
कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांचे (Civic Polls) निकाल आज लागले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी या निवडणुकीत विरोधकांना धूळ चारली आहे. याचवेळी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत ममतांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढले आहे.
सुवेंदू अधिकारी यांनी विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम मतदारसंघात ममतांचा पराभव केला होता. नंदिग्राम हा अधिकारी कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. नंतर ममता या भवानीपूरमधून विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. आता ममतांनी या पराभवाची परतफेड केली आहे. अधिकारी कुटुंबाचा बालेकिल्ल्याला त्यांनी सुरूंग लावला आहे. अधिकारी कुटुंबीयांचे तब्बल 40 वर्षापासून वर्चस्व असलेली कंठी महापालिका तृणमूलने हिरावून घेतली आहे. हा सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का मानला जात आहे. सुवेंदू यांचे पिता शिशिर अधिकारी हे 1991 ते 2009 या कालावधीत तब्बल 25 वर्षे या महापालिकेचे अध्यक्ष होते. केवळ 1981 ते 1986 हा अपवाद वगळता पाच टर्म ते अध्यक्ष होते.
शिशिर अधिकारी हे खासदार झाल्यानंतर त्यांनी महापालिकेची धुरा त्यांचे लहान पुत्र दिव्येंदू अधिकारी यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर 2016 च्या पोटनिवडणुकीत दिव्येंदू खासदार झाल्यानंतर त्यांचे लहान बंधू सौमेंदू यांच्यावर महापालिकेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता अधिकारी कुटुंबीयांचे कायम ताब्यात असणारी महापालिका खेचून ममतांनी मोठा धक्का दिला आहे. अधिकारी कुटुंबाला विधानसभा निवडणुकीनंतर बसलेला हा पहिलाच मोठा धक्का आहे.
काँग्रेस (Congress), भाजपसह (BJP) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (CPIM) मोठा धक्का बसला असून, 108 महापालिका आणि नगरपालिकांपैकी एकाही ठिकाणी विरोधकांना आघाडी मिळवता आलेली नाही. या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले होते. या निवडणुकीत एकूण 2 हजार 171 जागा आहेत. त्यातील तब्बल 994 जागा तृणमूलने जिंकल्या आहेत. याचबरोबर तृणमूलने 456 जागांवर आघाडी घेतली आहे. याचवेळी अपक्षांनी 83 जागा मिळवल्या आहेत. भाजपला 46 जागा जिंकता आल्या आहेत. काँग्रेसला 32 तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 20 जागा मिळाल्या आहेत. भाजप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस हे एकाही महापालिका अथवा नगरपालिकेत आघाडीवर नाहीत.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधाननगर, सिलिगुडी, चंदननगर आणि असनसोल या चार महापालिकांत तृणमूलने सत्ता मिळवली होती. चारही महापालिकांत तृणमूलने बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळवून भाजप, काँग्रेससह डाव्या पक्षांना धूळ चारली होती. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवली. या निवडणुकीत भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली होती. ममतांनी विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळत विरोधकांना धूळ चारली होती. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसने बाजी मारत कोलकता महापालिकेत मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे आता आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.