

सिंधुदुर्गमध्ये मतदानापूर्वी आणि दिवशी शिंदे शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संघर्ष झाला.
विशाल परब यांच्या चालकाल मारहाण, तसेच पोलिस ठाण्यात दोन्ही गट भिडल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली.
रुपेश राऊत यांनी या सर्व तणावाला आमदार दीपक केसरकर जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Sindhudurg News : सिंधुदुर्गमध्ये पालिकेच्या मतदानाच्या आधीपासून तापलेले राजकीय वातावरणाचे मतदानाच्या शेवटच्या रात्री राड्यात बदलले. येथे पोलिस ठाण्यातच भिडणाऱ्या भाजप-शिंदेंच्या शिवसेनेच्या 100 हून कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर आता येथील राजकीय वातावरण तंग झाले असून शांत असणाऱ्या तळकोकणात राडा संस्कृती राणेंनी आणली. तर या संस्कृतीला मिठी मारण्याचे काम शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी केले. त्यांच्या या स्वार्थीवृत्तीमुळेच येथे राडा झाल्याचा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रचार प्रमुख रुपेश राऊत यांनी केला आहे. तसेच त्यांनी फक्त भाजपनेच पैसे वाटले नाहीत तर शिंदेंच्या शिवसेनेनं देखील पैसे वाटले असून आपल्याकडे त्याचे पुरावे असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे आता येथे खळबळ उडाली आहे.
कोकणासह राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींचे मतदान प्रतिक्रिया पार पडली. पण यावेळी रायगडसह तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार राडा झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदानाच्या आधीच पैसे वाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपला टार्गेट करण्यात आले होते. तर आदल्या दिवशीच पुन्हा पैसे सापडल्या दावा करत आमदार निलेश राणे यांनी गंभीर आरोप केले होते.
त्यानंतर ऐन मतदानाच्या दिवशी देखील प्रभाग क्रमांक नऊमधील बूथवर गाडी अंगावर घातल्याच्या कारणावरून शिंदे शिवसेनेने भाजप युवा नेते विशाल परब यांची गाडी अडवत चालकाला मारहाण केली होती. ज्याचे पडसाद रात्री थेट पोलिस ठाण्यात उमटले. येथे परस्पराविरोधात तक्रार देण्यासाठी गेलेले भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि एकमेकांना भिडले. त्यामुळे पोलिस ठाण्याचे वातावरण तंग बनले होते. यानंतर पोलिसांनी 100 हून अधिक जणांवर आता गुन्हे दाखल केले आहेत.
यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राऊत यांनी, सावंतवाडी शहराने राडा संस्कृतीला कधीच थारा दिला नाही. पण आता ही उघड उघड समोर आली असून याला सर्वस्वी जबाबदार इथले स्थानिक आमदार दीपक केसरकर आहेत, असा दावा केला आहे. या दाव्यानंतर आता तळकोकणातील सावंतवाडीसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
राऊत म्हणाले की, केसरकर यांनी यापूर्वी जनतेसमोर शांततेचा संदेश दिला आणि लोकांनीही त्यांना मोठा पाठिंबा दिला. परंतु नंतर ते स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी राणे आणि भाजपसोबत गेले. यामुळेच आज सावंतवाडीत संघर्ष निर्माण झाल्याचे दिसत आहे. पूर्वी केसरकर यांनी राणेंच्या विरोधात आंदोलने केली. मोर्चे काढून स्वतःची राजकीय कारकीर्द उंचावली. पण आज तेच राणेंना मिठी मारतातय. हेच स्पष्ट दाखवते की त्यांना जनता नाही तर केवळ स्वतःचा स्वार्थ महत्त्वाचा आहे. सावंतवाडीत भाजपचे मूळ कार्यकर्ते नाहीत; दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे राणे समर्थकच आहेत. त्यामुळे राणे समर्थकांची राडा संस्कृती येथे दिसून आल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.
तसेच राऊत यांनी, सावंतवाडीची जनता सुशिक्षित आणि सुज्ञ आहे. अशा अस्थिरतेला, अशा प्रवृत्तीला ती कधीही बळी पडणार नाही. ही जनता राणे संस्कृतीच्या राडा संस्कृतीला ठेचून काढेल, अशी खात्री असल्याचाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
तर भाजपचे युवा नेते विशाल परब आणि केसरकर यांच्यातील वादाबाबत बोलताना राऊत म्हणाले, दोन्ही नेते राणेंचेच कार्यकर्ते आहेत. आज ते भिडले असले तरी हे राजकारण म्हणजे फक्त नौटंकी आहे. उद्या स्वार्थासाठी ते पुन्हा एकमेकांना मिठी मारतील. तर या पार पडलेल्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात पैसा वाटप झाला आहे.
एकीकडे भाजपच्या थैल्या आमदार निलेश राणेंनी पकडून दिल्या. मात्र त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला. पण याच आमदार राणेंच्या शिवसेनेनं देखील मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला असून आमच्याकडे पैसे वाटपाचे पुरावे आहेत, असा दावा केला आहे. आमचे उमेदवार प्रामाणिक, जनतेची सेवा करणारे आणि सत्यनिष्ठ असून यावेळी विजय हा निश्चितच जनशक्तीचा असेल, धनशक्तीचा नाही. येथील जनता खऱ्या अर्थाने जागरूक असून निवडणुकीचा निकाल 21 तारखेला लागल्यानंतरच हे समोर येईल असेही राऊत यांनी म्हटले आहे.
FAQs (Marathi)
1. सिंधुदुर्गमध्ये नेमका वाद कशामुळे झाला?
मतदानाच्या आधी पैसे वाटपाचा आरोप आणि मतदानाच्या दिवशी गाडी अंगावर घालण्याच्या घटनेमुळे वाद उद्भवला.
2. कोणत्या नेत्याच्या चालकाला मारहाण करण्यात आली?
भाजप युवा नेते विशाल परब यांच्या चालकाला मारहाण करण्यात आली.
3. पोलिस ठाण्यात गोंधळ का झाला?
दोन्ही गट तक्रार देण्यासाठी गेले असताना तेथील कार्यकर्ते आमनेसामने येऊन भिडले.
4. किती जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत?
100 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
5. रुपेश राऊत यांनी कोणावर आरोप केले?
रुपेश राऊत यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या कृतीमुळे संघर्ष निर्माण झाल्याचा आरोप केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.