
Nagpur News : नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. तर दुसरीकडे राज्यात राजकीय घडामोडी मोठ्या वेगाने घडत आहेत. महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप कधी होणार, याची उत्सुकता लागली आहे. यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवस अनुपस्थितीत असल्याने चर्चांना उधाण आले आहे. राज्य मंत्रीमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात न आल्याने वातावरण चांगलेच तापले असताना बुधवारी मात्र अजितदादा विधानसभेत दाखल झाले. तब्बल तासभर बसून होते. मात्र, ते एक शब्दही बोलले नाहीत. (Ajit Pawar News)
मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी दोन दिवासांपासून नॉट रिचेबल होते. हिवाळी अधिवेशन सुरू असताना पहिले दोन दिवस सभागृहात आले नाहीत. कोणी म्हणाले ते दिल्लीत गेले, काहींनी नागपूरमध्येच असल्याचा दावा केला होता. मंत्रिमंडळाच्या विस्तार आणि खातेवाटपवारून ते नाराज असल्याचेही सांगण्यात येते. मात्र, बुधवारी ते विधानसभेत दाखल झाले. तासभर बसून होते मात्र, ते एक शब्दही बोलले नाहीत. माध्यमांशी संवाद साधण्याचेही टाळले. त्यामुळे आता त्यांच्या मौन रागाचीही चर्चा रंगली आहे.
अजित पवार मंत्रिमंडळाचा विस्तार आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रामगिरीवर बोलावलेल्या पत्रकार परिषदेला ते उपस्थित होते. पत्रकार परिषदेची सुरुवात त्यांनीच केली. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि खातेवाटपही येत्या दोन दिवसात जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे अनेकजण नाराज होती याची कल्पना होती. त्यांनी ज्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही ते सर्व सक्षम नेते असल्याचे सांगितले.
मंत्रिमंडळाची संख्या कमी आहे. प्रत्येकाला स्थान देता येत नाही असे सांगून त्यांनी काळजी न करण्याचा सल्ला दिला. अधिकाधिक नेत्यांना संधी देता यावी यासाठी आपण अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र यामुळे कोणाचे फारसे समाधान झाले नसल्याचे दिसते. भुजबळ (Chhagan Bhujbal) अधिवेशन सोडून निघून गेले. त्यांनी उघडपणे दादांवर तोफ डागणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे अजित दादांनी आपल्या पाच माजी मंत्र्यांना यावेळी डच्चू दिला आहे.
भुजबळ वगळता कोणी उघडपणे बोलत नसले तरी नाराजी मात्र कोणाचीच लपून राहिली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार अधिवेशनाचे पहिले दोन दिवस सभागृहात आलेच नाहीत. त्यामुळे उलट-सुलट चर्चांमध्ये आणखीच भर पडली. ते कुठे आहेत याचा शोध घेतल्या जात होता. त्यांच्या विजयगड बंगल्यावरही ते नसल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे विधान भवन परिसरात चर्चेचा बाजार झाला होता.
अनेकांनी खातेवाटपावर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला तातडीने गेले असल्याची हूल उडवून दिली होती. आज मात्र ते विधानसभेत उपस्थित होते. नाना पटोले यांनी तुम्ही नॉट रिचेबल होता, अशी चर्चा ऐकल्याचे सांगून त्यांना बोलते करण्याच प्रयत्न केला. मात्र, दादांनी आपला मौन राग सोडला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.