
महाराष्ट्रातील महायुती सरकार स्थापनेसाठी दिल्लीत जोरदार हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर, दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक सुरू आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाची घोषणा आणि खातेवाटपाचा निर्णय अपेक्षित आहे. महायुतीसह महाराष्ट्राची पुढील राजकीय दिशा ठरवणारी या बैठकीकडे पाहिले जात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या अगोदर एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. एकीकडे फडणवीस-अजितदादा यांच्यात बैठक सुरू असतानाच दुसरीकडे शाहांंच्या निवासस्थानी निवासस्थानी जे पी नड्डा, अमित शाह यांच्या उपस्थितीत शिंदेंची बैठक सुरू आहे.
राज्यात महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळाल्यानंतरही सहा दिवस उलटूनही अद्याप सत्तास्थापनेचा मुहूर्त ठरलेला नाही.तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा चेहराही निश्चित करण्यात आलेला नाही.त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. पण आता महायुतीच्या प्रमुख नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दिल्लीत गुरुवारी (ता.28) रात्री उशिरा बैठक होत आहे.
माहिमचे आमदार महेश सावंत यांना छातीत दुखू लागल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज (गुरुवारी) लिलावती रुग्णालयात महेश सावंत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या महेश सावंत यांची तब्येत स्थिर असून दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाहीत, असे शिंदेंचे विश्वासू नेते संजय शिरसाट यांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात असतील पण मुख्यमंत्रिपदावरून उपमुख्यमंत्रिपद ते स्वीकारणार नाहीत. ते हे पद दुसऱ्या नेत्याकडे देतील, असे देखील शिरसाट म्हणाले.
काँग्रेस पक्षाच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीत आज (गुरुवारी) पराभूत उमेदवार यांनी नाना पटोले यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. विदर्भातील काँग्रेस पराभूत उमेदवार यांनी नाना पटोले हे आमच्या पराभवाला कारणीभूत आहे, अशी भूमिका या बैठकीत इतर काँग्रेस नेत्यांसमोर मांडली.नागपूर मधे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते फिरले नाही आणि अतिआत्मविश्वासात नेते गेल्यामुळे अशी पक्षाची परिस्थिती निर्माण झाल्याची खंत पराभूत उमेदवार यांनी मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय दर्जा होता. मात्र, तो दर्जा गेला आहे. तो दर्जा पुन्हा मिळवू, असे अजित पवार म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन डिसेंबरनंतर घेऊ, असे देखील अजित पवार यांनी जाहीर केले.
6 महिन्यात पाणी न आणल्यास राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचं मोठं वक्तव्य शिवसेनेचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे. ते म्हणाले, येत्या सहा महिन्यांत सांगोल्याच्या दुष्काळी भागात शेतीसाठी पाणी न आणल्यास मी राजकारणातून निवृत्ती घेईन. शेवटच्या श्वासापर्यंत सांगोला तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत राहणार आहे. निवडणुकीत पडलो असलो तरी एका वर्षाच्या आत सांगोल्याच्या 14 गावतील शेतात पाणी आणले नाही तर राजकीय निवृत्ती घेईन."
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. बाबा आढाव यांनी आजपासून आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे. ईव्हीएमच्या विरोधात पुण्यातील फुले वाड्यात त्यांनी हे आंदोलन सुरू आहे. आंदोलन स्थळी जाताना भुजबळांनी आढाव यांची भेट घेतली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणी आणि मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता पाळली नसल्याचा आरोप केला आहे. अचानक मतदानाची टक्केवारी कशी वाढली हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करावं अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. शिवाय मतदानाच्या टक्केवारीत तफावत असून या विरोधात आम्ही कोर्टात जाणार असल्याचंही पटोले म्हणाले. जवळपास 76 लाख मतांची वाढ झाली आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत कोणत्या मतदान केंद्रावर मतदान सुरू होतं याबाबतचे व्हिडिओ आम्हाला मिळाले पाहिजेत, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडले पाहिजे असं म्हणालो नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, "मी काल शिवसैनिकांची ताकत निर्माण केली पाहिजे अशी भूमिका मांडली. स्वराज्य संस्था निवडणुकीत कामाला लागले पाहिजे असंही म्हटलं. मात्र. महाविकास आघाडीतून बाहेर पडले पाहिजे असे मी म्हणालो नाही."
विधानसभा निवडणुकीत मनसेच्या वाट्याला अपयश आलं आहे. राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडून आला नाही. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी देखील ईव्हीएम वर संशय व्यक्त केला आहे. शिवाय ईव्हीएम संदर्भातील पुरावे गोळा करा असा आदेश त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिला आहे. तसंच या पुढील सर्व निवडणुका मनसे जोमाने लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मनाचा मोठेपणा आहे की ते बाजूला झाले आहेत. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे. तो नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घ्यावा त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल असं शिंदेंनी म्हटलं तो त्यांचा मनाच्या मोठेपणा आहे. मात्र, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला नेत्याला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. पण मुख्यमंत्री होणं देखील नशिबात असावं लागतं, असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार विजय बापू शिवतारे यांनी अजितदादांना मुख्यमंत्रिपदावरून डिवचलं आहे.
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांचा विजय झाला होता. त्यांनी आज संसदेत मराठीतून खासदारकीची शपथ घेतली आहे. वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेडमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली होती. काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर हा फोन करणाऱ्या महिलेने PM मोदींना मारण्याचा प्लॅन झाल्याचा दावा केला आहे. दरम्यान धमकीच्या या फोन प्रकरणी शितल चव्हाण नावाच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस उमेदवार प्रियांका गांधी यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली आहे. हातात संविधान घेत त्यांनी ही शपथ घेतली. यावेळी राहुल गांधी आणि सोनिया गांधीही संसदेत दाखल झाल्या होत्या. वायनाडमधून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच प्रियांका गांधी संसदेत आल्या होत्या.
मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाने आपल्या पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली आहे. मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या सुचनेनंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पराभवाचे मंथन केले जाणार आहे.
शिवसेना स्वतःला समजणाऱ्यांनी पक्षाचे निर्णय दिल्लीतील नेत्यांना दिले असतील तर तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचे आधिकार नाहीत, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. तसंच भाजपला बहुमत मिळूनही मुख्यमंत्री होत नाही यावरून त्यांनी भाजपलाही डिवचलं आहे. तसंच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर त्यांचे स्वागतच करू कारण मुख्यमंत्री हे राज्याचे असतात ते एखाद्या पक्षाचे नसतात, असं राऊत म्हणाले.
राज्यातील निकालानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना धक्का बसला आहे. मात्र, आम्ही मविआतून बाजूला जाणार नाही. बाहेर पडण्याची फक्त कार्यकर्त्यांची भूमिकाअसल्याचं स्पष्टीकरण शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून इतर पक्षात गेलेल्या बंडखोरांच्या घरवापसीला आता पक्षातून तीव्र विरोध होत आहे. या बंडखोरांबाबत पक्षश्रेष्ठी वरिष्ठांना अहवाल देणार आहेत. त्यामुळे पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना आता भाजप चांगलाच धडा शिकवण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णयाबाबत 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. प्रलंबित याचिकांवर सुनावणी घेण्याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर अखेर सुप्रीम कोर्टाकडून तारीख देण्यात आली आहे.
महायुतीच्या नेत्यांची आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्याशी मंत्रिपदावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार आणि कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार? यासह मुख्यमंत्रिपदाची माळ कोणच्या गळ्यात पडणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. अशातच आता मोठी घडामोड समोर आली आहे. युतीतील तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीत अमित शहांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे. तर या भेटीत महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.