
महायुतीकडून सन्मानजनक युती न झाल्यास शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवेल, असा इशारा सामंत आणि कदम यांनी दिला.
कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही तर एकतर्फी विजय मिळवण्याची आमच्यात ताकद आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
महायुतीत अंतर्गत तणाव स्पष्ट होत असून, स्वबळाची रणनीती पुन्हा चर्चेत आली आहे.
Chiplun News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या या महायुती म्हणूनच लढायच्या आहेत, असे आधीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्याप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील तशी घोषणा केली आहे. पण तळ कोकणात तिन्ही पक्षांची तोंडे विरूद्ध दिशेला पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात देखील शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले असून भाजप स्वबळाच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमिवर शिवसेना उपनेते व पालकमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी, 'महायुतीत कार्यकर्त्यांना न्याय न मिळाल्यास आमचा मार्ग वेगळा!' असेल असा भाजपला इशारा दिला आहे. यामुळे सध्या कोकणात राजकीय खळबळ उडाली आहे. चिपळुणमधील अतिथी सभागृहात रत्नागिरी जिल्हा शिवसेना कार्यकारिणीची बैठक झाली. या वेळी दोन्ही नेत्यांनी ही घोषणा केली. (Shiv Sena solo plan for Maharashtra local body elections 2025 due to alliance tensions in Mahayuti)
यावेळी महायुतीच्यावतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या आहेत. महायुतीचा निर्णय नेते व शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे घेतील; मात्र जिल्ह्यात सन्मानजनक युती झाली नाही तर सन्मान कसा मिळवायचा, हे आपल्याला ठाऊक आहे. कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नसेल तर प्रसंगी आमचीही स्वबळाची तयारी आहे. एकतर्फी निवडणूक जिंकण्याची आमची ताकद आहे. स्वबळावरदेखील निवडणूक लढवून त्या जिंकू असा दावा उदय सामंत आणि योगेश कदम यांनी केला आहे.
या वेळी पालकमंत्री सामंत म्हणाले, पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या माध्यमातून आगामी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात आपण भाजप पदाधिकारी, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्याशी बैठक केली आहे. आजची जिल्हा कार्यकारिणी सदस्य नोंदणीसाठी होती. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक तालुक्यात किमान 50 हजार सदस्य नोंदणी झाली पाहिजे. जिल्ह्यात रत्नागिरी आणि दापोली मतदार संघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र गुहागरमध्ये अत्यल्प सदस्य नोंदणी झालेली आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसात चिपळूण-गुहागरमध्ये देखील सदस्य नोंदणी वाढवावी, असे आदेश सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
यावेळी योगेश कदम म्हणाले, तळकोकणातून येऊन जर कोणी स्वबळाची भाषा करत असेल तर आमचीही स्वबळाची तयारी आहे. एकतर्फी जिंकण्याची देखील आमची तयारी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदेश देतील तो येथे पाळला जाईल. पण कोणी आमच्या कार्यकर्त्यांना लक्ष करणार असेल तर ते होऊ देणार नाही.
आता आपण गुहागर आणि चिपळूण मतदारसंघात लक्ष घालणार आहोत. चिपळूण आणि गुहागरमध्येदेखील आपले आमदार असायला हवेत. तिन्ही मतदारसंघात जास्तीत जास्त सभासद नोंदणी होईल. आपल्यावर झालेल्या आरोपावर बोलताना ते म्हणाले, अनेक शिवसैनिकांचे आपल्याला फोन आले व आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.
या वेळी शिवसेना सचिव किरण पावसकर म्हणाले, आता शिवसेना पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका निवडणुकीद्वारे होणार आहेत. सदस्यांचे मतदान घेऊन पदाधिकारी निवडण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा. जिल्ह्यात उद्योगमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यात मैत्रीपूर्ण स्पर्धा सुरू असल्याचे सांगितले.
1. महायुतीत सध्या कोणते तणाव आहेत?
महायुतीमध्ये सन्मानजनक युती न होणे आणि कार्यकर्त्यांना न्याय न मिळणे हे प्रमुख तणावाचे मुद्दे आहेत.
2. शिवसेनेचे नेते स्वबळाचा इशारा का देत आहेत?
शिवसेनेच्या मते, कार्यकर्त्यांना न्याय न मिळाल्यास आणि युतीत सन्मान न मिळाल्यास, पक्ष एकट्यानेही निवडणूक जिंकण्याची ताकद ठेवतो.
3. स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय कोण घेईल?
शिवसेनेचे अध्यक्ष आणि महायुतीचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर अंतिम निर्णयाची जबाबदारी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.