

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी भाजप एकीकडं एनडीएचं संख्याबळ मजबूत करण्याच्या कामाला लागली आहे. तर दुसरीकडं पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्यावरुन काँग्रेससाठी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टेजवरुनच काँग्रेसला धाकधूक वाढवणारा मेसेज दिला आहे. त्यामुळं इतर महत्वाचे पक्ष फोडून झाल्यानंतर भाजपनं काँग्रेसकडं आपला मोर्चा वळवल्याची चर्चा सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंदीगडच्या रॅलीमध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार मनिष तिवारी यांची मोठ्या उत्साहात भेट घेतली. पंजाबमध्ये काँग्रेस नेते चरणजीत सिंह चन्नी आणि अमरिंदर सिंह राजा वडिंग यांच्यामधील रस्सीखेचमध्ये मोदींनी मनिष तिवारींशी हस्तांदोलन करत बराच वेळ चर्चाही केली. मनिष तिवारी यांनी अनेक मुद्द्यांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते सध्या चंदीगडमधून काँग्रेसचे खासदार आहेत. त्यामुळं पंतप्रधानांचा दौरा असल्यानं शिष्टाचार आणि प्रोटोकॉलनुसार ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. पण या ठिकाणी मोदींनी त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केल्यानं राजकारण एकदम चांगलच तापलं आहे. पंतप्रधान मोदी आणि मनिष तिवारी यांची मुलाखत सोशल मीडियावर चर्चेत आहे.
नुकतेच काँग्रेसनं पंजाब विधानसभा निवडणूक २०२७ साठी काही नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्यांवर मनिष तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. पंजाब काँग्रेसच्या संगठनात्मक फेरबदलांमध्ये आणि निवडणूक समित्यांमध्ये आपल्या नावाचा समावेश न केल्यामुळं त्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती. पक्षाला इथं कोणीही जबाबदार व्यक्ती न मिळाल्याबद्दल त्यांचं दुःख सोशल मीडियावर व्यक्त केलं होतं. याला त्यांनी पक्षाच्या नेतृत्वामध्ये असुरक्षितता असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. ज्या प्रकारे पंतप्रधान मोदी यांनी मनिष तिवारी यांची भेट घेतली यानंतर चर्चा सुरु झाली. मनिष तिवारी देखील भाजपच्या रडारवर असल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान मोदी आणि तिवारी यांच्या चर्चेदरम्यान तिथं जेपी नड्डा देखील उपस्थित होते.
पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम इथं भारतीय पर्यटकांवर बेछुट गोळीबार केल्यानंतर भारतानं भारताविरोधात युद्ध पुकारलं होतं. यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं होतं. भारतीय सैन्य दलांनी राबवलेल्या या ऑपरेशन सिंदूर दरम्यान, केंद्र सरकारनं जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे काही गट तयार करुन त्यांना विविध देशांच्या दौऱ्यावर पाठवलं होतं. या ऑपरेशन सिंदूरच्या डेलिगेशनमध्ये मनिष तिवारी यांचा देखील समावेश होता.
मनिष तिवारी यांचं वय सध्या सुमारे ६० वर्षे आहे. ते तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. केंद्र सरकारमध्ये ते एकदा मंत्री देखील होते. मनिष तिवारी एक चांगले वक्ते आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. मनमोहन सिंग यांच्या युपीए-२ च्या सरकारमध्ये ते माहिती व प्रसारण मंत्री होते. आपल्या कॉलेजच्या जीवनापासून मनिष तिवारी हे काँग्रेसशी जोडले गेलेले आहेत. एकूणच गेल्या ४५ वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत. ऑल इंडिया युथ काँग्रेसचे ते राष्ट्रीय अध्यक्ष देखील राहिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.