
Mumbai News : मुंबईतील कबुतरखान्यांच्या बंदीवरुन राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. कबुतरांची पिसे आणि विष्ठेमुळे श्वसनाचे गंभीर आजार पसरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने मुंबईतील कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाणे घालण्यास मनाई केली होती. मात्र, यानंतरही जैन समुदाय कबुतरखाने वाचवण्याचा हेका सोडायला तयार नाही. त्यामुळे कबुतरखान्यांच्या निमित्ताने मराठी एकीकरण समितीविरुद्ध जैन-गुजराती समाजात वाद रंगला आहे.
दादरमधील कबुतरखाना बंद करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. प्रशासनाने कबुतरखाना बंद करत ताडपत्रीने तो झाकला होता. मात्र, जैन समुदाय प्रचंड आक्रमक झाला. त्यांनी आंदोलन करत कबूतरखान्यावरील ताडपत्री काढून टाकली, बांबू तोडले. ताडपात्री तोडण्यासाठी तसेच दोऱ्या आणि सुतळी कापण्यासाठी हातात चाकू घेऊन महिला आल्या होत्या. मात्र, प्रशासनाने पु्न्हा हा कबुतरखाना बंद केला.
त्यामुळे आक्रमक झालेल्या जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी धर्मासाठी शस्त्र हाती घेण्याची भाषा केली, धर्मासमोर न्यायालयाला मानत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता या कबुतरखान्यांच्या निमित्ताने मराठी एकीकरण समितीविरुद्ध जैन-गुजराती समाज वाद चव्हाट्यावर आला आहे.जैन मुनी, तसेच जैन समुदायातील काही जण कबुतरखान्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यातच मराठी एकीकरण समिती मैदानात उतरली आहे. परप्रांतीयाना धडा शिकवला पाहिजे. नोकऱ्या, व्यवसाय करता ते करा, स्थानिकांच्या विरोधात, सरकारच्या विरोधात, पोलिसांच्या विरोधातील, नागरिकांच्या आरोग्याच्या विरोधातील कृत्य आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा समितीच्या वतीने दिला आहे. त्यामुळे आता बुधवारी (ता.13) दादर येथील कबूतरखाना येथे आंदोलनासाठी जमणार असल्याने वाद येत्या काळात पेटण्याची शक्यता आहे.
दादरमधील कबूतरखान्याच्या वादावरून मुंबईत तणाव वाढलेला आहे. जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. कबूतरखाना बंद करण्याच्या निर्णयाला जैन समाजाचा तीव्र विरोध आहे. जैन मुनींनी थेट सरकारला आव्हान दिले आहे. कबूतरखान्याच्या संदर्भात सरकारने अपेक्षित भूमिका न घेतल्यास कबूतरखान्यातच सामूहिक आंदोलन करण्याचा इशारा जैन मुनींनी दिला आहे. येत्या तेरा तारखेला हे आंदोलन सुरू होईल असे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे मराठी राज्यात, स्थानिकांच्या जमिनीवर स्थानिकांना घर नाकारले जाते. मराठी भाषिकांना रोजगार नाकारला जातो. खाद्य संस्कृतीवर अतिक्रमण होते. केवळ मानव नव्हे तर कुत्रे, मांजर यांचे मांसाहार खाऊ नये, अशी बळजबरी केली जाते. ही कोणती खोटी 'जीवदया' हा कोणता "धर्म"?', असा सवाल देखील मराठी एकीकरण समितीकडून करण्यात आला आहे.
कबुतर म्हणून पारव्यांना दाणे टाकण्यावरून निर्माण झालेल्या वादाला कधी धार्मिक रंग दिला जातोय तर कधी प्रांतिक अस्मितेशी त्याला जोडलं जात आहे. काहीजण राजकीय पोळी भाजून घेणाचाही प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मुंबईतील वातावरण चांगलेच तापले आहे. कबुतरखान्यांच्या निमित्ताने येत्या काळात मराठी एकीकरण समितीविरुद्ध जैन-गुजराती समाजात वाद पेटण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.