तर मी अमेरिकेत अहिल्यादेवींची जयंती साजरी करेन
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडीमध्ये मी पहिल्यांदा सुरू केली. त्याच गावात मी राष्ट्रीय समाज पक्षाची घोषणा केली. राज्य सरकारने चौंडीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करायला सुरुवात केली. त्यानंतर मी मुंबईत जयंती साजरी करायला लागलो. सरकारने मुंबईतही जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी दिल्लीत आलो. आता दिल्लीत केंद्र सरकार जेव्हा अहिल्यादेवींची जयंती करायला लागेल, तेव्हा मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अमेरिकेत अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करेन.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.