NCP News : दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेने राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी 'इंडियन एक्सप्रेस' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती याबाबत सविस्तर भाष्य केले आहे. आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीबरोबर पुन्हा एकत्र यावे असे एका गटाला वाटते. तर आम्ही भाजपाबरोबर जाऊ नये, इंडिया आघाडीत पुन्हा सामील होऊन युतीची पुनर्रचना करावी असे दुसऱ्या गटाला वाटते, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानानंतर दोन्ही गटातील नेत्यांमध्ये चलबिचल वाढली आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी सत्तेसोबत जावे असे सांगणारा आमदारांचा गट हा सोलापूर जिल्ह्यातील असल्याचे पुढे आले आहे. माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी स्वतः याबाबत माहिती दिली.पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना उत्तम जानकर म्हणाले, दोन-तीन महिन्यापासून या चर्चा सुरु होत्या. सोलापूर जिल्ह्यातील मी, अभिजीत पाटील, राजू खरे आणि नारायण पाटील हे चार आमदार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्याशी चर्चा करत होतो. आमचेच सर्वांचे मत होते की आपण एकत्र यायला पाहिजे आणि सत्तेमध्ये जायला पाहिजे.
आम्ही आमदार आणि खासदार सातत्याने भूमिका मांडत होते. एकत्र आल्यास सगळ्यांना न्याय मिळून चांगल्या पद्धतीने काम करता येईल अशी आमची भूमिका आहे. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आनंद होईल आणि ताकद देखील वाढेल. निवडणुकांमध्ये मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रखरपणे टीका केली. तरी माझा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे. त्यांच्या वागण्यामध्ये मला कोणताही बदल दिसला नाही. माझ्या आग्रहाखातर त्यांनी नीरा उजव्या कालव्याला पंधरा दिवस आधी पाणी सोडले. त्यामुळे माळशिरस भागातील पाण्याचा प्रश्न सुटला.
अजित पवार यांच्याकडे आणखी चार-पाच कामासंदर्भात मी गेलो होतो त्यावेळी ते अतिशय सकारात्मक वाटले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर चांगले होईल. मात्र अंतिम निर्णय हा शरद पवार यांचाच असेल. याबाबत थेट सुप्रिया सुळे अथवा शरद पवार यांच्याशी आमचं बोलणं झालं नाही. आम्ही आमचं मत जयंत पाटील यांच्याकडे कळवलं आणि जयंत पाटील यांनी आमच्या भावना शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवल्या. आमदारांमध्ये अस्वस्थता नाही मात्र मतदारसंघातील अनेक काम असतात, त्यासाठी सरकारची गरज भासते त्यामुळे सरकारसोबत जावं असे आमची भूमिका होती.
तसेच टोकाची टीका केल्यानंतर अजित पवार आपल्याला सामावून घेणार का याबाबत साशंकता मनात होती. मात्र दरम्यानच्या काळात ज्या भेटी झाल्या त्यामध्ये अजित पवार यांनी सकारात्मक निर्णय घेतले. मात्र सध्या परिस्थितीत शरद पवार जो निर्णय घेतील तो सर्व गोष्टींचा सारासार विचार करून घेतील आणि त्या निर्णयासोबत आम्ही असू. मात्र या भूमिकेवर आता सर्वांना बोलून शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे ह्या चर्चा करतील आणि अंतिम निर्णय होईल असंही जानकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आज ज्या राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत, त्याची सुत्रे सोलापूर जिल्ह्यातून फिरली आहेत, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.