

Devendra Fadnavis: राज्यात सध्या २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यापूर्वी नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या दोन्ही निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजप आणि शिवसेनेचे मोठ्या प्रमाणावर नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
महापालिकेतील बिनविरोध लढतींवर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. यामध्ये साम-दाम-दंड-भेद ही नीती वापरुन या निवडणुका बिनविरोध करण्यात आल्याचं अनेक ठिकाणी समोरही आलं आहे. त्यामुळं या बिनविरोध निवडणुकीची राज्य निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे, असं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारावर अजब तर्क दिला आहे. यासाठी त्यांनी किरीट सोमय्या यांच्या मुलाला दिलेल्या उमेदवारीचा दाखला दिला आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपचे सुमारे १०० नगरसेवक हे निकालापूर्वीच बिनविरोध निवडून आले. तसंच आता २९ महापालिकांपैकी सुमारे १० महापालिकांमध्ये भाजप-शिवसेनेचे मिळून तब्बल ६६ उमेदवार नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपचे सर्वाधिक ४३ नगरसेवक आहेत तर शिंदेंच्या शिवसेनेचे १९ नगरसेवक आहेत.
आजवर अशा प्रकारे सर्वाधिक उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. यांपैकी कल्याण डोंबिवलीत भाजपचे सर्वाधिक १४ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. तर ठाण्यात शिंदे सेनेचे ७ नगरसेवक बिनविरोध आले आहेत. पनवेलमध्ये भाजपचे ६ उमेदवार बिनविरोध आले आहेत. कल्याण-डोंबिवली, पनवेल, धुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड, भिवंडी, मालेगाव, जळगाव, अहिल्यानगर या महापालिकांमध्ये शिवसेना-भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजप-शिवसेना व्यतिरिक्त पनवेलमध्ये १ अपक्ष, मालेगावमध्ये १ अजित पवार राष्ट्रवादी, अहिल्यानगरमध्ये २ अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
दरम्यान, महापालिकांमध्ये आजवरच्या इतिहासात मोठ्या प्रमाणावर बिनविरोध नगरसेवक निवडून आल्यानं त्याची राज्य निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. अर्ज मागे घेण्यासाठी कोणाचा दबाव होता का? तसंच कुठली आमिष दाखवण्यात आली होती का? याचा तपास आयोगाकडून केला जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी याबाबतचा अहवाल आयोगाकडं सुपूर्द करणार आहेत.
एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मुंबई तर सर्वात महत्वाची आहे आमच्यासाठी. मुंबई महापालिकेसाठी आमचा एकही उमेदवार बिनविरोध का झाला नाही? याचा सरळ हिशोब असा आहे की, यांचे (ठाकरे सेना, मनसे, काँग्रेस) पक्ष कमजोर झाले आहेत. विशेषतः उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल मनसे असेल यांचं लढाईचं मैदान केवळ मुंबईच राहिलं आहे. लोक त्याच्यामुळं निराश झाले असून त्यामुळं त्यांना अनेक जागांवर उमेदवारच मिळाले नाहीत.
मला सांगा मुंबईत नील सोमय्या निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात ठाकरेंची शिवसेना, मनसे, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडं उमेदवारच नाही. या ठिकाणी तर कोणत्या उमेदवारानं आपला अर्ज मागे घेतला नाही ना! तसंच यापूर्वी असं कधीही झालेलं नव्हतं. पण त्यांच्याकडं उमेदवारचं नव्हता त्यामुळं ते उमेदवारच देऊ शकले नाहीत"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.