

भारतीय राजकारणात पाय रोवण्यासाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचे जाळे विणण्यासाठी कोणत्याही पक्षाला अनेक दशकांचा काळ लागतो. मात्र, भारताच्या राजकीय इतिहासात असे काही मोजके 'चमत्कारी' पक्ष आहेत, ज्यांनी स्थापनेनंतर अवघ्या काही महिन्यांतच निवडणुकीत विजय मिळवून सत्ता स्थापन करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे.
तामिळनाडूत विजय यांच्या 'टीव्हीके'ने (TVK) २०२६ मध्ये मिळवलेला विजय या मालिकेतला सर्वात ताजा अध्याय ठरला आहे. पण विजय केवळ मुख्यमंत्री होतोय. भारतात यापूर्वी जनता पक्षाने त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत थेट देशाची सत्ता काबीज केली होती. या पक्षाचे गुजरातचे नेते मोरारजी देसाई पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.
पहिल्याच प्रयत्नात 'किंग' बनलेले पक्ष
जनता पार्टी | मोरारजी देसाई | १९७७ | केंद्र
तेलगू देसम पार्टी | एन. टी. रामा राव | १९८३ | आंध्र प्रदेश
आसाम गण परिषद | प्रफुल्ल कुमार महंत | १९८५ | आसाम
समाजवादी पार्टी | मुलायम सिंह यादव | १९९३ | उत्तर प्रदेश
आम आदमी पार्टी | अरविंद केजरीवाल | २०१३ | दिल्ली
तमिलगा वेत्री कळघम | विजय | २०२६ | तामिळनाडू
विजयाची कारणे :
जनआंदोलनातून जन्म :
आसाम गण परिषद (आसाम आंदोलन) आणि आम आदमी पक्ष (अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन) हे पक्ष जनक्षोभातून जन्माला आले. जनतेचा प्रस्थापित सत्ताधाराऱ्यांविरोधातील रोष थेट मतांमध्ये परावर्तित झाला. त्यामुळे या दोन्ही पक्षांना दीर्घकाळ संघटना बांधणीची वाट पाहावी लागली नाही.
'स्टारडम'चा प्रभाव :
आंध्र प्रदेशात एन. टी. रामा राव आणि तामिळनाडूत विजय यांनी त्यांच्या प्रचंड चित्रपट चाहत्यांच्या जोरावर राजकीय व्यवस्था उभी केली. दक्षिण भारतात सिने-स्टारडम हा पहिल्याच प्रयत्नात विजयाचा सर्वात वेगवान मार्ग ठरला आहे.
विलीनीकरण आणि राजकीय फेररचना :
१९७७ चा जनता पार्टी हा एक वेगळा प्रयोग होता. हा पक्ष नेत्यांच्या दृष्टीने नवीन नव्हता, पण तांत्रिकदृष्ट्या मतपत्रिकेवर नवीनच पक्ष होता. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींच्या काँग्रेसला पराभूत करण्यासाठी अनेक विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी पहिल्याच प्रयत्नात केंद्रात सत्ता स्थापन केली.
फाटाफूट आणि 'सोशल इंजिनीअरिंग' :
मुलायम सिंह यादव यांनी १९९२ मध्ये 'जनता दल'मधून बाहेर पडून 'समाजवादी पक्षा'ची स्थापना केली. त्यांनी शून्यातून सुरुवात न करता जनता दलातील मोठे नेते आणि कार्यकर्ता वर्ग सोबत घेतला. जोडीला त्यांनी M-Y म्हणजेच मुस्लिम-यादव (M-Y) हे समीकरण मांडले, ज्यामुळे त्यांना तत्काळ हक्काची व्होट बँक मिळाली.
बाबरी मशीद पडल्यानंतर निर्माण झालेल्या वातावरणात, स्थापनेनंतर अवघ्या १४ महिन्यांत समाजवादी पक्षाने सत्तेपर्यंत मजल मारली. १०९ जागा जिंकून मुलायम सिंह यांनी बसपाच्या मदतीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. थोडक्यात काय तर योग्य टायमिंग, प्रबळ नेतृत्व आणि जनभावनांचे पाठबळ असेल, तर दशकांची प्रतीक्षा न करताही सत्तेचे शिखर गाठता येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.