
Mumbai, 01 June : महायुतीमध्ये गेली सहा महिन्यांपासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतचा विषय भिजत पडलेला आहे. पहिल्यांदा जाहीर झालेल्या पालकमंत्रिपदाच्या नावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओसहून स्थगिती दिलेली आहे. ती अद्याप कायम आहे. मधल्या काळात अनेक घडामोडी घडल्या, पण या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद मिटलेला नाही. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आक्रमक असलेले रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचा सूर आता काहींसा बदलेला दिसत आहे, त्यामुळे शिंदेसेनेला रायगडचं पालकमंत्रिपद मिळणार का, हा खरा प्रश्न आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची, तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती जाहीर केली होती. मात्र, या नियुक्त्यांवरून शिवसेनेचे मंत्री आणि शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. विशेषतः रायगडमध्ये रास्ता रोको आणि जाळपोळ करण्यात आली होती. त्या आंदोलनात खुद्द मंत्री भरत गोगावलेही (Bharat Gogawale) सहभागी झाले होते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना थेट दाओसवरून दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीस स्थगिती दिली होती.
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून (Raigad Guardian Minister) शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार वाद रंगला होता. विशेषतः तटकरे आणि शिवसेना मंत्री, आमदार यांच्या कलगीतुरा रंगला होता. दाओसहून आल्यानंतर पालकमंत्रिपदाचा सोडविला जाईल, असे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनीही त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले होते. त्यामुळे रायगडचं पालकमंत्रिपद नेमकं कोणाला मिळणार, याची उत्सुकता वाढली होती. शाह हे तटकरेंच्या घरी गेल्याने शिवसेना नेत्यांनी आदळाआपट केली होती. मात्र, त्या भेटीनंतरही रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. त्याच दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची सह्याद्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे त्यांनी पालकमंत्रिपदाचा विषय त्यांच्या कानावर घेतल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतरही प्रश्न कायम आहे.
दरम्यान, रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी आज पुन्हा रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत भाष्य केले आहे. पालकमंत्रिपदाचा तिढा आज सुटणार आहे, अशी चर्चा ज्या लोकांमध्ये होती, त्याबाबत मला काही माहिती नाही, त्यांनाच माहिती आहे. पण रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय जेव्हा होईल, तेव्हा तो आम्हाला मान्य असेल, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.
मंत्री भरत गोगावले आणि रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार हे पालकमंत्रिपदाबाबत प्रचंड आग्रही होते. त्यासाठी ते आक्रमक होते. मात्र, जसा काळ पुढे सरकला तसे त्यांच्यातील या विषयावरील आक्रमकपणाही कमी झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री गोगावलेंचे आजचे विधानही एकदम नरमाईचे होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.