

Rahul Gandhi letter to CM Fadnavis : पुण्यात झालेल्या 'छात्रों की गुंज' कार्यक्रमादरम्यान एका आदिवासी विद्यार्थिनीने काँगेस नेते राहुल गांधी यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला होता. मीही आंदोलनाच्या ठिकाणी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी येईल, असे आश्वासन त्यांनी विद्यार्थिनीला दिले होते. या कार्यक्रमानंतरच काही तासांत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे.
राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना धाडलेले पत्र सोशल मीडियात पोस्ट केले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचे मांजरी येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू असून मंगळवारी या आंदोलनाचा तेरावा दिवस आहे. मात्र, अद्याप सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. 'छात्रों की गुंज' कार्यक्रमात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत राहुल यांनी आपल्या पत्रात उल्लेख करून मुख्यमंत्र्यांना आंदोलनस्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडवाव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याबाबत ३० वर्षे ही वयाची अट घालण्यात आली आहे. वसतिगृह असुरक्षित बनली असून अस्वच्छता, वैद्यकीय सुविधा नसणे, अपुरे जेवण अशा समस्या आहेत. महिलांना मिळणाऱ्या सुविधांची स्थिती दयनीय असल्याचे राहुल यांनी पत्रात म्हटले आहे.
विद्यार्थिनींचे फिटनेस तपासताना प्रेग्नन्सी टेस्टसह अन्य वैद्यकीय चाचण्या कराव्या लागत असल्याचे ऐकून धक्का बसल्याचेही राहुल यांनी पत्रात म्हटले आहे. हा मुद्दा छात्रों की गुंज कार्यक्रमातही उपस्थित झाला होता. हा नियम महिल्यांचा आत्मसन्मान आणि मानवतेवरच हल्ला असल्याची नाराजी राहुल यांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांना खैरात नको आहे. ते त्यांच्या हक्काची मागणी करत आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या या पत्रानंतर आता या आंदोलनाची देशपातळीवर चर्चा सुरू झाली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुविधांबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. आंदोलकांना भेटण्यासाठी नेत्यांची रीघ लागण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार, भारतीय आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक् आणि आमदार विक्रांत भूरिया तसेच माजी मंत्री वसंत पुरके मांजरी येथे उपोषणस्थळी भेट देणार आहेत. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्यासह विविध पक्ष-संघटनांचे नेतेही विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.