Supriya Sule: सौदी अरेबियातील रियाध इथं अडकलेल्या भोकरदन तालुक्यातील 41 प्रवाशांचा परतीचा मार्ग अखेळ मोकळा झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्तक्षेपामुळं एअरलाईन कंपनीनं नमतं घेत या सगळ्या प्रवाशांना पुढील तीन दिवसांत परत भारतात पाठवण्याची व्यवस्था करण्याचं मान्य केलं आहे. 'अकासा एअर’नं आपले नियोजित उड्डाण अचानक रद्द केल्यानं हे सगळे प्रवाशी अडचणीत आले होतं. सुप्रिया सुळे यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी परराष्ट्र मंत्री आणि संबंधित विभागाला ट्विटवरून यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानंतर यंत्रणा हलली आणि या प्रवाशांच्या भारतात परतण्याचा मार्ग मोकळा झाला. रियाधहून मुंबईकडे सोमवारी येणारे उड्डाण रद्द झाल्यामुळं जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हे सर्व प्रवासी परदेशात अडकून पडले होते.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत सुळे यांनी थेट परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर तसंच रियाध येथील भारतीय दूतावासाकडे तातडीनं हस्तक्षेपाची मागणी केली होती. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रवाशांची माहिती जाहीर केली आणि प्रशासनाला त्वरीत कारवाई करण्याचे आवाहन केलं. त्यानंतर रियाधमधील भारतीय दूतावास तात्काळ सक्रिय झाला. प्रवाशांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असं दूतावासानं स्पष्ट करत एअरलाईनशी समन्वय सुरू केल्याचं सांगितलं.
अखेर 'अकासा एअर'ला प्रवाशांसाठी पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी लागली. सुरुवातीला एअरलाईनकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली होती. मात्र, सुळे यांच्या पाठपुराव्यामुळं आणि भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे बंधू सुधाकर दानवे यांच्या प्रयत्नांमुळं हा प्रश्न सुटला. विशेष म्हणजे, प्रवाशांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क न घेता त्यांचा प्रवास पुन्हा नियोजित करण्यात आल्याचं समजतं.
पुनर्नियोजित प्रवासाचाच्या वेळापत्रकानूसार 8 एप्रिल - जेद्दा ते मुंबई (12 प्रवासी), 9 एप्रिल - जेद्दा ते मुंबई (15 प्रवासी), 10 एप्रिल - जेद्दा ते मुंबई (14 प्रवासी) या पद्धतीने हे सर्व प्रवासी भारतात परतणार आहेत. दरम्यान, एअरलाईननं आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, 'मध्यपूर्वेतील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव रियाध येथील उड्डाण सेवा अधूनमधून स्थगित करण्यात आली आहे. प्रभावित प्रवाशांना याबाबत आधीच माहिती देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात प्रवाशांना योग्य माहिती मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळं एअरलाईनच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या घडामोडीनंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकत सुप्रिया सुळे यांचे आभार मानले.