

Telangana News: तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आणि माजी खासदार के. कविता यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. त्यांनी 'तेलंगणा राष्ट्र समिती' (टीआरएस) या पक्षाची स्थापना केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचे वडील आणि तेलंगणा राज्याचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही एकेकाळी याच नावानं मोठी तेलंगणा चळवळ उभी केली होती.
माजी खासदार के. कविता यांची काही दिवसांपूर्वीच त्यांचे वडील केसीआर यांच्या'भारत राष्ट्र समिती' (बीआरएस) या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत बीआरएसमधून निलंबित करण्यात आले होते. आता तेलंगणाच्या राजकारणात के.कविता यांनी नव्या पक्षाची पत्रकार परिषदेदरम्यान,घोषणा केली आहे.
तेलंगणा राष्ट्र समिती या नव्या पक्षाच्या निर्मितीविषयी के. कविता यांनी भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, तेलंगणा राज्य बनून 12 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. परंतु जनतेच्या अपेक्षा अजूनही अपूर्ण आहेत. यावेळी 12 वर्षे उलटूनही तेलंगणा चळवळीचा मूळ पाया असलेल्या नागरिकांच्या पाणी, पैसा आणि रोजगार या गरजा आम्ही सोडवू शकलो नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तेलंगणात सत्तेत आलेल्या मागच्या सर्व राज्य सरकारांनी शेतकरी, तरुण, व्यावसायिक आणि मागासलेल्या समाजाच्या आशा धुळीस मिळवल्याची टीकाही माजी खासदार के.कविता यांनी केली आहे. तसेच त्यांच्या नव्या पक्षाचे ध्येय सर्वांसाठी विकास आणि आत्मनिर्भरता हे असल्याचंही म्हटलं आहे.
के.कविता म्हणाल्या, सरकार लोकांच्या अधिक जवळ आणणे हे त्यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती या नव्या पक्षाचं ध्येय असणार आहे. राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांकडून अनेकदा दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या स्थानिक मुद्द्यांना त्या प्राधान्य देणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.तसेच जात, धर्म किंवा समुदायाच्या आधारावर कोणताही भेदभाव न करता आपला पक्ष सर्वांची सेवा करणार असल्याची ग्वाही के.कविता यांनी केला आहे.
के.कविता यांनी बीआरएस आणि भाजपवर या दोन्ही पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. त्या म्हणाल्या, तेलंगणामध्ये बीआरएस आणि भाजप हे दोन्ही पक्ष विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यात अपयशी ठरले आहेत. बीआरएस पक्ष 1000 वर्षांनंतरही बदलणार नाही. तेलंगणाच्या निर्मितीसाठी लढलेल्यांचा उल्लेखही नसल्याचं त्यांनी सांगितलं.
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह इतर 23 जणांना फेब्रुवारी 2026 मध्ये क्लीन चिट देण्यात आली होती. या प्रकरणात तेलंगणा जागृतीच्या अध्यक्षा कलवाकुंतला कविता यांचाही समावेश होता. न्यायालयानं के.कविता यांच्यासह 23 जणांची निर्दोष मुक्तता करताना या प्रकरणात त्यांनी काही गैरकृत्य केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं म्हटलं होतं.
दारू घोटाळा प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर के.कविता यांनी मी शंभरवेळा आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं होतं. हे एक राजकीयदृष्ट्या प्रेरित प्रकरण आहे. राजकीय सूडबुद्धीने विरोधी पक्षांवर हे प्रकरण लादण्यात आले आहे आणि न्यायव्यवस्थेवरील आमचा विश्वास कायम ठेवल्याबद्दल मी न्यायव्यवस्थेची आभारी असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.