

जिल्हा परिषदेच्या चारही विषय समिती सभापतींची निवड बिनविरोध झाली.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिंदे शिवसेना नेत्यांना पदे देण्यात आली.
धक्कातंत्रामुळे अनेक इच्छुकांना संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
Sindhudurg News : जिल्हा परिषदेच्या चारही विषय समिती सभापतींच्या निवडी आज बिनविरोध झाल्या. भाजपचे प्रीतेश राऊळ (शिक्षण व आरोग्य) आणि सुलोचना नारकर (महिला व बालकल्याण) तर शिंदे शिवसेनेचे संतोष साटविलकर (वित्त व बांधकाम) आणि रुहिता तांबे (समाजकल्याण) यांना सभापतिपदाची संधी देण्यात आली. या निवडीत जुन्या-नव्या सदस्यांचा संगम साधण्यात आला असून त्यासाठी महायुतीतील पक्षांच्या पक्षश्रेष्ठींनी धक्कातंत्र वापरले. यामुळे अनेक इच्छुकांना धक्का बसला आहे.
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) तथा पीठासन अधिकारी शारदा पोवार यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया झाली. सकाळी १०.४५ वाजता भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजपकडून रेडी (ता. वेंगुर्ले) चे प्रीतेश राऊळ आणि पोंभुर्ले (ता. देवगड) च्या सुलोचना नारकर यांची नावे जाहीर केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि गटनेते संजय बोबडी उपस्थित होते. शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे यांनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेकडून पेंडूरचे (ता. मालवण) संतोष साटविलकर आणि जानवलीच्या रुहिता तांबे (ता. कणकवली) यांची नावे जाहीर केली.
दुपारी तीनला विशेष सभेत केवळ चारच अर्ज आल्याने पीठासन अधिकाऱ्यांनी निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले. या निवडीत महायुतीच्या वरिष्ठांनी धक्कातंत्र वापरल्याचे दिसून आले. सुकळवाडच्या सुमेधा पाताडे यांना संधी मिळण्याची शक्यता असताना, अनपेक्षितपणे संतोष साटविलकर यांना संधी देऊन मालवण तालुक्याचा अनुशेष भरून काढण्यात आला. सुलोचना नारकर आणि रुहिता तांबे यांच्या निवडीमुळे अनेक इच्छुकांना धक्का बसला आहे.
या आधी २०१७-२२ या काळात मी हे पद भूषविले होते. पुन्हा एकदा महायुतीने माझ्यावर विश्वास टाकला आहे. बिनविरोध निवडीचा आदर्श कौतुकास्पद आहे.
- संतोष साटविलकर, वित्त व बांधकाम सभापती
जिल्ह्यातील शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी माझे प्राधान्य राहील. वरिष्ठांनी दिलेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न असेल.
- प्रीतेश राऊळ, शिक्षण व आरोग्य
सभापती बिनविरोध निवड झाली. आता सर्वांच्या सहकार्याने ही मोठी जबाबदारी पार पाडेन.
- रुहिता तांबे, समाजकल्याण सभापती
नवखी सदस्य असूनही माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करेन.
- सुलोचना नारकर
महिला व बालकल्याण सभापती नूतन पदाधिकाऱ्यांच्या सूचनांची प्रशासकीय तपासणी करून अंमलबजावणी करू. जिल्ह्याला आदर्श बनविण्यासाठी २४ तास काम करूया.
- रवींद्र खेबुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी
1. सभापती निवडणुका बिनविरोध का झाल्या?
पक्षांतर्गत समन्वय आणि नेतृत्वाच्या निर्णयामुळे निवडणुका बिनविरोध पार पडल्या.
2. या निवडीत कोणत्या नेत्यांना संधी मिळाली?
भाजपचे प्रीतेश राऊळ आणि सुलोचना नारकर तसेच शिंदे शिवसेनेचे संतोष साटविलकर आणि रुहिता तांबे यांना संधी मिळाली.
3. धक्कातंत्र म्हणजे काय?
अचानक आणि अनपेक्षित निर्णय घेऊन इच्छुकांना बाजूला ठेवणे याला धक्कातंत्र म्हणतात.
4. या निर्णयामागे कोणाचे नेतृत्व होते?
पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला.
5. याचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होईल?
यामुळे पक्ष संघटना मजबूत होऊ शकते, पण इच्छुकांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.