

महायुतीत उमेदवारीवरून अंतर्गत संघर्ष उफाळून आला असून भाजपचा विरोध डावलून निर्णय घेतला गेला आहे
झिशान सिद्दीकी यांना संधी मिळाल्यानंतर राष्ट्रवादीत नाराजी वाढली आहे
ठाण्यात आनंद परांजपे नाराज असून ते शिवसेनेत प्रवेश करू शकतात अशा चर्चांना उधाण
Thane News : राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतच उमेदवारीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे भाजपचा विरोध डावलून शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीने निर्णय घेत उमेदवारी जाहीर केली आहे. यावरून राजकीय चर्चांना उत आला असतानाच आता राष्ट्रवीदीतील नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आल्यानंतर आता ठाण्यात नाराजीची ठिणगी पडली आहे. येथे राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आनंद परांजपे यांना विधान परिषदेसाठी डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
राज्यातील विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत असून सर्वाधिक जागा ६ जागा भाजपच्या वाट्याला गेल्या आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेला २ आणि राष्ट्रवादीला १ जागा आली आहे. सध्या राष्ट्रवादीच्या एका जागेवर झिशान सिद्दीकी यांच्या नावाची घोषणा झाली आहे. या एका जागेसाठी दिग्गजांसह जवळपास 75 जण इच्छुक होते. यामुळेच पहिल्यांदाच मोठी रस्सीखेच दिसून येत होती. तर या झिशान सिद्दीकी यांच्या निवडीमागे प्रफुल्ल पटेलांचा हात असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान विधान परिषदेवर पुन्हा संधी न मिळाल्याने राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी आपली खंत बोलून दाखवली. त्यांनी पक्ष प्रमुखांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आहे. परंतु, ज्या जागेवर ही नियुक्ती झाली, ती जागा त्यांची स्वतःची होती. त्यामुळे विश्वासात घ्यायला हवं होतं. पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाने किमान एक फोन करून किंवा चर्चेला बोलावून या निर्णयाची कल्पना द्यायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच निर्णयामुळे त्यांना प्रचंड वेदना झाल्याचेही मिटकरी यांनी सांगितले.
या नाराजीची राज्यभर जोरदार चर्चा सुरू असतानाच आता ठाणे जिल्ह्यातील पक्षाचे नेते, आणि प्रवक्ते आनंद परांजपे यांची नाराजी समोर आली आहे. विधान परिषद उमेदवारीसाठी त्यांचेही नाव चर्चेत होते. पण आता त्यांच्या नावावर फुली पडली असून ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच पक्षाने डावलल्याने ते पमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. तर लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील असे बोलले जात आहे.
दरम्यान, परांजपे यांनी मात्र असे काहीच नसल्याचे सांगत या अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी, या केवळ अफवा असून विधान परिषद उमेदवारी डावल्याने मी शिंदे सेनेत जाणार अशा अफवा आहेत. मी कुठेही जाणार नसून पक्षातच राहणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीचे नेते आहेत. त्यांची विविध कामानिमित्ताने भेट होत असते. त्यामुळे त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची अफवा आहे, अशी प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी दिली.
1. महायुतीत वाद का निर्माण झाला आहे
उमेदवारी वाटपात एकमत न झाल्यामुळे आणि काही नेत्यांना डावलल्यामुळे वाद निर्माण झाला आहे
2. झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी का चर्चेत आहे
त्यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादीतील इतर नेत्यांमध्ये नाराजी वाढली आहे
3. आनंद परांजपे का नाराज आहेत
त्यांना विधान परिषदेसाठी संधी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचे सांगितले जाते
4. परांजपे शिवसेनेत जाणार का
सध्या ते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत पण अधिकृत घोषणा झालेली नाही
5. याचा महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो
अंतर्गत मतभेद वाढल्यास महायुतीची एकजूट कमकुवत होण्याची शक्यता आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.