
थोडक्यात महत्वाचे :
राहुल गांधींच्या मत चोरीच्या आरोपांना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जोरदार प्रत्युत्तर देत त्यांना 7 दिवसांत शपथपत्र सादर करावे किंवा माफी मागावी, असे आव्हान दिले.
निवडणूक आयोगाने मतदारयाद्या, दुबार मतदान आणि मतदान टक्केवारीसंबंधी सर्व आरोप फेटाळून लावत पुरावे नसल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील मतदारयाद्यांमधील कथित घोळ व मतदानाच्या टक्केवारीवर आयुक्तांनी स्पष्टीकरण देत सर्व प्रक्रिया पारदर्शक असल्याचा दावा केला.
Rahul Gandhi vs Election Commission row : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने सुरू असलेल्या मत चोरीच्या आरोपांना रविवारी भारतीय निवडणूक आयोगाने जोरदार प्रत्युत्तर दिले. थेट मुख्य निवडणूक आयुक्तच मैदानात उतरले असून त्यांनी राहुल गांधींना सात दिवसांचा जणू अल्टिमेटम दिला आहे. अत्यंत संतापाच्या स्वरात बोलताना निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधींचे सर्व आरोप फेटाळून लावले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत राहुल यांच्यासह विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. मत चोरीच्या आरोपांवर कर्नाटक निवडणूक आयोगाने राहुल यांना शपथपत्रावर लिहून देण्याची विनंती केली आहे. मात्र, त्यांनी असे शपथपत्र देण्यास नकार दिला आहे. याअनुषंगाने ज्ञानेश कुमार यांनी भाष्य केले.
ज्ञानेश कुमार म्हणाले, शपथपत्रावर सहा करा नाहीतर माफी मागा. तिसरा पर्याय नाही. जर (राहुल गांधींनी) त्यांनी सात दिवसांत शपथपत्र सादर केले नाही तर त्यांचे आरोप निराधार होते, असा त्याचा अर्थ समजला जाईल, असे थेट आव्हानच मुख्य निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधींना दिले.
निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन देशातील मतदारांना लक्ष्य केले जात असेल तर आम्ही शांत बसणार नाही. निवडणूक आयोग खडकाप्रमाणे सर्व मतदारांसोबत उभा असेल. संविधानिक कर्तव्याप्रती आयोग बांधील असून सर्व राजकीय पक्षांना एकसारखीच वागणूक दिली जात असल्याचेही ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केले.
दुबार मतदानावर बोलताना निवडणूक आयुक्त म्हणाले, काही मतदारांनी हे मुद्दे उपस्थित केले असले तरी त्याबाबत विचारणा केल्यानंतर काहीच पुरावे देण्यात आलेले नाहीत. अशा खोट्या आरोपांनी मतदार किंवा आयोग घाबरून जाणार नाही, असेही ज्ञानेश कुमार म्हणाले.
मतदारांच्या प्रायव्हसीचे हनन होऊ देणार नाही, असे सांगताना निवडणूक आयुक्त म्हणाले, सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच मशीन रिडेबल मतदारयाद्यांवर निर्णय दिला आहे. या मतदारयाद्या दिल्यास मतदारांच्या प्रायव्हसीच्या अधिकाराचे हनन होऊ शकते. अशा परिस्थितीत महिलांसह इतर कुणाचेही मतदानावेळचे सीसीटीव्ही फुटेज कसे दिले जाऊ शकते?
महाराष्ट्राबाबत काय म्हणाले?
महाराष्ट्रातील मतदारयाद्यांमधील कथित घोळ आणि सायंकाळी वाढलेल्या मतदानाच्या ट्ककेवारीच्या आरोपांवरही ज्ञानेश कुमार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, निवडणुकीआधीत तात्पुरती मतदारयादी प्रसिध्द करण्यात आली होती. पण त्यावर कुणीच आक्षेप घेतला नाही. निवडणुकीनंतर आठ महिने झाले तर उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आलेली नाही. सायंकाळच्या वाढलेल्या टक्केवारीही बोलले जात आहे. पण प्रत्येक तासाला दहा टक्के मतदान अशी सरासरी असते. सायंकाळीही तीच सरासरी राहिल्याचेही निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Q1: राहुल गांधींना निवडणूक आयुक्तांनी काय आव्हान दिले?
A: सात दिवसांत शपथपत्र सादर करा किंवा माफी मागा.
Q2: दुबार मतदानाच्या आरोपांबाबत आयोगाची भूमिका काय आहे?
A: कोणतेही पुरावे सादर झाले नसल्याने आरोप निराधार आहेत.
Q3: मतदारयाद्यांवरील वादांबाबत काय सांगितले?
A: तात्पुरत्या मतदारयाद्या जाहीर केल्या होत्या, त्यावर कोणताही आक्षेप घेतला नव्हता.
Q4: सायंकाळच्या वाढलेल्या मतदानाबाबत आयोगाचे स्पष्टीकरण काय आहे?
A: सरासरीप्रमाणे प्रत्येक तासाला १०% मतदान होते, त्यामुळे सायंकाळीही तीच टक्केवारी राहिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.