
Mumbai News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात कला केंद्रांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे एकापाठोपाठ एक तीन-चार अशा कलाकेंद्राशी संबंधित घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांनी मोठी खळबळ उडाली आहे. या घटनांमुळे पोलिसांचेही धाबे दणाणले आहे. यातच आता कला केंद्राबाबत राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सोमवारी (ता.23) कला केंद्रांबाबत मोठे निर्देश दिले आहेत. त्यांनी तमाशा कलावंत संघटनेच्या लोकनाट्य-तमाशा हे नाव संगीतबारी कला केंद्रासाठी न वापरण्याचे बंधनाबाबतच्या मागणीचा प्रस्ताव यापूर्वी स्थापन झालेल्या समितीकडे देण्याचे आदेश दिले आहेत.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी यावेळी पुढील 15 दिवसांत तमाशा कलावंत समितीने कलाकेंद्र व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याबाबत निर्णय द्यावा, असे निर्देशही दिले आहेत.
ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगल बनसोडे यांनी तमाशा कलावंतांना बदनाम करू नका असे आवाहन करत कला केंद्र (Kala Kendra) आणि तमाशा यामध्ये खूप फरक असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर तमाशा कलावंताच्या विविध प्रश्नासंदर्भात शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभिषण चवरे, गृह विभागाचे उपसचिव अ.नि.साखरकर, अखिल भारतीय लोक कलावंत मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव, सल्लागार खंडुराज गायकवाड, रघुवीर खेडकर आदी उपस्थित होते.
बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी गेल्या आठवड्यात कला केंद्रातील नर्तकीच्या घराबाहेर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. बर्गे यांच्या हत्येनंतर धाराशिवमध्ये लोकनाट्य कला केंद्राविरोधात महिला सामाजिक कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. लोकनाट्य कला केंद्र बंद करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा प्रशासनाला त्यांनी इशारा दिला आहे.
माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी संबंधित कला केंद्रातील नर्तकीला सोन्याचे दागिने, प्लॉट, सोन्याची नाणी, मोटारसायकल, आयफोन, डिझाइनर साड्या, शेतजमीन दिली. घरही बांधून दिले होते. बर्गे यांचा गेवराईतील बंगला मिळवण्यासाठी ती बर्गे यांच्यावर दबाब टाकत होती आणि त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली, असे सांगण्यात येते.
पुण्याच्या दौंड तालुक्यातील वाखरी येथील न्यू अंबिका या कला केंद्रात जुलै महिन्यात गोळीबाराची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच बीडच्या गेवराई तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने नर्तिकेच्या प्रेमाच्या नादात आत्महत्या केल्याचा एक धक्कादायक प्रकार घडल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली होती. यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात कलाकेंद्रात झालेल्या गोळीबारानं मोठी खळबळ उडाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.