

Mumbai News : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचा एकच दिवस शिल्लक राहिला आहे. मतदानासाठी शेवटचे 72 तास शिल्लक असताना प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. रविवारी मुंबईतील शिवतीर्थावर झालेल्या प्रचारसभेवेळी ठाकरे बंधूंनी राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. त्याचवेळी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विमानतळाची जागा हडपण्याची प्रकार केला जात असल्याची जिव्हारी लागणारी टीका केली. या टीकेनंतर सीएम देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत आणखी एका नवीन विमानतळाची घोषणा केली आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
Mumbai News : राज्यात होत असलेल्या 29 महापालिका निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आरोप-प्रत्यारोपामुळे एकीकडे वातावरण ढवळून निघाले आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरुन ठाकरे बंधूंनी जाहीर सभेत केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. राज ठाकरेंनी मुंबईतील विमानतळाची जागा हडपण्याचा डाव असल्याचे सांगितले. एकीकडे राज ठाकरेंनी मुंबई विमानतळाची जागा ताब्यात घेण्यासाठी भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केला असता, दुसरीकडे नवी मुंबईतील प्रचार सभेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली. देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत तिसरे विमानतळ वाढवण बंदराजवळ उभारले जाईल, असे सांगितले.
यावेळी सीएम फडणवीस (Devendra fadnavis) यांनी मुंबईतील पहिले विमानतळ राहणार आहे, नवी मुंबईचं राहणार आहे आणि मुंबईला तिसरे विमानतळ उभारणार असून मुंबई, नवी मुंबईनंतर आता वाढवण बंदराजवळ तिसरे विमानतळ उभारणार असल्याची घोषणाच त्यांनी केली.
दरम्यान, नव्याने होत असलेले हे मुंबईतील तिसरे विमानतळ पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या अगदी जवळच प्रस्तावित आहे. वाढवण बंदरामध्ये अदानी समूहाची मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळेच हे तिसरे विमानतळ त्या बंदराच्या जवळच होत आहे. त्यामुळे त्याची चर्चा रंगली आहे.
राज्य सरकार विरार आणि पालघर या दोन्ही ठिकाणांचा सखोल अभ्यास करणार आहे. कोणती जागा अधिक सोयीची, वाहतुकीसाठी उपयुक्त आणि दीर्घकालीन विकासासाठी फायदेशीर ठरेल यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचे मत विचारात घेतले जात आहे, असेही फडणवीसांनी सांगितले.
पनवेलमध्ये मोठी वाहतूक कोंडी असून दिल्ली-वडोदरा हायवेमुळे नवी मुंबई अन् पनवेलमधील वाहतूक कोंडी सुटेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. येथील कळंबोली जंक्शन सुधारणार आहे, आपण तुर्भे टनल करतोय, विमानतळ कनेक्टिविटीसाठी दोन वेगळे मार्ग उभारणार आहोत. तसेच, कल्याण-डोंबिवली शहरही भविष्यात मेट्रोने जोडणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
पाठपुरावा केल्याने लवकर प्रोजेक्ट मार्गी लागला
1990 साली नवी मुंबई विमानतळ होणार असल्याची घोषणा झाली होती. पण, प्रत्यक्षात अत्यंत संथ गतीने काम चालू होते. भाजप (BJP) सरकार केंद्रात, राज्यात आल्यावर लगेच सर्व परवानग्या घेऊन विमानतळाच्या कामाला सुरवात झाली. अनेक अडचणी होत्या, परवानग्या असंख्य होत्या. वॅार रुममध्ये हे काम हाती घेतले. प्रचंड पाठपुरावा केल्याने लवकर प्रोजेक्ट मार्गी लागले, असेही सीएम फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.