
दीपा कदम -
घराला वाळवी लागली, की त्याचे समूळ उच्चाटन करावे लागते. शिवसेनेत तीन वर्षांपूर्वी उभी फूट पडली. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षउभारणीसाठी सखोल स्वच्छतेची गरज होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ठाकरे यांच्या पक्षाच्या हातात असलेले सुभे निघून जाऊ लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत जागा किती निवडून आल्या. यापेक्षाही आपल्या मागे किती कार्यकर्ते शिल्लक आहेत, हे मोजण्याची वेळ ठाकरेंंच्या शिवसेनेवर आली तर आश्चर्य वाटू नये.
येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबई महापालिका राखण्यासाठी आकाशपाताळ एक करावे लागणार आहे. त्यापूर्वी भाजप आणि शिवसेना (शिंदे) पुन्हा एकदा ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असण्याची दाट शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी कोकणातून उरलीसुरली शिवसेना (Shivsena) संपवण्याची चाल भाजप आणि शिवसेना (शिंदे) खेळू शकतात, तसे त्यांचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीत गुहागरची भास्कर जाधवांची जागा वगळता सर्व जागांवर ठाकरे यांचा पक्ष पराभूत झाला आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी, कणकवलीचे माजी आमदार वैभव नाईक यांचा पराभव झाला आहे. निकालानंतर सर्व राज्यात ईव्हीएमवर वगैरे खापर फोडण्यात आले.
कोकणामध्ये मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनाच पराभवासाठी जबाबदार धरले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीच विरोधकांना खतपाणी घालण्यासाठी कशी मदत पुरवली याचे किस्सेच राजन साळवींनी ठाकरेंना सांगितले. आता हे ‘वरिष्ठ नेते’ कोण हे आता अजिबातच गोपनीय राहिलेले नाही.
माजी खासदार आणि नेते विनायक राऊत यांनीच पक्षविरोधी कारवाया केल्याचा गंभीर आरोप राजन साळवींनी केला आहे. रत्नागिरी मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष विलास चाळके जे विनायक राऊतांचे अत्यंत जवळचे मानले जातात. त्यांच्या गावातच राजन साळवी यांना कमी मते मिळाली. ती कशी? याचे उत्तर राजन साळवींना सापडल्याने त्यांची चलबिचल सुरु झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षाच्या गावातच त्यांच्या उमेदवाराला मते मिळत नसतील तर ते पक्षासाठी अत्यंत मानहानीकारक आहे.
शिवसेनेसारख्या पक्षासाठी तर अधिकच, कारण त्यांचे स्थानिक पातळीवरचे नेते त्यांचे बूथ, गाव मजबूत राखून असतात, अशी एक समजूत होती. त्याला तडा गेला आहे. साळवींनी पराभवानंतर त्यांच्या मतदारसंघात बैठका घेतल्या आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून प्रचाराच्या काळात काय घडले हे जाणून घेतले.
त्यानंतर त्यांची खात्री पटली की, त्यांचा पराभव हा ईव्हीएम, लाडकी बहीण किंवा ‘व्होट जिहाद’ने केलेला नाही. त्यांचा पराभव हा शिवसेना ठाकरे गटातीलच नेते, शिवसैनिकांनी केला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत केला आहे. राजापूर मतदारसंघ ही एक ‘लिटमस्ट टेस्ट’ म्हणून आपण समजूया. पक्षाला किती खोलवर ‘वाळवी’ लागली आहे याची यावरुन कल्पना येते.
शिवसेना सोडून अनेकजण उघडपणे बाहेर पडले आहेत तर त्यापेक्षाही अनेकजण पक्षात राहून पक्षविरोधी काम करतायत का, याची चिकित्साही करण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे. ठाकरेंच्या हातून कोकण पुरता निसटण्याची अजून काही कारणे आहेत त्यापैकी एक म्हणजे ‘सभा घेणे म्हणजे पक्ष बांधणे नव्हे’ अशीही भावना कोकणातील शिवसैनिक व्यक्त करु लागले आहेत.
कोकणात राणे, सामंत या सारख्या आर्थिकदृष्ट्या गब्बर असणाऱ्यांच्या समोर कोकणातले पोहे खाऊन आव्हान देता येणार आहे का? निवडणुकीच्या पूर्वी ठाकरे पितापुत्रांनी कोकणात उभ्या राहिलेल्या आव्हानाला परतवून लावण्यासाठी शिवसैनिकांना विश्वासात घेवून त्यांना रसद पुरवली असती तर जागा टिकवता आल्या असत्या. शिवसैनिकांना विश्वास वाटला असता.
यापुढच्या काळात तरी निदान युवानेते आमदार आदित्य ठाकरे यांनी कोकणात ठाण मांडून बसले तर तिथं पुन्हा ठाकरेंची शिवसेना उभी राहण्यास मदत होईल. सिंधुदुर्गात नारायण राणे स्वत: खासदार आहेत आणि आता त्यांची दोन्ही मुले आमदार त्यापैकी एक मंत्री आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत उद्योगमंत्री आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंतही आमदार आहेत.
एवढा कडेकोट बंदोबस्त सत्ताधाऱ्यांनी कोकणात लावल्यानंतर देखील कोकणी माणसांनी ठाकरेंवरच्या निष्ठेपोटी जीव पणाला लावावा का? तर त्यालाही कोकणी माणूस तयार होईल. पण त्यासाठी ठाकरेंना कोकणात शिल्लक राहिलेल्या शिवसैनिकासोबत रस्त्यावर उतरुन आव्हानाला तोंड द्यावे लागेल. कारण आता उंटावरुन शेळ्या हाकण्याचे दिवस आणि वेळही गेलेली आहे. पक्षबांधणीसाठी प्रत्यक्षात रस्त्यावर उतरले तरच कोकण हा ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला पुन्हा होईल. नाहीतर कोकणापाठोपाठ मुंबईवरही पाणी सोडावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.