

Maharashtra News: तमिळनाडू,पश्चिम बंगाल,आसाम,केरळ,पुदुच्चेरी, या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. याचदरम्यान, महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.या पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वी एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे.
बारामती आणि अहिल्यानगरच्या राहुरी या दोन मतदारसंघात पोटनिवडणुकांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान पार पडलं होतं. आता या दोन्ही पोटनिवडणुकांचा निकाल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालासोबतच येत्या 4 मे रोजी लागणार आहे.पण त्याचपूर्वी आता एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे.
एक्झिट पोलच्या प्राथमिक अंदाजानुसार,बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर महायुतीचाच विजय होणार असल्याचं समोर आलं आहे. दोन्ही ठिकाणी निवडणुका बिनविरोध करण्यासाठी महायुतीनं जोरदार प्रयत्न केले होते. पण ते निष्फळ ठरले. पण आता या दोन्ही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना मतदारांनी कौल दिला आहे. बारामतीतून सुनेत्रा पवार आणि राहुरीतून अक्षय कर्डिले मोठ्या मतधिक्यानं विजयी होणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे.
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय होण्याची शक्यता एक्झिट पोलच्या आकडेवारीत समोर येत आहे. बारामतीत सुनेत्रा पवार यांना 91 ते 97 टक्के मतदान मिळण्याची अंदाज रिंगसाईड रिसर्च या संस्थेच्या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांना 78 ते 83 टक्के मतदारांनी मतदान केल्याचं एक्झिट पोलमधून समोर आलं आहे. त्यांना निवडणुकीत 1 लाख 42 हजार 500 मतं मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच राहुरी मतदारसंघात भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्याविरोधात उभ्या राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गोविंद मोकाटेंना अवघ्या 7 ते 14 टक्क्यापर्यंत मतं पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.मोकाटेंना एक्झिट पोलच्या आकडेनुसार, सुमारे 25 हजार 500 मतं मिळण्याचा अंदाज समोर आला आहे. त्यामुळे सध्यातरी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघात महायुतीचाच विजय होणार असल्याचं आता निश्चित मानलं जात आहे.
तसेच रुद्र रिसर्च च्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार,राहुरीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांचा तब्बल 1लाखांपेक्षा अधिक मोठ्या मताधिक्यानं विजयाची शक्यता असल्याचं समोर येत आहे. तर बारामती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा 2 लाखांहून अधिक विक्रमी मताधिक्यानं विजय होण्याचा अंदाज रुद्र रिसर्चनं त्यांच्या एक्झिट पोलमधून समोर आणला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामतीत प्रचारादरम्यान मोठा दावा केला होता. अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर आजच्या या पोटनिवडणुकीला आदरणीय सुनेत्रा पवार सामोरे जात आहेत. मला विश्वास आहे, बारामतीकर प्रचंड विक्रमी मतदान करतील आणि मताधिक्याने निवडून देतील,असं म्हटलं होतं.
अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांना मतदानरुपी श्रद्धांजली अर्पण करणं हीच बारामतीकरांच्या मनात भावना आहे. येत्या चार तारखेला आपण विजय बघणार आहोत. देशात विक्रमी मताधिक्य होईल, असा विश्वासही राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तटकरेंनी व्यक्त केला होता. यापूर्वी सांगता सभेला दादा शरद पवार साहेब असायचे इतर कोणी यावं ही वेळ येत नव्हती. नियतीने ही दुर्दैवी वेळ आमच्यावर आणली असल्याचंही तटकरे यांनी भाषणात म्हटलं होतं.