

Mumbai News : मराठवाड्यातील आठही जिल्हयात सप्टेंबर महिना उजडला तरी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. विशेषता धाराशिव, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्याकडे गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यातच पावसाळा सुरु होऊन तीन महिने झाले तरी जोरात पाऊस बरसला नाही. त्यामुळे कोरडया दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. त्यासोबतच पावसाची अनियमितता असताना राज्य सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. येत्या काळात दुष्काळाचे संकट समोर उभे असताना अशा स्थितीत सरकारने जनतेच्या दाराशी जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना हे तीन जिल्हे मंत्र्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत असून या मागास तीन जिल्ह्यांमध्ये मंत्र्यांच्या दौऱ्यांचे प्रमाण अत्यल्पच असल्याचे पुढे आले आहे.
मराठवाड्यातील धाराशिव, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्याकडे राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी गेल्या दीड महिन्याच्या काळात पाठ फिरवल्याचे दिसत आहे. या तीन पैकी धाराशिव व हिंगोली या दोन जिल्हयात स्थानिकचे मंत्री नाहीत, त्याचा फटका याठिकाणी बसत आहे. या मागास असलेल्या तीन जिल्ह्यांमध्ये मंत्र्यांच्या दौऱ्यांचे प्रमाण फारच कमी आहे. मंत्री आपापले जिल्हे सोडून इतर जिल्ह्यात जाण्यास उत्सुक दिसत नाहीत. त्यामुळे या तीन जिल्हयातील जनतेमध्ये नाराजी दिसत आहे.
या तीन जिल्ह्यांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, विकासकामांसाठी निधी अशा प्रश्नांनी डोकेवर काढले आहे. मात्र, याकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडेच वेळ नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. येत्या काळात या ठिकाणी कोरडा दुष्काळाची स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे सरकारने जनतेच्या दाराशी जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
धाराशिव, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात मंत्र्यांनी कमी दौरे केले आहेत. धाराशिव जिल्ह्यात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तुळजापूरला गेले, पण दर्शनासाठी गेले होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पालकमंत्री असून ते झेंडावंदनासाठी 14 व 15 ऑगस्टला गेले होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील 23ऑगस्टला परिचितांच्या भेटी आणि एका ऑटोमोबाईल सेंटरच्या उदघाटनासाठी आले होते. रांजणी येथील नॅचरल शुगर कारखान्यावर आकाश फुंडकर यांनी 25 जुलैला आढावा बैठक घेतली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे 27 जुलैला धाराशिव व्हिजनच्या उद्घाटनासाठी गेले होते. तर रविवारी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी धाराशिव जिल्हयात एका आरोग्य मेळाव्याच्या निमित्ताने हजेरी लावली. हे दौरे वगळता कोणतेच मंत्री तिकडे फिरकले नाहीत.
परभणी जिल्ह्यात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जवळपास आठ वेळा दौरा केला आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर जिल्ह्यातल्याच असल्याने त्यांचा परभणी दौरा कायम असतो. त्याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 सप्टेंबरला शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्यासाठी गेले होते.
हिंगोली जिल्हयात अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ गेल्या दीड महिन्यात 15 ऑगस्टला एकदा गेले होते तर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कावड यात्रेच्या कार्यक्रमासाठी हिंगोली जिल्ह्यात हजेरी लावली. याशिवाय अन्य मंत्री हिंगोली जिल्ह्यात आले नाहीत. त्यामुळे येत्या काळात तरी सीएम देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष देतील का ? अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.